Unseasonal Rain : सध्या राज्यात अवकाळी पावसानं (Unseasonal Rains) जोर कायम आहे. राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली. दरम्यान, या  अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेकऱ्यांची (Farmers) पिकं जमिनदोस्त झाली आहेत. सध्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. 


नंदुरबार जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशी अवकाळी पाऊस


नंदुरबार जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील गोगापुर, भागापूर गावात जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. शहादा तालुक्यात देखील सायंकाळी सर्वत्र पाऊस झाला. हरभरा, गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नंदुरबार जिल्ह्यात पहिल्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसात 1700 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे सुरु झाले आहेत. मात्र, नंतर सलग पाच दिवस पाऊस आणि गारपीठ झाली आहे.




वाशिम जिल्ह्यात तीन दिवसापासून अवकाळी पाऊस


वाशिम जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटी झाली. यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. NDRF च्या प्राथमिक अहवालानुसार 4 हजार 505.90 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. महसूल विभाग आणि कृषी विभाग संयुक्तरित्या पंचनामे करत आहे. वाशिम जिल्ह्यात काही भागात काही गावात जास्त नुकसान झाले आहे. अंतिम आकडेवारी एक दोन दिवसात पूर्ण सर्व्हेक्षण झाल्यानंतर समोर येईल.


परभणी जिल्ह्यात अडीच हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान


परभणी जिल्ह्यात जवळपास अडीच हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. ज्यामध्ये परभणी, पूर्णा, सेलू, जिंतुर तालुक्यामध्ये नुकसान जास्त आहे. दोन दिवसामध्ये जवळपास 10 ते 15 टक्के पंचनामे झाले आहेत.




नांदेड जिल्ह्यात अवकाळीचा 10 तालुक्यांना फटका


नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा 10 तालुक्यांना फटका बसला आहे. एकूण 23 हजार 554 हेक्टर शेतातील पिकांचं नुकसान झालं आहे.


नाशिक जिल्ह्यात अवकाळीमुळं पिकांचं मोठं नुकसान


नाशिक जिल्ह्यातही अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची झोप उडवली असून जिल्ह्यातील चांदवड, येवला, निफाड, बागलाण, सटाणा देवळा आदी तालुक्यात कांद्यासह द्राक्ष बागांचे (Grapes Farm) प्रचंड नुकसान झाले आहे. निफाड तालुक्यातील कुंभारी, पंचकेश्वर, वनसगाव, उगाव, देवपूर, ब्राह्मणगाव, रानवड आदी भागांत पंधरा मिनिटे गारपीट झाल्याने कांदा, द्राक्षबागा संकटात सापडल्या, तर येवला, नांदगाव, देवळा तालुक्यात कांद्यासह मका, गहू, डाळिंबाचे प्रचंड नुकसान झाले आहे. गारपिटीचा फटका कांद्याच्या पातीवरच बसल्याने वाढ खुंटण्याची भीती व्यक्त होत आहे.


धुळे जिल्ह्यातही अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं नुकसान 


धुळे जिल्ह्यातही अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं नुकसान झालं आहे. शहरासह जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळं गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसाचे नुकसानीचे पंचनामे रखडले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Unseasonal Rain : राज्यात अवकाळीचा कहर, उभी पिकं जमिनदोस्त; बळीराजा संकटात