Amravati News : अमरावती मनपा आयुक्तांवर (Amravati Municipal Commissioner) शाईफेक प्रकरणाचा आणि माझा काहीही संबंध नाही,  शाईफेक घटनेंच मी समर्थन करत नाही असे वक्तव्य आमदार रवी राणा (BJP MLA Ravi Rana) यांनी पत्रकार परिषदेत केले, दरम्यान रवी राणा यांच्यासह 11 जणांवर कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


...म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला - आमदार राणा
आतापर्यंत शाईफेकीच्या अनेक घटना झाल्या, मात्र कलम 307 नुसार गुन्हा दाखल झाला नाही. ठाकरे सरकार विरोधात बोलणाऱ्यांना कारागृहात टाकण्याचा कार्यक्रम सुरू आहे, नितेश राणेंप्रमाणे मला अडकविणयाचा प्रयत्न सुरू आहे. सरकार विरोधात बोललो म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,  शाईफेकीच्या घटनेचं मी समर्थन करत नाही, त्या घटनेशी माझा काहीही संबंध नाही. सुडबुद्धीने माझे नाव या प्रकरणात टाकण्यात आले असल्याचा आरोप आमदार राणांनी यावेळी केला. 



मानहानीचा गुन्हा दाखल करणार
माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्याने मी मानहानीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे यावेळी राणा म्हणाले. दरम्यान अमरावतीच्या महापालिका आयुक्तांवर काल झालेल्या शाईफेक प्रकरणात आमदार रवी राणांवर गु्हा दाखल करण्यात आलाय. रवी राणा  आणि इतर 11 आरोपींवर कलम 307 अंतर्गत हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप ठेवण्यात आलाय. या प्रकरणात पोलीसांनी आत्तापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. राजापेठ उड्डाणपुलावरील अनधिकृत पुतळा हटवल्यानं आयुक्तांवर काल शाईफेक करण्यात आली होती. या प्रकरणात युवा स्वाभिमान पक्षाच्या 5 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज अग्निशमन दल वगळता सर्व कार्यालयांमध्ये कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. राजपत्रित संघ आणि नगरपालिका प्रशासन, महसूल विभाग ही या आंदोलनात सहभागी होतील.


गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरुन माझ्यावर गुन्हा दाखल : रवी राणा 


गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आमदार रवी राणा यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे. ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राजकारण केलं. महानगरपालिका, पालकमंत्री, मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष देऊन त्या ठिकाणी पुतळा बसवू दिला नाही. प्रशासनावरही दबाव आणला असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे. तसेच गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरुन माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं आमदार रवी राणा म्हणाले आहेत. 


प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्नाचा गुन्हा


अमरावतीच्या महापालिका आयुक्तांवर काल झालेल्या शाईफेकीच्या विरोधात आज अग्निशमन दल वगळता सर्व कार्यालयांमध्ये कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. राजपत्रित संघ आणि नगरपालिका प्रशासन, महसूल विभाग ही या आंदोलनात सहभागी होतील.  राजापेठ उड्डाणपुलावरील अनधिकृत पुतळा हटवल्यानं आयुक्तांवर काल शाईफेक करण्यात आली होती. आयुक्तांवर शाईफेक करणाऱ्या सात जणांपैकी पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भारतीय दंडसहीता कलम 307 म्हणजेच प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.. यात पाचही आरोपी युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते असल्याचं कळतंय. 


काय आहे प्रकरण? 



राजापेठ उड्डाण पुलावरील छत्रपति शिवाजी महाराज पुतळा प्रकरणात महिलांनी संताप व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. काल (बुधवारी) दुपारी मनपा आयुक्त आष्टीकर हे त्यांच्या अंगरक्षक पोलीस कर्मचारी आणि मनपा अधिकारीसह उड्डाणपुलाखाली दाखल झाले. तेवढ्यातच दोन महिला आणि काही शिवप्रेमी दाखल होऊन काहीच वेळात मनपा आयुक्त आष्टीकर यांना पकडून त्यांच्या अंगावर काळी शाई फेकली. या झटापटीतून आष्टीकर यांनी पळण्याचा प्रयत्न ही केला. मात्र पुन्हा त्यांचा पाठलाग करून त्यांची कॉलर पकडून दोन महिलांनी शाई फेकून त्यांच्या विरोधात घोषणा देऊन तेथून पळ काढला. त्याचंवेळी मनपा आयुक्त आष्टीकर  यांच्या अंगरक्षक पोलीस कर्मचाऱ्याने धाव घेऊन त्यांना वाहनापर्यंत नेण्यात आले. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच महानगरपालिका मधील कर्मचारी-अधिकारी चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी कामबंद करून मनपा समोर येऊन आंदोलन सुरू केले. या घटनेचा मात्र संपूर्ण जिल्ह्यात निषेध केला जात आहे. 


आमदार राणांनी महापालिकेच्या परवानगीशिवाय पुतळा बसवला होता


12 जानेवारीला आमदार रवी राणा यांनी महापालिकेच्या परवानगीशिवाय राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. या पुतळ्यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे.  त्यानंतर रातोरात शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी दर्यापूरमध्ये पेट्रोलपंप चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. दरम्यान रवी राणा यांच्याकडून बसवण्यात आलेला पुतळा महापालिकेनं हटवला आहे. दरम्यान त्या रात्रीच पोलीस फौजफाट्यासह महापालिकेचं पथक राजापेठ उड्डाणपुलावर दाखल झालं होतं. तर  शिवसेनेनं दर्यापूरमध्ये बसवलेल्या पुतळ्याच्या ठिकाणीही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसंच पोलिसांनी शिवसेना तालुकाप्रमुखासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या पुतळ्याला महापालिकेने परवानगी द्यावी, अशी मागणी रवी राणा यांनी काही दिवसापूर्वी महापालिकेत केली होती, पुतळ्यावरून जिल्ह्यात राजकारण चांगलेच तापले असून यात शिवप्रतिष्ठानने सुद्धा उडी घेतल्याचे समजते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :