जळगाव : एकनाथ खडसेच काय तर मुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या सात ते आठ नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतरही पक्षाला कोणत्याही प्रकारचा फरक पडला नव्हता. भाजपकडून मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर ही नेतेमंडळी पक्ष सोडून निघून गेली होती. नंतर पक्षात परत देखील आली होती. भाजप हा पक्ष व्यक्तीनिर्भर नाही. हा पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा आहे, अशा शब्दात भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंवर पलटवार केला.


भाजपच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीच्या कोअर कमिटीची बैठक काल पार पडली. या बैठकीनंतर गिरीश महाजन पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी खडसेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना जोरदार पलटवार केला. खडसेंनी पक्षांतर केल्यानंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार घडामोडी घडत आहेत. सध्या खडसे आणि महाजन यांच्यातही शाब्दिक युद्ध रंगले आहे. एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरात गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना 'पुढच्या कालखंडात कोण किती सक्षम आहे, कुणाच्या मागे किती लोक आहेत, हे चित्र दिसेलच', असे वक्तव्य केले होते. त्यावर गिरीश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली.


मी सन्यास घ्यावा अशी चंद्रकांत पाटील यांची इच्छा होती : एकनाथ खडसे


ते पुढे म्हणाले, पक्षाच्या मागे कोण आहे, हे मानणारे आम्ही आहोत. त्यामुळे येत्या कालखंडात ते दिसेलच. हा पक्ष व्यक्तीनिर्भर नाही. कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा हा पक्ष आहे. त्यामुळे याठिकाणी लोकं येतील आणि जातील. पण दिवसेंदिवस पक्ष वाढतच चालला आहे. हे आपल्यालाही दिसत आहे. आज लोकसभा तसेच राज्यसभा मिळून 500 पेक्षा अधिक खासदार भाजपाचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर, त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून संपूर्ण भारतभर भाजपाची घोडदौड वेगाने सुरू आहे. त्यामुळे कोण काय म्हणते? याला फार काही महत्त्व देण्याची गरज नसल्याचे गिरीश महाजन म्हणाले.


'जीवन उद्ध्वस्त करण्याचा फडणवीसांकडून प्रयत्न', भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर एकनाथ खडसे भावूक


2 नोव्हेंबरला जिल्ह्यात भाजपाचे आंदोलन
गिरीश महाजन म्हणाले की, सध्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी जनसंपर्क अभियान तसेच आत्मनिर्भर भारत असा कार्यक्रम आलेला आहे. याबाबतीत चर्चा करण्यासाठी आजची ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीत येत्या 2 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात राज्य सरकारविरुद्ध जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय झाला. आज शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे. शेतमालाच्या खरेदीबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही. नोकरदार, विद्यार्थीवर्गाला अडचणी आहेत. या साऱ्या विषयांबाबत भाजपाकडून सरकारला जाब विचारला जाणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या :