Sanjay Raut : हार नही मानेंगे, आता आमची वेळ आहे. महाविकास आघाडीचं सरकार मजबूत आहे. पुढची अडीच वर्ष आमचं सरकार पूर्ण करणार असल्याचा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला. दिलेली वेळ निघून गेली आहे. लढाई रस्त्यावर झाली तरीही आम्हीच जिंकू, असे म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना चॅलेंज दिलं आहे. 


माझी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी चर्चा झाली. आम्ही पूर्ण तयारी केली आहे. महाविकास आघाडी मजबूत आहे. आमचं सरकार पुढील अडीच वर्ष पूर्ण करेल आणि पुन्हा सत्तेत येईल असेही राऊत म्हणाले. यशवंतराव चव्हाण यांच्या साक्षीनं आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन करुन सांगतो, आम्हाला हार मान्य नाही. आम्हीच जिंकणार असल्याचा निर्धार राऊत यांनी केला आहे. हाऊसमध्ये देखील आम्ही जिंकू असेही राऊत यावेळी म्हणाले.


मुंबईत येऊन सामना करावा


यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना चॅलेंज केलं आहे. ज्यांना आमचा सामना करायचा आहे, त्यांनी मुंबईत याव आणि सामना करावा असा इशारा देखील राऊतांनी यावेळी दिला. 


त्या लोकांनी अत्यंत चुकीचा निर्णय घेतलाय


या लोकांनी अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आहे. त्यांना आम्ही संधी दिली होती. मात्र, वेळ निघून गेला आहे. त्यामुळं आम्ही आता लढायला तयार असल्याचे राऊत म्हणाले. याच इमारतीमधून महाविकास आघाडीची घोषमा झाली. याच इमारतीत महायुतीचं बंधन बांधण्यात आलं. याच इमारतीमधून मी सांगत आहे की, महाविकास आघाडी मजबूत आहे. हे सरकार पुढील अडीच वर्ष पूर्ण करेल आणि पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे. आम्हाला जे करायचे ते आम्ही आता केलं आहे. शरद पवार हे देशाच्या राजकारणातील सघल्यात मोठे नेते आहेत. त्यांचा आमि मुख्यमंत्र्यांचा संवाद सुरु असल्याचंही राऊतांनी सांगितलं.