अमरावती : शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाने अवमानकारकपणे काढल्याचा आरोप करत महानगरपालिका कार्यालयासमोर आज (सोमवारी) युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ केला. यावेळी पक्षाच्या तीन नगरसेवकांनी राजीनामा दिला तर शेकडो कार्यकर्ते यावेळी त्यांच्या सोबत उपस्थित होते. यावेळी पक्षातील महिला कार्यकर्त्या ताटात बांगड्या, साडी, चोळी घेऊन आल्याने पोलिसांसोबत त्याठिकाणी काहीसा वादही झाला होता. ज्यामुळे काही काळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी सगळ्या पदाधिकारी/कार्यकर्त्यांना पोलिसांकडून जबरदस्तीने पोलिसांच्या गाडीत टाकण्यात आले ज्यामुळे मुख्य राजकमल चौकात काही काळासाठी धावपळ उडाली होती. 


युवा स्वाभिमानच्या पुढाकाराने काही शिवप्रेमींनी राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला होता. हा पुतळा विनापरवानगी बसविण्यात आल्यामुळे
मनपा प्रशासन आणि पोलिसांनी रविवारी पहाटे-पहाटे तो हटविला.  दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाने अवमानकारकपणे काढल्याचा आरोप करत युवा स्वाभिमान पक्षाचे नगरसेवक आशिष गावंडे, सुमती ढोके आणि सपना ठाकूर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यापूर्वी त्यांनी आणि काही कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध म्हणून महापालिकेच्या मुख्य कार्यालयावर बांगड्या फेकत निषेधाच्या घोषणा दिल्या होत्या. यावेळी मनपा प्रशासनाचा निषेध करून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याचा आरोप केला गेला होता. राजीनामा देताना त्यांनी येणाऱ्या 20 जानेवारीच्या आमसभेत राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा ठराव मंजूर करून 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या दिवशी त्याची स्थापना करण्याची मागणी देखील केली.  


हे ही वाचा - 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha