मुंबई : खूप दिवसांपासून नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. राजीनामा दिल्यानंतर खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच आपण भाजप नेतृत्वावर नाराज नसून देवेंद्र फडणवीसांमुळं राजीनामा देत असल्याचं खडसेंनी सांगितलं. आपलं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला असल्याचं खडसे म्हणाले. एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. येत्या शुक्रवारी ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.


राजीनामा दिल्यानंतर खडसे भावूक होत म्हणाले की, भाजप सरकारमध्ये माझ्या राजीनाम्याची मागणी कुणीही केली नव्हती. माझ्या चौकशीची कुणीही मागणी केली नव्हती. कुणीही राजीनामा मागितला नसताना मला राजीनामा द्यायला लावला. माझी तक्रार देवेंद्रजींवर आहे. माझ्यावर त्यांनी विनयभंगाचा खटला दाखल करायला लावला. हे मरणाहून मेल्यासारखं आहे. माझ्यासोबत अत्यंत खालच्या स्तराचं राजकारण केलं. माझा परिवाराला यामुळं मनस्ताप झाला. माझ्यावर पाळत ठेवली गेली. मंत्री असताना नऊ महिने पाळत ठेवली. मला काही मिळालं किंवा नाही मिळालं याचं दुख नाही, मी माझ्या ताकतीनं ते मिळवलं, असं ते म्हणाले.


खडसे म्हणाले की, माझा निर्णय मी घेतला आहे. जनता माझ्यासोबत आहे. राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेनेने एकदाही राजीनाम्याची मागणी केली नाही. मी स्वयंस्फूर्तीने राजीनामा देतोय. मी देवेंद्र फडणवीसांवर नाराज आहे. माझ्यावर खोटा विनयभंगाचा खटला दाखल केला. हे सर्वात त्रासदायक होतं, असं ते म्हणाले. मी आजवर जे मिळवलं ते माझ्या ताकतीने मिळवलं. भाजपमध्ये कुणाच्या उपकारानं पदं मिळवली नाहीत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होईपर्यंत माझ्यावर एकही आरोप झालेला नव्हता. मात्र त्यांनी माझं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मला तोंडावर एक बोलायचं आणि मागून माझ्याविषयी वेगळं षडयंत्र केलं गेलं, असंही खडसे म्हणाले. आज यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला उद्या हे बलात्काराचा गुन्हा दाखल करतील, असं ते म्हणाले.


मला भाजपमध्ये थांबवण्यासाठी किंवा चर्चेसाठी चंद्रकांत पाटील यांच्याशिवाय कुणीही फोन केला नाही, असंही ते म्हणाले.  मी लाचार नाही, कुणाचे पाय चाटणारा देखील नाही, असंही खडसे म्हणाले. रक्षाताईं खडसे भाजप सोडणार नाहीत, त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा. आपल्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत, असंही ते म्हणाले. रोहिणी खडसे देखील जिल्हा बॅंकेवर राहतील, असंही ते म्हणाले. मी कुठल्याही आश्वासनावर राष्ट्रवादीत जात नाहीये, असंही ते म्हणाले. मी पदासाठी जात नाहीये, पद मी इथंही मिळवलं असतं, असंही ते म्हणाले.


'खडसेंनी भाजप सोडणं धक्कादायक, पक्षासाठी चिंतनाची बाब', खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजप नेत्यांना धक्का


खडसे यांच्या भाजप सोडण्याने भाजप नेत्यांना धक्का 


खूप दिवसांपासून नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांनी फायनली भाजपला रामराम ठोकला आहे. खडसे यांनी भाजप पक्ष सोडला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं. शुक्रवारी दुपारी दोन वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.  दरम्यान खडसे यांच्या भाजप सोडण्याने भाजप नेत्यांना धक्का बसला आहे. ही धक्कादायक बातमी असून ही पक्षासाठी ही चिंतनाची बाब आहे, असं आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. तर खडसेंचा हा निर्णय दुर्देवी असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलीय. तर मी यावर लगेचच प्रतिक्रिया देऊ शकणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.


