Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2022 : पराक्रमी, शूर, धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती आहे. शंभूरायांच्या 365 व्या जयंतीचा राज्यभरात उत्साह पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे वर्णन इतिहासात शूर, पराक्रमी, स्वराज्यरक्षक आणि निधड्या छातीचा योद्धा अशी केली जाते. छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र. त्यांनी शिवरायांनंतर स्वराज्याची तलवार एक हाती पेलली.


पुरंदर किल्ल्यावर जयंतीचा उत्साह
छत्रपती संभाजीराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. यानिमित्ताने पुरंदर किल्ल्यावर विशेष कार्यक्रम पार पडतात. पुरंदर किल्ल्यावर तिथीनुसार संभाजी महाराजाची जयंती साजरी केली जात आहे. सकाळी दहा वाजता महिलांनी शंभुरायांचा पाळणा जोजवला. पुरंदर किल्ला संभाजी महाराजांचे जन्मस्थान असल्याने इथं विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. ढोल-ताशांचा गजर, हलगीचा नाद, मर्दानी खेळ, मल्लखांब या सारखे अनेक कार्यक्रम पार पडत आहेत.


स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजांच्या शौर्याची गाथा
छत्रपती संभाजीराज युगपुरुष म्हणूनही ओळखले जातात. ते शिवरायांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांचे ज्येष्ठ सुपुत्र होते. शंभुराजे दोन वर्षांचे असताना सईबाईंच्या निधनानंतर त्यांचे संगोपन माता जिजाबाईं यांनी केलं. लहान वयात शंभुरायांना रणांगण आणि राजकारणातील डावपेचांचं बाळकडू मिळालं.


छत्रपती संभाजी महाराज बालपणापासूनच चाणाक्ष आणि अत्यंत हुशार होते. वयाच्या आठव्या वर्षी संभाजीराजांना एका तहासाठी अंबरच्या राजा जयसिंह यांच्याबरोबर राहण्यास पाठवले. यामागे संभाजी महाराज यांना मुघल आणि राजपूत यांचे राजकीय डाव आणि आखणी समजावी असा शिवाजी महाराज यांचा हेतू होता. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्यांना मराठी, हिंदी, संस्कृत आणि पोर्तुगीज यांसारख्या 13 भाषांचे ज्ञान आत्मसात होते. लहानपणापासून स्वराज्याचे बाळकडू मिळालेले संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती होते. 
 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर स्वराज्याची सूत्रे छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे स्वराज्याची सुत्रे आली. 16 जानेवारी इ.स. 1681 रोजी रायगड किल्यावर संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. ते एक कुशल संघटक होती. मराठ्यांच्या 15 पट असणाऱ्या मुघलांशी शंभूरायांनी एक हाती लढा दिली. त्यांनी सुमारे 120 युद्धे लढली. यापैकी एकाही लढाईत त्यांना अपयश आले नाही. त्यांनी 120 युद्धे जिंकली. यामुळे त्यांना अजिंक्य म्हटलं जातं.


छत्रपती संभाजी महाराजांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी 1689 च्या सुरवातीला संगमेश्वरवर हल्ला केला. मराठ्यांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. परिणामी शत्रूने शंभूराज जिवंत पकडण्यात मुघलांना यश आले. संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड येथे नेण्यात आले. 


संभाजीराजांनी धर्मांतर केल्यास जीवदान देण्याची अट औरंगजेबाने घातली. मात्र, संभाजी राजेंनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे ठार मारायचा आदेश दिला. सुमारे 40 दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही छत्रपती संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजीराजांची भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे प्राणज्योत मालवली.


महत्त्वाच्या इतर बातम्या