Maharashtra Vidhan Parishad Election 2021 : विधान परिषदेच्या अकोला, वाशिम आणि बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरीया यांचा १०९ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत भाजप उमेदवार वसंत खंडेलवाल यांचा विजय झाला. परंतु, हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. पराभवास कोण कारणीभूत आहे याची पक्षांतर्गत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. 


विधान परिषदेचे विद्यमान आमदार असूनही गोपीकिशन बाजोरिया यांचा झालेला पराभव, शिवसेनेनं गांभीर्याने घेत पक्षांतर्गत चौकशी सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोपीकिशन बाजोरीया यांच्या पराभवास स्थानिक आमदार, जिल्हाप्रमूख आणि स्थानिक खासदार जबाबदार असल्याचं दबक्या आवाजात बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेनेत पक्षांतर्गत संशयकल्लोळ सुरू झाला असून पक्षाशी गद्दारी करणारा सुर्याजी पिसाळ कोण? याची चर्चा शिवसेनेत सुरू असल्याची माहिती मिळत आहे. लवकरच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या संदर्भात बैठक घेऊन पक्षांतर्गत कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात वसंत खंडेलवाल यांना 443 मते मिळाली. तर, शिवसेना-महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना 334 मते मिळाली. महाविकास आघाडीची जवळपास 80 मते फुटली असल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय 31 मते अवैध ठरली. 


अकोला महापालिकेसह अनेक नगरपरिषदांमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपने ही निवडणूक सर्व ताकदिने लढवली होती. अकोल्यातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि नितीन गडकरींचे कट्टर समर्थक वसंत खंडेलवाल यांच्या विजयासाठी भाजपने प्रयत्न केले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. 


शिवसेनेला धक्का


हा मतदारसंघ 1998 पासून गेली चार टर्म शिवसेनेच्या ताब्यात होता. विशेष म्हणजे या चारही निवडणुकीत शिवसेनेकडे मतदारांचं बहुमत नसतांनाही त्यांनी विजयाचा 'चमत्कार' घडवून आणला आहे. 1998 मध्ये शिवसेनेचे राजेंद्र पाटणी या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर 2004 पासून शिवसेनेकडून गोपीकिशन बाजोरिया सलग तीनवेळा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. बाजोरिया सध्या विधान परिषदेत पक्षाचे मुख्य प्रतोद आहेत. त्यामुळे त्यांच्या पराभवामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे.


महत्वाच्या बातम्या