पंढरपूर : गेल्या वर्षी आलेली कोरोनाची (Coronavirus) पहिली लाट खूपच सौम्य होती. मात्र यंदाची दुसरी लाट खूपच घटक सिद्ध झाली असून आजही गावोगावी कोरोनाचे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत .शेकडोंच्या प्राण गमावले आहेत. अशा परिस्थितीत पालखी सोहळ्यातील (Ashadhi Wari) सर्वात शेवटचा मुक्काम असलेल्या वाखरी ग्रामपंचायतीने तर चक्क संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी सोहळ्यांना पत्र लिहून पायी न येण्याची विनंती केली आहे . 


आषाढी यात्रा हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक सोहळा मनाला जातो. शेकडो वर्षांपासून पालख्या आणि सोबत लाखोंचा जनसागर घेत हे सोहळे पंढरीच्या दिशेने पायी चालत येतात. हा सोहळा म्हणजे एक मोठे शहर रोज चालत पंढरीकडे येत असते. मार्गातील गावे या लाखोंच्या महासागराचे अतिशय आदराने स्वागत व सेवा करीत असतात. ही परंपरा वर्षानुवर्षे महाराष्ट्राने जपली आहे.  या लाखो वारकऱ्यांसाठी आपल्या घराची कवाडे यात्रा काळात सताड खुली केलेली असतात. मात्र गेल्या वर्षी कोरोना आला आणि ही पायी वारीची परंपरा महामारीमुळे बस मधून पालख्या आणून पूर्ण करण्यात आली.  गेल्या वर्षी आलेली पहिली लाट खूपच सौम्य होती मात्र यंदाची दुसरी लाट खूपच घटक सिद्ध झाली असून आजही गावोगावी कोरोनाचे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत . शेकडोंच्या प्राण गमावले आहेत. अशा परिस्थितीत पालखी सोहळा पायी आणायचा वारकरी संप्रदायाचा आग्रह असून कोरोनाचे नियम पाळून मर्यादित संख्येत पायी पालखी सोहळ्याची परवानगी देण्याची मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे. 


मात्र पायी पालखी सोहळा आता पालखी मार्गावरील गावांना त्रासदायक वाटू लागला असून अजूनही कोरोनाचे संकट आ वासून उभे असताना यंदा देखील पालखी सोहळे बसने आणावेत पायी वारी नको असे ठाम मत या पालखी मार्गावरील गावागावातून पुढे येऊ लागले आहेत. पालखी सोहळ्यातील सर्वात शेवटचा मुक्काम असलेल्या वाखरी ग्रामपंचायतीने तर चक्क संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी सोहळ्यांना पत्र लिहून पायी न येण्याची विनंती केली आहे. 


वेळापूर


 संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यातील माळशिरस तालुक्यातील हे मोठे गाव.. पण आजही कोरोनाच्या भयानक दहशतीखाली जगात आहे . गावातील कोविड सेंटरमध्ये अनेक रुग्ण उपचार घेत असून 25 हजाराच्या लोकवस्ती असलेल्या वेळापूर परिसरात दुसऱ्या लाटेमध्ये 1100 पेक्षा जास्त रुग्ण  कोरोनाग्रस्त झाले होते. दुसऱ्या लाटेत 15 पेक्षा जास्त जणांनी आपले प्राण गमावले. यंदा पायी वारी अजिबात नको असाच सूर या गावातून निघत आहे. वारकरी कोरोनाचे नियम पाळतील मात्र दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे काय असा सवाल येथील जेष्ठ पत्रकार सूर्यकांत भिसे यांनी विचारला. वास्तविक गेल्या वर्षी कोरोनाचे संकट कमी होते मात्र यंदा हे संकट जास्त असल्याने आणि अजूनही धोका असल्याने यंदाही बसमधूनच पालख्या आणाव्यात असे  डॉक्टर उदय माने देशमुख म्हणाले. 



भंडीशेगाव


पंढरपूर तालुक्यात पालखी सोहळ्यांनी प्रवेश केल्यावर भंडीशेगाव हे असेच मोठे गाव  आहे. मात्र आजही गावाच्या सरपंच व सदस्य हे गावात सुरु केलेल्या कोविड सेंटर मध्येच बसून बाधित ग्रामस्थांची सोय पाहत आहेत. या गावातील महिला सरपंच मनीषा येलमार यांना  पायी वारी नकोय... यंदा बसने पालख्या आणाव्यात अन्यथा पुन्हा एकदा कोरोनाचे महाभयंकर संकट वाढण्याची भीती येथील ग्रामस्थांच्या मनात आहे.  ग्रामीण भागात अजूनही मोठ्या संख्येने कोविड रुग्ण सापडत असल्याने पायी वारीचा धोका यंदा नको अशी त्यांची भावना आहे . गेल्या लाटेपेक्षा ही लाट जास्त भयंकर असून यात अनेकांचे बळी गेल्याने पायी वारी नको असे कळवळून ग्रामस्थ सांगत आहेत. भंडीशेगावमध्ये 270 पेक्षा जास्त रुग्ण बाधित होते अजूनही अनेकांवर उपचार सुरु आहे.  दुसऱ्या लाटेत मनुष्यहानी जास्त झाल्याने ग्रामस्थ कोणताच धोका पत्करायला तयार नाहीत . 


वाखरी


संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या मुख्य दोन पालखी सोहळ्याचा अखेरचा मुक्काम वाखरी येथे असतो. येथे  शेवटचे रिंगण सोहळे करून पालखी सोहळे वखारीत विसावतात. पालखी सोहळ्यातील सर्वात जास्त मानाचे आणि महत्वाचे गाव म्हणून वाखरीकडे पहिले जाते. मात्र दुसऱ्या लाटेत उद्ध्वस्त झालेल्या वाखरीमध्ये 800 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडले होते. अजूनही अनेक रुग्णांवर उपचार सुरु असून रोज नवनवीन रुग्ण सापडत आहेत. एकट्या वाखरीत तब्बल 35 जणांचे आयुष्य या कोरोनाने संपवल्याने सर्वात जास्त दहशत वाखरी गावात आहे. म्हणूनच वाखरी ग्रामपंचायतीने संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा व संत तुकाराम पालखी सोहळ्याला यंदा पायी वारी नको बस मधूनच पालख्या आणाव्यात असे लेखी पत्र देत आपला विरोध दर्शवला आहे. यंदाचे संकट खूप भीषण आणि मनुष्यहानी करणारे असल्याने पुन्हा कोरोनाचा धोका टाळण्यासाठी पायी पालखी नको अशी स्पष्ट भूमिका वाखरी ग्रामपंचायत व ग्रामस्थाने एकमुखाने घेतली आहे . गेल्या वर्षीही याच वाखरी पालखी तळावर बस मधून पालखी सोहळे आले होते आणि येथे विसावा घेऊन बसमधून पंढरपूर मध्ये गेले होते . यंदाही याच पद्धतीने पालखी सोहळे आणावेत अशी मागणी वाखरी ग्रामस्थांनी केली आहे.


संबंधित बातम्या :


Ashadhi wari | यंदाच्या आषाढी सोहळ्यात पायी पालखी सोहळ्याला निर्बंध चालतील बंदी नको : वारकरी संप्रदाय