शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरू, हालचालींना वेग : सूत्र
एबीपी माझा वेब टीम | 01 Nov 2019 12:03 AM (IST)
काँग्रेसनं कर्नाटकात फक्त भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वाधिक आमदार असूनही जनता दल सेक्युलरला पाठिंबा देत कुमारस्वामींना मुख्यमंत्रीपद देऊ केले. इथेही महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्यातून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस हायकमांड वेगळा विचार करू शकते, अशी माहिती आहे.
मुंबई : महाराष्ट्रात सरकार कुणाचं या सामन्याचा पुढचा अंक सुरू झाला आहे. कारण, आता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यातील अन्य तपशील गुलदस्त्यात असला तरी, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद आणि अन्य खात्यांची विभागणी असा तोडगा निघू शकतो. काँग्रेसनं यापूर्वीच शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास गांभीर्यानं विचार केला जाईल, असं जाहीर केल्यानं काँग्रेसही या नव्या समीकरणात महत्वाची ठरणार आहे. गेल्या काही दिवसात शिवसेना आणि राष्ट्रवादीची जवळीक वाढल्याचे चित्र आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काल शरद पवार यांची भेट घेतली होती तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असं वक्तव्य केलं होतं. तर निवडणूक निकालानंतर भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला फार महत्व न देण्यासारखं वर्तन ठेवल्याचा शिवसेनेला राग आहे. दिवाळीदरम्यान फडणवीसांनी सत्ता आणि मुख्यमंत्रीपदाबाबत समसमान वाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचं वक्तव्य केल्यानं पुढील चर्चा फिस्कटल्याची नाराजी उद्धव ठाकरेंनीही जाहीर मांडली होती. मात्र, त्यानंतरही भाजपकडून कोणताही ठोस संवाद शिवसेनेशी केला जात नाहीये. उपमुख्यमंत्रीपद आणि 16 मंत्रिपदं आणि त्यातही महत्वाची खाती भाजपकडेच याच फॉर्म्यूलावर भाजप अडून बसल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता शिवसेनेनंही आपले राखीव पत्ते काढले आहेत. हे देखील वाचा - मुख्यमंत्र्यांनी 'ते' वक्तव्य करायला नको होतं, म्हणून चर्चा फिसकटली : उद्धव ठाकरे दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जरी सुरूवातीला विरोधी बाकांवर बसण्याचे सूतोवाच केले असले, तरी भाजपला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी ते शिवसेनेला जवळ करणारच नाहीत असं मानायचं कारण नाही. खासकरून, भाजप आणि फडणवीसांनी संपूर्ण निवडणुकीत शरद पवारांवर टीकेचा रोख ठेवल्यानं आणि 'ईडी' प्रकरण केल्यानं, पवारांच्या मनात त्याचा राग असणं सहाजिक ठरू शकतं. भाजपची सत्ता कायम राहिल्यास ती राष्ट्रवादीच्या वाढीसाठीही अडचणीची ठरू शकत असल्यानं शरद पवरांकडून शिवसेनेबाबत सकारात्मक विचार होऊ शकतो. याला पवार-बाळासाहेब ठाकरे मैत्रीची पार्श्वभूमीही आहेच.