Vanchit Bahujan Aghadi : राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर याच मुद्द्यावरून आता राज्याचे राजकारण देखील ढवळून निघाले आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) सर्वेसर्वा आणि अध्यक्ष  ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आरक्षण बचाव यात्रेचे (Arakshan Bachav Yatra) आयोजन केले आहे. उद्या, 25 जुलै ते 7 ऑगस्ट या काळात ही यात्रा चैत्यभूमीवरुन संपूर्ण राज्यभर काढण्यात येणार आहे. राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणावरुन दोन समाज आमने-सामने आले असून त्यावरून रोज जोरदार राजकारण सुरू आहे. 


परिणामी, समाजात जातीय संघर्ष वाढत असल्याने राज्यात सलोखा निर्माण व्हावा आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी ही यात्रा वंचितकडून आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेसाठी ॲड. प्रकाश आंबेडकरांनी अनेक दिग्गज राजकीय नेत्यांना निमंत्रण देत यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यात राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासह मंत्री छगन भुजबळ, खा. अमोल कोल्हे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, आ. पंकजा मुंडे आणि ओबीसी सेवा संघाचे प्रदीप ढोबळे यांना या आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केलेय. तर उद्या सुरू होणाऱ्या या यात्रेत नेमकं कोण कोणे नेते उपस्थित राहतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


कसा असेल यात्रेचा मार्ग?


ओबीसी आरक्षण बचाव यात्रा 25 जुलैला चैत्यभूमी, मुंबई येथून सुरू होणार असून त्याच दिवशी पुण्यातील महात्मा फुले वाड्यालाही भेट देण्यात येणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे. काल मंत्री छगन भुजबळ यांनाही ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी निमंत्रित केले होते. आंबेडकर यांचे निमंत्रण स्वीकारून हे नेते आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होणार का? याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. ही यात्रा मुंबई येथून 25 जुलै रोजी निघणार असून पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, जालना आणि औरंगाबाद येथे यात्रेचा समारोप होणार आहे. 


राजकीय नेत्यांना सामील होण्याचं आवाहन


प्रकाश आंबेडकरांच्या या पत्रावर शरद पवार (Sharad Pawar) काय निर्णय घाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहेत. अशातच काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील त्याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. तर या पत्रामुळे शरद पवार कोंडीत सापडल्याचं दिसून येत आहे. शरद पवार आंबेडकरांनी आयोजित केलेल्या यात्रेत सहभागी झाले तर मराठा समाज पवारांवर नाराज होण्याची शक्यता आहे. तर यामध्ये सहभागी नाही झाले तर ओबीसी समाज नाराज होण्याची शक्यता आहे.


हे ही वाचा