तुमची मातृभाषा उत्तम येत असेल तरी तुम्ही मागे पडू शकत नाही; कृत्रिम बुद्धिमत्तेत डेटा ज्या भाषांमधून तयार होईल त्या भाषा शक्तिशाली ठरतील; राज ठाकरेंचा मराठी मनाला 'मनसे' कानमंत्र
आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून मराठीतून ज्ञान मिळवण्याचे 'डिजिटल सार्वभौमत्व' मिळवण्याची वेळ आली आहे," असे आवाहन करत राज यांनी सर्व मराठी भाषिकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Raj Thackeray on Marathi Bhasha Diwas: "ज्या भाषेतून सर्वाधिक डेटा तयार होईल, तीच भाषा भविष्यात शक्तिशाली ठरेल," अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी जणांना तंत्रज्ञानाच्या नव्या लाटेत सामील होण्याचे आवाहन केले आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सोशल मीडियावर लिहिलेल्या एका विशेष पोस्टमध्ये त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मराठी भाषेचे भविष्य यावर भाष्य केले असून, मराठी माणसाला डिजिटल विश्वात आपले साम्राज्य उभे करण्याची हीच सुवर्णसंधी असल्याचे म्हटले आहे.
मराठी भाषेचे 'सार्वभौमत्व'
"आपण आजवर मराठी भाषा आणि प्रांताच्या सार्वभौमत्वासाठी आवाज उठवला आहे, आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून मराठीतून ज्ञान मिळवण्याचे 'डिजिटल सार्वभौमत्व' मिळवण्याची वेळ आली आहे," असे आवाहन करत राज ठाकरे यांनी सर्व मराठी भाषिकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मातृभाषा अवगत असेल, तर तुम्ही मागे पडणार नाही
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, पूर्वी शेती आणि त्यानंतर मशिन्स ही शक्तीची केंद्र होती. डिजिटल युगात 'डेटा' शक्तिशाली ठरला, पण आता एआयच्या काळात हा डेटा ज्या भाषेतून निर्माण होईल, ती भाषा वरचढ ठरेल. "तुमची मातृभाषा तुम्हाला उत्तम येत असेल, तर यापुढे तुम्ही कोणत्याही शर्यतीत मागे पडू शकत नाही," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ज्ञानाची देवाणघेवाण आणि अर्थार्जनासाठी आता एआय प्रणाली मातृभाषेतून वापरणे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
मराठीचा 'डिजिटल विदा' (Data) वाढवण्याचे लक्ष्य
मराठी भाषा केवळ साहित्यापुरती मर्यादित न ठेवता ती तंत्रज्ञानाची भाषा व्हावी, यासाठी राज ठाकरेंनी काही महत्त्वाचे उपाय सुचवले आहेत
- तज्ज्ञ ब्लॉग्स आणि पॉडकास्ट: मराठी भाषिकांनी आपापल्या क्षेत्रातील तंत्रज्ञान, विज्ञान आणि कलेवर मराठीतून जास्तीत जास्त ब्लॉग्स आणि पॉडकास्ट सुरू करावेत.
- डिजिटल विश्वकोश आणि कोडिंग: कोडिंगपासून ते डिजिटल विश्वकोशापर्यंत सर्वकाही मराठीत उपलब्ध व्हावे.
- शालेय शिक्षण: शाळांमध्ये एआय प्रणाली कशी हाताळायची, याचे शिक्षण मराठीतून दिले जावे.
टीकेपेक्षा सकारात्मक माहितीवर भर द्या
राज ठाकरे यांनी सोशल मीडिया वापरकर्त्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. समाज माध्यमांवर केवळ टीका किंवा द्वेष पसरवण्यासाठी वेळेचा अपव्यय करण्यापेक्षा, नवीन आणि सकारात्मक माहिती मराठीतून अपलोड करावी. जेवढा दर्जेदार मराठी डेटा एआय प्रणालींना मिळेल, तितक्याच उत्कृष्ट संधी या प्रणाली मराठी भाषिकांसाठी भविष्यात निर्माण करतील, असे त्यांनी म्हटले आहे.
नोकऱ्यांच्या भीतीपेक्षा 'साम्राज्य' उभे करण्याची संधी
एआयमुळे नोकऱ्या जातील, अशी भीती सर्वत्र व्यक्त होत असताना राज ठाकरे यांनी सकारात्मक बाजू मांडली. ते म्हणाले, "काय घडेल याचा अचूक अंदाज कोणीही देऊ शकत नाही, पण हे तंत्रज्ञान आत्मसात केले तर पारंपरिक उद्योगात मागे पडलेला मराठी माणूस स्वतःचे मोठे साम्राज्य उभे करू शकेल." गेल्या 20-30 वर्षांत शंभर वर्षे जुन्या कंपन्यांना मागे टाकून नवीन डिजिटल कंपन्यांनी जी संपत्ती निर्माण केली, त्याचे उदाहरण देत त्यांनी मराठी तरुणांना प्रोत्साहित केले.
इतर महत्वाच्या बातम्या
























