Sanjay Raut : राज्यात सध्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शिवेसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जवळपास 40 आमदारांसह बंड केलं आहे. त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार संकटात सापडलं आहे. हळूहळू शिंदे गटातील आमदारांची संख्या वाढतच असल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईत ठाण मांडून बसलेले कृषीमंत्री दादा भुसे (Dada bhuse) तीन दिवसाच्या प्रतिक्षेनंतर अखेर शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी टोला लगावलाय. 'सध्या राज्यात पाऊस कमी आहे, पेरण्या लांबत आहेत. राज्याचे कृषिमंत्री भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्यानं शेतकरी वाऱ्यावर आहे. मुख्यामंत्री कृपया आपण लक्ष द्या, असे म्हणत राऊतांनी भुसेंना टोला लगावलाय.


नेमकं काय म्हणालेत संजय राऊत


खरीप हंगामात कृषीमंत्री प्रत्येक आठवड्यात राज्यातील पेरणीचा आढावा घेत असतात. सध्या राज्यात पाऊस कमी आहे. पेरण्या लांबत आहेत. राज्याचे कृषिमंत्री भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्यानं शेतकरी वाऱ्यावर आहे. मुख्यामंत्री कृपया आपण लक्ष द्या. असे ट्वीट करत संजय राऊतांनी दादाजी भुसे यांच्यावर निशाणा लगावला आहे. हे ट्वीट करताना त्यांमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी टॅग केलं आहे.


भुसे एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय


शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचा गट वाढताना दिसत आहे. कालपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सोबत मुंबईत असलेले कृषीमंत्री दादा भुसे यांनी देखील शिंदे यांच्या गोटात सामील झाले आहेत. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला खिंडार पाडत आमदारांचा एक मोठा गट आपल्या पाठिशी उभा केल्यानंतर शिवसेनेच्या किल्ल्याचा एकेक बुरुज ढासळताना दिसत आहे. शिवसेनेचे आणखी आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. त्यापैकी कृषीमंत्री दादा भुसे यांच्यासह काही आमदार गुवाहाटीत दाखल झाले आहेत. कृषीमंत्री दादा भुसे नाशिकमधील आमदार असून, ते गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेशी जोडलेले आहेत. नाशिकमधील कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. म्हणून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार मानले जातात.  मात्र त्या उलट भुसे हे शिंदे निकटवर्तीय असून त्यांच्यात घरोबा असल्याचे सांगितले जाते.


महत्वाच्या बातम्या: