पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल केला आहे. परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल होणं तसं चांगलंच आहे. आधीची बहुपर्यायी पद्धत बदलून आता राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी यूपीएससी प्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह पद्धत लागू होणार आहे. यासंबंधी एमपीएससीने अभ्यासक्रमही जाहीर केला आहे. एमपीएससीने यूपीएससीचा अभ्यासक्रम काही अंशी बदल करुन तसाच उचलला आहे. 


एमपीएससीच्या नव्या अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षा ही एकूण 1750 गुणांची असेल तर मुलाखत ही 275 गुणांची असेल. अंतिम निकाल हा एकत्रितरित्या 2025 गुणांवर लावण्यात येणार आहे. या नव्या पद्धतीची शिफारस ही एमपीएसचीच्या एक सदस्यीय समितीने केली होती. या समितीच्या कार्यपद्धतीवरच आता विद्यार्थी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. आयोगाने ही नवीन परीक्षा पद्धत खासगी क्लासेसचा गल्ला भरण्यासाठी जाहीर केली आहे का असा प्रश्न पुण्यात अभ्यास करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. 


खासगी क्लासेसना फायदा? 


स्पर्धा परीक्षेच्या मुख्य परीक्षेचा पॅटर्न यूपीएससीप्रमाणे बदलण्यासाठी एमपीएससीने एक सदस्यीय आयोगाची स्थापना केली होती. या समितीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत दळवी हे होते. समितीचा सदस्य हा कोणत्याही संस्था किंवा क्लासेसशी संबंधित नसावा, तसे असल्यास पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा येऊ शकते. चंद्रकांत दळवी यांनी पुण्यातील दोन सुप्रसिद्ध खासगी क्लासेसच्या कार्यक्रमांना अनेकदा उपस्थिती लावल्याची विद्यार्थ्यांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे या समितीने शिफारस केलेला पॅटर्न हा खासगी क्लासेसचा गल्ला भरण्यासाठी फायदेशीर आहे का? किंवा खासगी क्लासेसचे यामध्ये हितसंबंध जपले गेले आहेत का? असा सवाल काही विद्यार्थांनी नाव न सांगण्याच्या अटींवर उपस्थित केला आहे. 


समितीच्या अहवालावर एमपीएससीने विद्यार्थ्यांच्या सूचना मागवणं अपेक्षित होतं. तसेच विद्यार्थ्यांना या संबंधी पूर्वसूचना देण्यात आल्या नाहीत अशी तक्रार विद्यार्थी वर्गातून व्यक्त केली जात आहे. 17 ऑक्टोंबर 2022 रोजी एमपीएससीने पहिल्यांदा इंग्रजीमध्ये अभ्यासक्रम प्रसिद्ध केला. नंतर तो अभ्यासक्रम मराठीमध्ये भाषांतरित करण्यासाठी दोन महिने लावले. 2023 पासून हा नवा अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. जे विद्यार्थी गेले सहा ते सात वर्षांपासून विद्यार्थी ऑब्जेक्टिव्ह परीक्षेची तयारी करत आहे त्यांच्याकडून यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. 


एमपीएसचीच्या मुख्य परीक्षेच्या नव्या पॅटर्नवर विद्यार्थ्यांनी खालील प्रश्न उपस्थित केलेले आहेत, 


1. कोणतीही परीक्षा पद्धत ठरवत असताना त्याद्वारे भरल्या जाणाऱ्या पदांचा विचार व्हावा. UPSC मधून दरवर्षी IAS, IPS ही धोरणात्मक निर्णय घेणारी पदे भरली जातात तर MPSC राज्यसेवा  मधून साधारण 75 टक्के भरती वर्ग दोन पदांसाठी घेतली जातेय.


2. तसेच उपजिल्हाधिकारी पोलिस उप-अधीक्षक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ही पदं वगळता इतर कोणालाही IAS, IPS होण्याची संधी नाही. त्यातही उपजिल्हाधिकारी आणि पोलिस उपअधीक्षक पदांची भरती एमपीएससीकडून दरवर्षी होत नाही. 


3. सद्यस्थितीत अभ्यासक्रम ठरवताना तो UPSC चा काॉपीपेस्ट केला आहे. तसेच काही शंका असल्यास इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रम अंतिम समजला जाईल असं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. मराठी माध्यमात उपलब्ध साहित्य, मराठी आणि इंग्रजी लिहण्याच्या वेगातील फरक या सगळ्या गोष्टी पहाता इंग्रजी माध्यमातील उमेदवारांना नैसर्गिक फायदा होणार असल्याचं चित्र आहे. 


4. वैकल्पिक विषयामध्ये टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल विषयामध्ये मार्कचा फरक पडू शकतो. देशातील इतर राज्यसेवांचा विचार करता पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश सोडल्यास इतर राज्यात वैकल्पिक विषय दिसून येत नाही. 


5. अभ्यासक्रम ठरवताना महाराष्ट्राच्या संदर्भात इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, संस्कृती या विषयांचा विशेषत: विचार करण्यात आला नाही. तेलंगाणा, आंध्रप्रदेश सारख्या राज्यात राज्यसंदर्भात मुख्य परीक्षेला वेगळे पेपर आहेत. 


6. सध्याच्या पॅटर्ननुसार क्लासेसची तशी गरज नाही. सध्या बरेच विद्यार्थी गावी, घरी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहून अभ्यास करत आहेत. परंतु नवीन पॅटर्ननुसार क्लास लावणे अपरिहार्य होणार आहे. नवीन पॅटर्ननुसार क्लासेसची फी सध्या दोन ते तीन लाखाच्या घरात आहे. यामुळे ग्रामीण, गरीब विद्यार्थी आपोआप यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. 


7. मुलाखतीमध्ये जास्त मार्क्सचा फरक पडू नये म्हणून जवळपास इतर राज्यामध्ये 50 -100 मार्क्सची मुलाखत घेण्यात येते. आंध्रप्रदेशसारख्या राज्यांनी ग्रामीण मुले मागे पडू नये म्हणून मुलाखतच रद्द केली आहे. तर कर्नाटकसारख्या राज्याने मुलाखतीचे गुण 200 वरुन 25 आणले आहे. असे असताना MPSC ची 275 मार्क्सची मुलाखत घेणं कितपत योग्य ठरेल.