Gunaratna Sadavarte : अॅड गुणरत्न सदावर्ते 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याचसोबत पोलिसांनी आणखी आरोपींना अटक केली असून त्यामध्ये  चंद्रकांत सूर्यवंशी याचा  समावेश आहे. सूर्यवंशी  हा शरद पवारांच्या घरासमोर झालेल्या हल्ल्याच्या कटातील  प्रमुख संशयित आहे. आज गुणरत्न सदावर्ते यांचा वकील आज तिसऱ्यांदा बदलण्यात आला आहे. या अगोदर अॅड. महेश वासवानी, अॅड. गिरीश कुलकर्णी यांनी अॅड गुणरत्न सदावर्तेंची बाजू मांडली होती.  आज सदावर्तेंची बाजू  अॅड. मृणमयी कुलकर्णी यांनी मांडली.


सरकारी पक्षाची बाजू ही अॅड. प्रदीप घरत यांनी मांडली तर अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या वतीनं  अॅड. मृणमयी कुलकर्णी  यांनी युक्तीवाद केला. हा युक्तीवाद खालीलप्रमाणे,


सरकारी वकिल प्रदीप घरत यांचा युक्तीवाद 


सदावर्ते, पाटील आणि सूर्यवंशी यांची कस्टडी पुन्हा   हवी आहे. चंद्रकांत सूर्यवंशी याला आज पुण्यातून अटक केली आणि दोन वाजता आणण्यात आले आहे.  एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 409 आणि 406  ही कलमं वाढवली आहे.  करोडो रुपयांचा आर्थिक अपहार झाला आहे. एसटीचे लाखांच्या जवळपास कर्मचारी आहेत. त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळायची असेल तर छोट्या छोट्या भागात रक्कम घेतली तर जी रक्कम जमा झाली ती कोटींच्या स्वरुपात आहे. दोन कोटी रुपयांच्यावर पैसे गोळा केले आणि हो खर्च देखील केला नाही आहे. बाहेरील शक्तींकडून आंदोलनाचा खर्च केला गेला आहे. 7 एप्रिल 2022  ला रात्री 11 ते 2.50 पर्यंत सदावर्तेंच्या टेरेसवर अभिषेक पाटील, सुर्यवंशी, जयश्री पाटील आणि इतर लोकांची मीटिंग झाली. यातील जयश्री पाटील फराप असून त्या वॉन्टेड आहेत. या मिटींगमध्ये गपूरची व्यक्ती देखील सहभागी होती. सदावर्तेंना 2 कोटींहून अधिक रक्कम दिली गेली आणि ही रक्कम कॅशमध्ये होती. अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी हे आंदोलनाअगोदर  त्या नागपूरच्या व्यक्तीला समोरासमोर भेटले. त्या व्यवहाराची नोंद वहीमध्ये देखील केली गेली. त्या वहीसाठी सदावर्ते यांची कस्टडी पाहिजे आहे.  ही रक्कम कुठे ठेवली आहे याचा शोध घ्यायचा आहे. मुख्य म्हणजे कर्मचाऱ्यांकडून घेतलेल्या या रकमेसाठी कोणतीही पावती  दिली नाही. पोलिसांनी सादर केलेले सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे आहे. यासाठी अधिक  तपास करण्याची गरज आहे. त्यामुळे आरोपींची कस्टडी पाहिजे.  हल्ल्याच्या दिवशी काही आरोपींनी मद्यपान केलेलं होतं त्यासंदर्भातले मेडिकल सर्टिफिकेट सादर केले आहे. गुन्हा आर्थिक गैरव्यवहारसंदर्भातील  आहे. त्यामुळे हे गंभीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील  आर्थिक गुन्हे गंभीर असल्याचे म्हटले आहे. पैशांच्या लोभातून हे सर्व केलं आहे. त्यामुळे  सात दिवसांची कस्टडीची मागणी करत आहे.


गुणरत्न सदावर्तेंच्या वकीलांचा युक्तीवाद


एफआयआर मोर्चासंदर्भात होता आणि त्यात मुख्य आरोपीला गोवण्यात आले आहे. सोबत आता आर्थिक गैरव्यवहाराबद्दल बोललं जातंय. सोबतच माझ्या पत्नीला गोवण्यात येतं आहे. एका इन्व्हेस्टिगेशनवरुन दुसऱ्या गोष्टीवर हे सगळं नेण्यात येतं आहे. हा नागपूरवाला कधीच नागपुरमध्ये नाही आहे तर तो मुंबई आहे असं सांगितलं जातंय. नागपूर हा पर्सन आहे तर हे आतापर्यंत एका निष्कर्षापर्यंत पोहोचायला हवे होते. सीसीटीव्ही चेक करायला वेळ लागतात असं म्हणत आहेत मात्र हे सगळं उपलब्ध आहे. गुन्हा एका गोष्टीबद्दल दाखल झाला आहे आणि बोलणं आर्थिक गोष्टीबद्दल होत आहे. यासंदर्भात कुठे गुन्हा देखील दाखल नाही. जे आरोप आहेत ज्या गोष्टीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे त्यावर तपास केलाच जात नाही आहे. तसेच जी वही जप्त केली असे ते सांगतात ती आधीच केली आहे. फक्त कागदपत्र ताब्यात घेतल्याने कस्टडी मागत आहे. जयश्री पाटील यांचा काहीही संबध नसताना त्यांना आरोपी केलं गेलं आहे हे चुकीचं आहे. आरोपींकडून जी माहिती गोळा केली ती पुरेशी आहे. आता अजून कोणतीही माहिती नाही. न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनवायला हवी.