Maharashtra Rain : राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, काही ठिकाणी जोरदार पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यात तुफान पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. तसेच बीड, बुलडाणा, औरंगाबाद या जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे. त्याचबरोबर मुंबईसह ठाणे परिसरात देखील हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. दरम्यान, आजही हवामान विभागानं (Meteorological Department) राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. 
 
हवामान विभागानं  दिलेल्या अंदाजानुसार पाऊस पडत आहे. राज्यात काहीसा पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी मात्र जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह (Mumbai) ठाणे (Thane) परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला.  या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं. तसेच वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज देखील राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?


यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्‍हाला तत्‍काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्‍ही ठिकाण आणि तुमच्‍या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.


बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शेती पिकांचे नुकसान


बीड (Beed) जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील काही गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळं गावांमध्ये पाणीच पाणी झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहतू असून, काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. तसेच शेता पाणी शिरल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आष्टी तालुक्यातील काही सराटे वडगाव, आनंदवाडी या दोन गावांना पावसानं चांगलच झोडपलं आहे. या भागातील शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त भागाचे तातडीनं पंचनामे करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे. या ढगफुटीमुळं शेतील उडीद, मूग, कांदा या पिकाचे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शासनानं त्वरीत पंचनामे करावेत अशी मागणी, सराटे वडगावचे सरपंच राम बोडखे यांनी केली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: