रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटीचा अहवाल येत्या आठ दिवसांच्या कालावधीत शासनाला दिला जाईल, अशी गोपनीय माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे तिवरे धरणफुटीमागचा 'खेकडा' कोण स्षष्ट होणार आहे. 2 जुलै 2019 च्या रात्री तिवरे गावातील धरण फुटून मोठा अपघात घडला होता.


दसपटी तिवरे गावातील फुटलेले धरण हे मातीचे होते. हे धरण सुमारे 20 वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते. पण अचानक रात्री हे धरण फुटल्याने सुमारे 23 लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. धरण फुटीनंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. शासनाने यानंतर तातडीने मदतीचा ओघ सुरू करुन वाचलेल्या लोकांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, एवढ्या कमी कालावधीत हे धरण फुटल्याने ठेकेदारावर चहूबाजूने टीकेची झोड उठली. शासनाने धरण फुटीची चौकशी करण्यासाठी विशेष तपास तपासणी पथक एसआयटीची स्थापना केली. या पथकाने गेल्या चार महिन्यांमध्ये तपासणी केली आहे. हे पथक आपला अहवाल आता शासनाला लवकरच सादर करणार आहेत. सदरचा अहवाल पूर्णपणे गोपनीय असल्यामुळे त्याची काहीच माहिती सध्या उघड होऊ शकत नाही. दरम्यान या दुर्घेटनेचा कुणावर ठपका ठेवला जातो याची जिल्हावासीयांना उत्सुकता लागलेली आहे.

तिवरे धरण खेकड्यांनी फोडले -
तिवरे धरण खेकड्यांनी फोडले असा दावा तत्कालीन जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला होता. तिवरे धरण फुटणे ही एक नैसर्गिक संकट होते. अधिकाऱ्यांशी आणि जुन्या जाणत्या ग्रामस्थांशी मी चर्चा केली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे धरण खेकड्यांनी पोखरल्याने फुटलं असा दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला होता. या दाव्यानंतर मंत्री तानाजी सावंत यांच्यावर चौफेर टीका झाली होती. तर, अनेकांनी यावर संशोधन करत खेकड्यामुळे धरण फुटू शकत नसल्याचं सिद्ध केलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर नेमलेल्या पथकाने आता धरणफुटीचं कारण शोधले आहे. तसा अहवालही सरकारला सादर केला जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात हे धरण कशाने फुटले हे समोर येईल.

तक्रारी करुनही दुर्लक्ष -
तिवरे धरण 2000 या साली मातीचा वापर करुन बांधण्यात आलं होतं. तेव्हापासून या धरणात पाणी साठत होतं. जेव्हा धरण गळू लागलं, तेव्हा याच्या तक्रार ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे वारंवार केल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तिवरे धरण फुटल्याने शेजारच्या सहा ते सात गावांना या दुर्घटनेचा फटका बसला होता. त्यामुळे अनेक संसार उध्वस्त झाले. तर, अनेक संसार रस्त्यावर आले.

हेही वाचा - धरण फुटून उद्ध्वस्त झालेलं तिवरे गाव सिद्धिविनायक मंदिर न्यास दत्तक घेणार

VIDEO | तिवरे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा