Aurangabad Political Marathi News : शिवसेनेत (Shivsena) झालेल्या बंडानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट सतत एकमेकांवर टीका करतांना पाहायला मिळतात. मात्र पहिल्यांदाच दोन्ही गटाच्या प्रमुखांचे पुत्र आमने-सामने येणार आहे. विशेष म्हणजे दिवस एकच, मतदारसंघ सुद्धा एकच आणि कार्यक्रमाचा वेळ देखील एकच असणार आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे पुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज औरंगाबादच्या (Aurangabad) सिल्लोड दौऱ्यावर असणार आहे. या दोन्ही युवा नेत्यांची एकमेकांविरोधात तोफ धडाडणार आहे. 


पहिल्यांदाच दोन्ही गटाच्या प्रमुखांचे मुलं आमने-सामने येणार


श्रीकांत शिंदे जाहीर सभेतून तर आदित्य ठाकरे पदाधिकारी संवाद कार्यक्रमातून भाषण करणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही नेत्यांची चर्चा सुरू असून, आज होणाऱ्या त्यांच्या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे सिल्लोडमध्ये सायंकाळी 4 वाजता या दोन्ही नेत्यांची भाषणं होणार असून, कोण बाजी मारणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


असे असणार कार्यक्रमाचे ठिकाण...


श्रीकांत शिंदे यांची सभा सिल्लोडच्या जिल्हा परिषदेच्या मैदानावर होणार असून, गेल्या तीन दिवसांपासून याची तयारी करण्यात येत आहे. तर उध्दव ठाकरेंच्या कार्यक्रमासाठी सुरवातीला सिल्लोडच्या महावीर चौकात परवानगी मागितली होती, पण पोलिसांनी ती परवानगी नाकारली होती त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांच्या स्टेजसाठी सिल्लोड शहरातील आंबेडकर चौकात परवानगी देण्यात आली आहे.


सत्तार यांच्याकडून शक्तिप्रदर्शन...


गेल्या काही दिवसांपासून अब्दुल सत्तार आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. दरम्यान आदित्य ठाकरे सत्तार यांच्या सिल्लोड शहरात सभा घेणार असल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात आले. त्यामुळे सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमाच्या दिवशीच सिल्लोडमध्ये खासदारश्रीकांत शिंदे यांच्या सभेचे नियोजन केलं. पण आता आदित्य ठाकरे यांची सभा होणार नसल्याचा खुलासा ठाकरे गटाकडून करण्यात आला. मात्र श्रीकांत शिंदे यांची आज सभा होणार आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्याकडून यानिमित्ताने पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन केली जाण्याची शक्यता आहे.


पोलिसांचा तगडा बंदोबस्त...


सिल्लोड शहरात एकाच दिवशी आणि एकाच वेळेत श्रीकांत शिंदे यांची सभा, तर आदित्य ठाकरे यांचा संवाद मेळावा होणार आहे. त्यामुळे निश्चितच पोलिसांसाठी कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्याचे आव्हान असणार आहे. त्यामुळे औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी सिल्लोड शहरात उद्यासाठी तगडा बंदोबस्त लावला आहे. यासाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना बंदोबस्तसाठी बोलवण्यात आले आहे. त्यामुळे आज सिल्लोड शहरात छावणीचं स्वरूप पाहायला मिळत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Bharat Jodo Yatra : मशाल हाती घेऊन आज राहुल गांधींची महाराष्ट्रात एन्ट्री, 14 दिवस राज्यात 'भारत जोडो'