पुणे : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन राज्यात वादंग उठलं आहे. या घटनेला आज 19 दिवस उलटून गेले आहेत. काल शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी या प्रकरणात राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला. या प्रकरणात आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. काल या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांचा गुन्हा काल पुण्यातील वानवडी पोलिसांनी दाखल करुन घेतला नाही. तक्रार दाखल करुन घेतलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान आता शांताबाई राठोड यांनी एक नवा गौप्यस्फोट केला आहे. पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये पोहोचवले ,त्यामुळेच त्यांना पूजाच्या हत्याऱ्याविषयी बोलायचे नाही आणि पैशामुळे माझे चुलत आजी नातेही त्यांना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी पूजाच्या आई वडिलांनी दिलेल्या खोट्या माहितीला बळी पडू नये आणि पूजाला न्याय द्यावा, अशी मागणी शांताबाई यांनी केली आहे.


पूजा चव्हाण प्रकरण : आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाई, शांताबाई चव्हाण यांना पोलिसांची नोटीस


शांताबाई म्हणाल्या की, ज्या आई-वडिलांना पैशांसमोर स्वतःच्या मुलीची किंमत वाटत नाही, तर मी चुलत आजी कुठली कोण? पूजाच्या आईवडिलांनी समाजाची दिशाभूल तर केलीच आता मुख्यमंत्र्यांची ही दिशाभूल करत आहेत. संजय राठोड यांनी पूजाच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये देऊन त्यांचा आवाज बंद केला आहे. त्यामुळे पूजाचे आई-वडील कधीही समोर येऊन संजय राठोड यांच्या विरोधात आवाज उठवणार नाही. आमची मुलगी आजारी होती आणि त्यानेच ती मेली असेच ते म्हणतील, असा गौप्यस्फोट शांताबाई राठोड यांनी केला आहे.


तृप्ती देसाई आणि शांताबाई चव्हाण यांना नोटीस
माजी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी वानवडी पोलीस ठाण्याबाहेर काल आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि शांताबाई चव्हाण यांना वानवडी पोलिसांनी नोटीस बजावली होती. तृप्ती देसाई आणि शांताबाई चव्हाण पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांनी ही नोटीस बजावली आहे.या नोटिशीमध्ये 'तुमची तक्रार लिहून घेतली असून त्यावर चौकशी करण्यात येईल असे तुम्हाला सांगण्यात आले आहे. तरी देखील तुम्ही आताच्या आता गुन्हा दाखल करावा यासाठी आंदोलन करत आहात. ही बाब शासकीय कामात अडथळा ठरते. आम्हाला कायदेशीर मार्गाने काम करू द्या अन्यथा तुमच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई करण्यात येईल' असे म्हटले आहे.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पहिला गुन्हा दाखल होणार, चुलत आजी पोलिसात, म्हणाल्या, पूजाचा खून झालाय!

गुन्हा दाखल होत नाही तोवर पुण्यातून बाहेर जाणार नाही

शांताबाई यांनी काल बोलताना म्हटलं होतं की, पूजाच्या मृत्यूला 18 दिवस झालेले आहेत. पूजाच्या मृत्यू प्रकरणात कुणीही नातेवाईक गुन्हा दाखल करायला आलेले नाहीत. म्हणून मी नातेवाईक या नात्यानं आम्ही वानवडी पोलिस ठाण्यात जाणार आहोत. पूजाच्या मृत्यूप्रकरणी कुणीही आरोपी असो मग ते अरुण राठोड, विलास चव्हाण, असो किंवा मंत्री संजय राठोड असो त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोवर मी पुण्यातून बाहेर जाणार नाही, असं पूजाची आजी शांताबाई यांनी सांगितलं. व्यवस्थित चौकशी झाली नसेल तर मी पोलिसांविरोधात देखील गुन्हा दाखल करणार आहे, असंही शांताताई राठोड यांनी सांगितलं होतं. शांताताई म्हणाल्या होत्या की, संजय राठोड, अरुण राठोड, विजय चव्हाण यांच्यावर गुन्हा करणार आहे. विजय म्हणत होता पोस्टमार्टम होऊ देऊ नका, पोस्टमार्टम रिपोर्ट कुठे गेला, फक्त मृत्यू झाला म्हणून नोंद आहे. कितीही पळवाट काढली तरी काहीही होणार नाही. आता पुढे आले नाहीतर आमच्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होईल. बंजारा समाजासाठी वसंतराव नाईक नंतर मंत्री संजय राठोड एकच व्यक्ती आहे म्हणून समाज पुढे येत नाही, असंही शांताताईंनी म्हटलं होतं त्या म्हणाल्या की, अरुण राठोडला खुप मोठं आमिष दाखवलं आहे. अरुण राठोड हा त्याच्याच घरी आहे, दिवसा बाहेर असतो रात्री घरी येतो. पूजाच्या आई वडिलांनी सत्यासाठी बाहेर यायला हवं . त्यांच्या घरच्यांवर दबाव, त्यांना लेकरांची किंमत नाही. पुजाचा खून झालाय, पूजा डॅशिंग मुलगी होती, असं त्यांनी म्हटलं होतं.