माझ्याविरोधात ईडी, सीबीआयची नोटीस काढून दाखवा, सुप्रिया सुळेंचं सरकारला आव्हान
यंदाच्या निवडणुकाच्या निकालाची मला प्रचंड उत्सुकता असून पक्षांतर केलेल्या लोकांना तिकडे किती मत मिळतात, हे पाहायचं असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

सोलापूर : सरकार विरोधकांवर सूडबुद्धीने ईडी आणि सीबीआय कारवाई करत आहे, असे आरोप विरोधक करत आहेत. त्यामुळेच विरोधी पक्षातील नेते भाजप-शिवसेनेत जात असल्याचा आरोप होत आहे. एकीकडे विरोधकांमध्ये अशा कारवाईची भीती असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माझ्या विरोधात ईडी किंवा सीबीआयची नोटीस काढून दाखवावी, असं सरकारला आव्हान दिलं आहे.
मला पत्रकारांनी विचारलं की तुम्ही सरकारच्या विरोधात आवाज उठवत आहात, मात्र जर तुम्हाला ईडीची नोटीस आली तर आवाज उठवणार का? मी म्हणते की मला ईडी किंवा सीबीआयची नोटीस पाठवूनच दाखवावी, मी चॅलेन्ज देते. मी जर काही केलंच नाही तर मला कशाची नोटीस पाठवणार. सुरुवातीला थोडासा त्रास होईल. मात्र शेवटी मीच जिंकणार, असं म्हणत सुप्रिया सुळे म्हणाल्या
सुप्रिया सुळे 'संवाद ताईंशी' या कार्यक्रमानिमित्त सोलापूर दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी व्यापारी, विद्यार्थी, वकील, वैद्यकीय क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधला. विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरु असलेल्या ईडीच्या चौकशीवरुन त्यांनी सरकारवर निशाणा साधला. आपल्याला ईडी सीबीआयने नोटीस पाठवली तरी मला पर्वा नाही. मला संघर्ष करण्यास मजा येते, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला.
पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर टीका
सुप्रिया सुळे यांनी पक्ष सोडून भाजप, शिवसेनेत जाणाऱ्या नेत्यांवरही टीका केली. जे कोण पक्ष सोडून जात असतील त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. मात्र अनेक वर्ष सोबत असलेले सहकारी सोडून जात असल्याचं दु:खही आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
यंदाच्या निवडणुकाच्या निकालाची मला प्रचंड उत्सुकता असून पक्षांतर केलेल्या लोकांना तिकडे किती मत मिळतात, हे पाहायचं असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. तर पक्षांतर केलेल्या नेत्यांमुळे सरकार कोणाचेही आले तरी मंत्री आमचेच होणार असं, म्हणत मिश्कील टीकाही त्यांनी यावेळी केली.
मोबाईल कंपनीने चांगली ऑफर दिली की लोक मोबाईल बदलतात, त्याप्रमाणे ऑफर मिळाली की लोक विचारधारा वगैरे न बघता पक्षांतर करत असल्याची खंत सुप्रिया सुळेंनी बोलून दाखवली. सीबीआय, ईडी, बँका आणि साखर कारखाने या चार मुख्य कारणामुळेच लोक पक्षांतर करत असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. आतापर्य़ंत पक्षांतर करणाऱ्या कोणत्याही नेत्याने पक्षाविरुद्ध बोललं नसल्याचे समाधान असल्याचं त्यांनी व्यक्त केलं.
Before You Go
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
महत्त्वाच्या बातम्या






















