![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
नियम मोडून जळगावात धूमधडाक्यात लग्न; मनपाकडून 50 हजारांचा दंड, वधू-वराच्या मातापित्यांवर गुन्हा
लोकांच्या उपस्थितीचं बंधन असतानाही जळगावात धूमधडाक्यात लग्न पार पडलं. यानंतर महापालिकेने कारवाई करत 50 हजारांच्या दंड ठोठावला आणि वधू-वराच्या मातापित्यावर गुन्हा दाखल केला.
![नियम मोडून जळगावात धूमधडाक्यात लग्न; मनपाकडून 50 हजारांचा दंड, वधू-वराच्या मातापित्यांवर गुन्हा Parents of bride, groom booked in Jalgaon for violating Covid-19 norms, Corporation fines Rs 50,000 नियम मोडून जळगावात धूमधडाक्यात लग्न; मनपाकडून 50 हजारांचा दंड, वधू-वराच्या मातापित्यांवर गुन्हा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/24/8e4aebc2c6a01da2635c7845a8392c9f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभ अतिशय मर्यादित स्वरुपात करण्याचे शासनाचे निर्देश असतानाही जळगावात धूमधडाक्यात लग्न पार पडलं. याविरोधात महापालिकेने कारवाई करत 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला. शिवाय वधू-वराच्या मातापित्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर दंड ठोठावण्याची राज्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचं समजतं.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांचे बळी जात असताना शासन निर्णयाचे काटेकोर पालन करीत धूमधडाक्यात विवाह समारंभ टाळणे अपेक्षित आहे. मात्र शासन निर्णय पायदळी तुडवत धूमधडाक्यात विवाह करणं जळगावातील वर-वधूच्या मातापित्याला चांगलेच महागात पडले आहे. जळगाव शहरातील योगेश्वरनगर परिसरात भागवत चौधरी आणि धरण गाव येथील राजेंद्र चौधरी यांच्या मुलगा आणि मुलीचा विवाह संपन्न झाला. या विवाह समारंभ ठिकाणी महापालिकेने छापा मारला असता, 150 ते 200 जण विनामास्क आणि गर्दी करुन असल्याचं दिसून आलं. यानंतर मनपाच्या पथकाने कारवाई करत वर आणि वधू पित्याला 50 हजार रुपयांचा दंड करण्यासोबतच आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कोरोनाचा वाढता प्रसार पाहता त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी यापुढेही शासन नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाई करणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.
लग्न समारंभासाठी नियम कोणते?
राज्यात 22 एप्रिल रात्री आठपासून 'ब्रेक द चेन' अंतर्गत अधिक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. प्रशासनाने जाहीर केलेल्या सुधारित नियमावलीत लग्न सोहळ्यांसाठीही नवे निर्बंध जारी केले आहेत. नव्या नियमावलीनुसार, लग्न सोहळ्यांना केवळ 25 जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असणार आहे. एवढंच नाहीतर विवाह सोहळा केवळ दोन तासांत आटपावा लागणार आहे. तसेच लग्नसोहळ्यांसाठी जारी करण्यात आलेल्या नियमांपैकी कोणत्याही नियमांचं जर उल्लंघन झालं तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या किंवा नियमांचा भंग करणाऱ्या कुटुंबांना पन्नास हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. तर संबंधित कार्यालय किंवा समारंभस्थळावरही कारवाई करण्यात येणार आहे. कार्यालयानं नियमभंग केल्यास कोरोना आपत्ती असेपर्यंत कार्यालय बंद करण्यात येईल. दरम्यान, आधी लग्नसोहळ्यांसाठी 50 जणांच्या उपस्थितीची मर्यादा होती. पण आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केवळ 25 जणांच्या उपस्थितीच लग्नसोहळा उरकावा लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)