'ओ जानेवाले हो सके तो लौट के आना'- मुनगंटीवार
माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, एकनाथ खडसेंनी भाजप सोडणं ही धक्कादायक बातमी आहे. ही पक्षासाठी ही चिंतनाची बाब आहे. खडसेंसारखा नेता ज्यांनी पक्षाची सेवा केली. मी निशब्द आहे. त्यांनी जाऊ नये असं वाटायचं, असं ते म्हणाले. 'ओ जानेवाले हो सके तो लौट के आना' असं म्हणत मुनगंटीवार यांनी ज्यांनी संघटनेवर प्रेम केलं. पक्ष वाढवला. त्यांचं जाणं नक्कीच जाणं चांगलं नाही, असं म्हटलं आहे. पक्षात अन्याय होतोय असं त्यांना वाटलं. पण मला वाटायचं की चर्चेतून होईल, हे धक्कादायक आहे. खूश रहो तुम सदा ये दुवा है हमारी. अन्याय झाला की नाही यावर चर्चेतून, संवादातून मार्ग निघू शकला असता. एकनाथ  खडसे हे संघर्षशील, दिलदार मनाचे नेते आहेत, असं मुनगंटीवार म्हणाले.


दिल्या घरी सुखी राहावे - रावसाहेब दानवे
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे की, एकनाथ खडसेंचा हा दुर्देवी निर्णय आहे. त्यांचं राजकीय करिअर भाजपमध्ये घडलं. काही कारणांनी ते मुख्य प्रवाहातून बाहेर गेले. ते जिकडे जात आहेत, त्या लोकांनीही त्यांच्यावर टीका केल्या आहेत. काही काळ त्यांनी वाट पाहायला हवी होती. त्यांच्याविषयी आदर आहेत. त्यांनी दिल्या घरी सुखी राहावे. त्यांना आम्ही वेगळं समजत नव्हतो. आम्ही चिंतन नेहमीच करतो. देवेंद्र फडणवीस यांचा स्वभाव सर्वांना माहिती आहे. आमच्यात मनभेद नव्हते, मतभेद होते. मतभेद सर्वच पक्षात असतात. राजकारणात अशा घटना घडत असतात. खडसे आणि फडणवीस हे चांगले मित्र होते. आमच्यात बिनसलं काही नव्हतं, असं दानवे म्हणाले.  आम्ही खूप प्रयत्न केले की त्यांनी पक्षांतर करु नये. त्यांनी पक्षासाठी खूप केलं. पक्षानही त्यांना खूप दिलं, असंही दानवे म्हणाले.


एकनाथ खडसेंचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांना मिळाला : केशव उपाध्ये
एकनाथ खडसे यांचा राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्षांना मिळाला आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, असं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितलं. नाथाभाऊ जाऊ नये यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न केले. संवादातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. खडसेंवर अन्याय झाला की नाही हा विषय व्यक्तिसापेक्ष आहे, असंही ते म्हणाले.


अधिकृत माहिती मिळालेली नाही : देवेंद्र फडणवीस
अधिकृत माहिती मिळालेली नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष याबाबत निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली.


राष्ट्रवादी प्रवेशानंतर नाथाभाऊ लगेच मंत्री होण्याची शक्यता
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. यासाठी राष्ट्रवादीचा एक मंत्री राजीनामा देईल, त्या जागी एकनाथ खडसे मंत्री होती. तर जो मंत्री राजीनामा देईल तो प्रदेशाध्यक्ष होईल, असं म्हटलं जात आहे. दिलीप वळसे-पाटील किंवा जितेंद्र आव्हाड यांच्यापैकी एखादा मंत्री राजीनामा देणार असल्याची प्राथमिक शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.



महत्त्वाच्या बातम्या :