जळगाव : भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यापासून ते सातत्याने भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निशाणा साधत आहेत. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा असं म्हणत आजही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडलं. एकनाथ खडसेनंतर आता त्यांचे अनेक समर्थक राष्ट्रवादीत प्रवेश करताना दिसत आहेत. आज मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा गावात त्यांच्या अनेक समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.


मी स्पर्धक असल्याने माझ्या विरोधात विविध प्रकारचे आरोप लावण्यात आले. माझा छळ करण्यात आला एवढंच काय तर विनयभंग सारखा गुन्हा दाखल करण्याचं नीच राजकारण करण्यात आलं. ज्या पक्षाला मी लहानाचं मोठं केलं तो पक्ष सोडावा वाटत नव्हता. मात्र आपलेच गद्दार झाले त्यामुळे कपटी मित्र पेक्षा दिलदार शत्रू बरा असं वाटलं. मी पक्ष सोडला नाही, मला पक्ष सोडायला भाग पाडले, असं एकनाथ खडसे म्हणाले.

पुढे खडसे म्हणाले की, मला पक्षाने भरपूर दिलं अस सांगितलं जातं. मात्र मीही माझ्या आयुष्याची चाळीस वर्षे दिली आहेत. मुलगा गेल्यानंतरही पक्षासाठी उभा राहिलो आहे. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. माझी छळवणूक सुरूच राहिल्याने मी पक्ष सोडला, काय चूक केली. अन्याय होत असताना पक्षात कायम असल्याने कार्यकर्ते पक्ष सोडण्यासाठी दबाव आणत होते. म्हणून निर्णय घ्यावा लागला.


पक्षाने एका व्यक्तीचे लाड केल्याने संपूर्ण महाराष्ट्रच वाटोळं झालं आणि मिळणार असलेली सत्ताही गेली. ही व्यक्ती कोण हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. मला तिकीट मिळणार नाही हे भाजपचे राष्ट्रीय समन्वय असलेले डॉ. राजेंद्र फडके हे माझ्या व्याह्यांना आधीपासून सांगत होते. मला तिकीट मिळणार नाही यांना कसं अगोदरपासून माहित होतं. अगोदर कोणत्या बैठकीत कट केला असेल तरच हे होऊ शकतं. आपली भाजपच्या विरोधात नाराजी नाही, फक्त एकाच व्यक्तीबाबत आहे, असं खडसे यांनी म्हटलं.


संबंधित बातम्या