पुणे : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन राज्यात वादंग उठलं आहे. या घटनेला आज 19 दिवस उलटून गेले आहेत. या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. पूजाच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल करायला गेलेल्या पूजाच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी पूजाच्या परिवारावर गंभीर आरोप केले आहेत. पूजाच्या कुटुंबाकडून माझी हत्या होण्याची शक्यता आहे, असा गंभीर आरोप शांताबाई राठोड यांनी केला आहे.


माझ्या जीवाचे बरेवाईट झाल्यास पूजाच्या न्यायासाठी आवाज उठवावा असं आवाहन शांताबाई राठोड यांनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना केलं आहे. माझ्यावर तक्रार दाखल झाली हे चुकीचे आहे. मी सत्यासाठी लढा देत आहे. मी पुण्यात जाऊन तक्रार दिली म्हणून झळ लागली. स्वतःच्या लेकरासाठी न्याय मागण्यासाठी गेला नाहीत. तुम्ही माझे रक्ताचे नातेवाईक आहात, असं शांताबाई राठोड यांनी म्हटलं आहे.


पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये पोहोचवले


शांताबाई राठोड यांनी पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये पोहोचवले असल्याचा देखील आरोप केला होता. त्यामुळेच त्यांना पूजाच्या हत्याऱ्याविषयी बोलायचे नाही आणि पैशामुळे माझे चुलत आजी नातेही त्यांना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी पूजाच्या आई वडिलांनी दिलेल्या खोट्या माहितीला बळी पडू नये आणि पूजाला न्याय द्यावा, अशी मागणी शांताबाई यांनी केली होती.


पूजा चव्हाण प्रकरण : आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाई, शांताबाई चव्हाण यांना पोलिसांची नोटीस


शांताबाई म्हणाल्या होत्या की, ज्या आई-वडिलांना पैशांसमोर स्वतःच्या मुलीची किंमत वाटत नाही, तर मी चुलत आजी कुठली कोण? पूजाच्या आईवडिलांनी समाजाची दिशाभूल तर केलीच आता मुख्यमंत्र्यांची ही दिशाभूल करत आहेत. संजय राठोड यांनी पूजाच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये देऊन त्यांचा आवाज बंद केला आहे. त्यामुळे पूजाचे आई-वडील कधीही समोर येऊन संजय राठोड यांच्या विरोधात आवाज उठवणार नाही. आमची मुलगी आजारी होती आणि त्यानेच ती मेली असेच ते म्हणतील, असा गौप्यस्फोट शांताबाई राठोड यांनी केला होता.


तृप्ती देसाई आणि शांताबाई चव्हाण यांना नोटीस
माजी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी वानवडी पोलीस ठाण्याबाहेर काल आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि शांताबाई चव्हाण यांना वानवडी पोलिसांनी नोटीस बजावली होती. तृप्ती देसाई आणि शांताबाई चव्हाण पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांनी ही नोटीस बजावली आहे.या नोटिशीमध्ये 'तुमची तक्रार लिहून घेतली असून त्यावर चौकशी करण्यात येईल असे तुम्हाला सांगण्यात आले आहे. तरी देखील तुम्ही आताच्या आता गुन्हा दाखल करावा यासाठी आंदोलन करत आहात. ही बाब शासकीय कामात अडथळा ठरते. आम्हाला कायदेशीर मार्गाने काम करू द्या अन्यथा तुमच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई करण्यात येईल' असे म्हटले आहे.


पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पहिला गुन्हा दाखल होणार, चुलत आजी पोलिसात, म्हणाल्या, पूजाचा खून झालाय!