Maharashtra Rain news : राज्यात पावसाचा जोर  (Heavy Rain) चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्यानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जाणू घेऊयात आजचा हवामानाचा अंदाज.


'या' भागात पडणार मुसळधार पाऊस


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईसह कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबईसह ठाणे, पालघर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर पुणे या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्याचबरोबर विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ


वारणा नदी बरोबरच कृष्णा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी 30 फुटांजवळ पोहोचली आहे. कृष्णा नदी काठच्या नागरिकांचे स्थलांतर करण्यास सांगली महापालिकेकडून सुरुवात करण्यात आली आहे. कर्नाळ रोडवरील आरवाडे पार्क भागातील 3 कुटूंब स्थलांतरित, 9  मुलांसह 17 जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे. 


कोल्हापूरमध्येही मुसळधार पाऊस


कोल्हापूर शहरानजीक असलेला कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. कळंबा तलाव हा ऐतिहासिक तलावातून याच तलावामधून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा केला जात होता. आता हा तलाव 100 टक्के भरला असून तलावाच्या सांडव्यामधून पाणी बाहेर पडत आहे. त्यामुळं एक प्रकारे धबधबा तयार झाला असून, नागरिक कळंबा तलावाचा धबधबा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.


निम्न वर्धा धरणाचे तीन दरवाजे 30 सेंटिमीटरने उघडले


वर्धा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा धरणाचे तीन दरवाजे 30 सेंटिमीटरने उघडण्यात आले आहेत. यातून 77.87 घनमीटर  प्रमाणे पाणी वर्धा नदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे.  वर्धा नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणाच्या जलाशयातील पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने  धरणातून पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सर्व यंत्रणांनी सतर्क राहून ग्रामस्थांना सतर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


महत्वाच्या बातम्या:


Heavy Rain in Mumbai & Thane: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस, दुपारी समुद्राला भरती; लोकल ट्रेनला तुफान गर्दी