Amravati News अमरावती : विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात (Vishalgad Encroachment) माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chhatrapati) यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यांनी 14 जुलै रोजी चलो विशाळगडचा नारा दिला होता. मात्र संभाजीराजे गडावर पोहोचण्यापूर्वीच हिंसाचाराचा उद्रेक झाला होता. गडावर आणि गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावामध्ये हिंसाचाराचा प्रचंड उद्रेक झाला. त्या हिंसाचारामध्ये वाहनांची, घरांची तसेच इतर मालमत्तांची जोरदार नासधूस करण्यात आली होती. मात्र, संभाजीराजेंनी विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात आंदोलनाची घेतलेली भूमिका योग्य असल्याचे म्हणत भाजप आमदार  डॉ. अनिल बोंडे (Dr. Anil Bonde) यांनी त्यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे संभाजीराजेंच्या भूमिकेचे समर्थनच केले आहे.  


विशालगड ईथं खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे. 158 अतिक्रमण साफ करण आवश्यक आहे. यासाठी जर कोणी आंदोलन करत असेल तर आम्ही त्याचे समर्थन करतो. विशालगड ईथलं अतिक्रमण काढू नये, यासाठी जर कोणी मोर्चा काढत असेल तर आम्हीही जशाच तसं प्रत्युत्तर देत मोर्चे काढू. असा इशाराही आमदार अनिल बोंडे यांनी दिला आहे. 


यशोमती ठाकूर यांनी महिलांना कधी 50 रुपये तरी दिले का?- अनिल बोंडे


यावेळी बोलताना  बोंडे यांनी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांना देखील  टोला लगावला आहे. काल काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांना लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली होती. या टिकेला भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलय. यावेळी ते म्हणाले की, यशोमती ठाकूर ज्यावेळी महिला व बालकल्याण मंत्री होत्या तेव्हा त्यांनी महिलांना 50 रुपये तरी दिले का, असा टोला अनिल बोंडे यांनी लगावलाय. आज कोट्यावधी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत.


यशोमती ठाकूर यांनी स्वतःला विचारायला पाहिजे, ज्यावेळी त्या महिला व बालकल्याण मंत्री होता तेव्हा अंगणवाडी सेविकांचं काही मानधन वाढवलं नाही. आशा सेविकांच वेतन काही वाढवलं नाही. महिलांना मदत केली नाही. यशोमती ठाकूर यांच्या घरी स्वयंपाक करणारी, भांडे घासणारी आमच्या माता भगिनींना सुद्धा पंधराशे रुपये मिळणार आहेत. तुम्ही त्या महिलांना किती पगार देता हे ही तुम्हाला माहीत नाही. म्हणून  तुमच्या पोटात दुखत असल्याचे ही अनिल बोंडे म्हणाले. 


नेमकं काय म्हणाल्या होत्या काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर?


राज्यातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना आणून पंधराशे रुपयात महिलांची बोळवण केली आहे, तर सुशिक्षित तरुणांना मात्र सहा ते बारा हजार रुपये दिले जाणार आहेत. निवडणुकांपूर्वी महिलांची फसवणूक करण्यापेक्षा महिलांनाही सन्मान जनक रक्कम द्यावी, अशी मागणी माजीमंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर यांनी केली होती.


राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजने अंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. तर आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील सुशिक्षित तरुणांना कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत दरमहा सहा ते बारा हजार रुपये देण्यात येणार आहेत. बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये कार्य प्रशिक्षणा दरम्यान तर पदविका झालेल्या तरुणांना आठ हजार आणि पदवीधर तरुणांना कार्य प्रशिक्षणा दरम्यान दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.


एकीकडे लाडक्या भावाला दहा हजार रुपये देण्याचा सरकारचा निर्णय आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीची मात्र दीड हजार रुपयात सरकार फसवणूक करत आहे. यामध्ये लाडक्या भावा-बहिणींमध्येच भांडण लावायचा सरकारचा प्रयत्न असल्याचा दिसत आहे, असा आरोपही यशोमती ठाकूर यांनी यावेळी केला.


इतर महत्वाच्या बातम्या