Maharashtra News Updates 17 October 2022 : दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात,
पुण्यातील मध्यवर्ती भाग नारायण पेठ, सदाशिव पेठ, स्वारगेट, नवी पेठ यासह कात्रज, कोंढवा, कर्वेनगर या उपनगरात देखील पावसाच्या जोरदार सरी,
आज दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाची रात्री सुमारास 9 वाजता सुरुवात ,
विजेच्या कडकडटासह शहरात पावसाची बॅटिंग.
पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात, पुण्यातील मध्यवर्ती भाग नारायण पेठ, सदाशिव पेठ, स्वारगेट, नवी पेठ यासह कात्रज, कोंढवा, कर्वेनगर या उपनगरात देखील पावसाच्या जोरदार सरी
आज दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाची रात्री सुमारास ९ वाजता सुरुवात
विजांच्या कडकडाटासह शहरात पावसाची बॅटिंग
अचलपूर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार शंकर श्रीराव यांना 18 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले..गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया अचलपूर पोलिस स्टेशनमध्ये सुरू आहे..काही दिवसांपूर्वी नायब तहसीलदार श्रीराव यांनी रेतीचा एक ट्रक पकडला होता. रेती तस्करीत पकडल्या गेलेल्या या ट्रकची कागदपत्रांची माहिती आरटीओ विभागाला न पाठविण्याबाबत त्यांनी संबंधिताला 20 हजार रुपयांची लाच मागितली होती..अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. अचलपूर तहसील कार्यालयात स्वतःच्या कक्षामध्येच 18 हजाराची लाच स्वीकारताना खुर्चीत बसलेल्या श्रीराव यांना ताब्यात घेतले..
Nagpur : परतीच्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. सोमवारीही सायंकाळी वरुणराजाने नागपूरात वीजांच्या कडकडाटासह दमदार हजेरी लावली. सायंकाळी सुरु झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मंगळवारीही काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मागिल तीन ते चार दिवसांपासून शहरातील विविध भागात पाऊस सुरु आहे.
Live updated
कॉंग्रेसच्या पाच सदस्यांनी भाजपला मतदान केल्याने शिंदे गटाचा वचपा काढण्यासाठी शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन सदस्यांनी देखील भाजपला मतदान केले. त्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये संत्तांतर झाले आहे. भाजपचे आदिवसी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची कंन्या सुप्रिया गावित या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. तर कॉंग्रेसच्या फुटीर गटाचे सदस्य सुहास नाईक हे उपाध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. आज झालेल्या निवडणुकांमध्ये दोघांनाही 31 मते मिळाली तर विरोधी पक्षाच्या उमेदवारांना 25 मते मिळाली आहेत. या सत्तांतराने भाजपने कॉग्रेस सोबतच शिंदे गटाला दिलेला हा एक धक्का मानला जात आहे.
दुबार विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांना रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागासह तालुक्यातील सर्व शासकीय विभागात मोठी खळबळ उडाली आहे. दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांच्यासह शिपाई खोत यांना पाच हजार रुपयांची लाच घेतानालाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
दुबार विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी डॉ. डांगे आणि शिपाई यांनी ही लाच मागितली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. आज तक्रारदाराने शिपाई खोत याला 5 हजार दिले. तो शिपाई थेट तो पैसे घेऊन अधीक्षकांच्या केबिनमध्ये गेला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून शिपाई आणि अधिक्षकाला कार्यालयात लाच घेताना रंगेहाथ पकडले. दरम्यान, याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे हे दौंड जिल्हा रुग्णालयाचा कार्यभार स्वीकारल्यापासून वादग्रस्त ठरले आहेत. त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोपही काही राजकीय पक्षांकडून करण्यात आला होता. त्यांच्या या कारभाराची चौकशी करण्याची मागणी ही अनेक राजकीय पक्ष व संघटनांकडून करण्यात आली होती.
अध्यक्षपदी काँग्रेसच्या मुक्ता कोकड्डे यांचा विजय झाला आहे. त्यांना 39 मते मिळाली. तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या कुंदा राऊत यांचा विजय झाला. भाजपने अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी भरलेले दोन्ही अर्ज मागे घेत काँग्रेसचे बंडखोर प्रीतम कवरे आणि नाना कंभाले यांना पाठिंबा दिला होता. त्यात अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रीतम कवरे यांना 18 मते मिळाली. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकित नाना कंभाले यांना 19 मते मिळाली. काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदार आणि राजेंद्र मुळक यांचा विजय झाला असला, तर त्यांची तीन मत फुटली.
Nagpur : नागपूर जिल्हा परिषदेत भाजपतर्फे अध्यक्ष पदासाठी नीता वलके आणि उपाध्यक्ष पदासाठी कैलास बरबटे अर्ज भरणार असून आज दुपारी 1 पर्यंत अर्ज भरण्याच मुदत आहे. विशेष सभेला दुपारी 3 वाजता जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात सुरुवात होईल.
Nagpur : नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अर्ज भरणे सध्या सुरु आहे. या अध्यक्ष पदासाठी कॉंग्रेसकडून केदार गटाचे कोकरडे आणि उपाध्यक्ष पदासाठी कुंदा राऊत अर्ज भरणार असल्याची माहिती आहे. आज दुपारी 1 वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार असून विशेष सभेला 3 वाजता सुरुवात होईल.
Pune Fire : पुण्यातील डेक्कन जिमखाना जवळील चॅम्पियन स्पोर्ट्स स्टोअर येथे आग लागली आहे. अग्निशमन दलाची पाच वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. आग विझवण्याचे काम सुरू आहे.
नागपूरः जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून आता आगामी सव्वादोन वर्षांसाठी अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. आज, सोमवारी विशेष सभेतून अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड होणार आहे. यासाठी दुपारी 3 वाजता जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात नागपूर शहर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी नामनिर्देशनपत्र वाटप व स्वीकारण्याची प्रक्रिया आता, सकाळी 11 वाजता सुरु होणार असून दुपारी 1 पर्यंत राहील. विशेष सभेला दुपारी 3 वाजता सुरुवात होईल.
अजित पवार आणि 76 संचालकांची पु्हा ईडी चौकशी
राज्य सहकारी बॅकेच्या 25 हजार कोटींच्या घोटाळ्याची ईडीमार्फत पुन्हा चौकशी
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात झालेल्या चौकशीचे प्रकरण पुन्हा रडारवर
मविआ शासनाने दाखल केलेल्या क्लोजर अहवालानंतर काही जनहित याचिका दाखल झाल्या होत्या
त्याला उत्तर देताना आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयाला पुन्हा चौकशी करण्याचे लेखी कळवले आहे
अजित पवार, शरद पवार यांच्या भूमिकेचे चौकशी करण्याची मागणी याचिकांच होती
त्यांची चौकशी न करताच क्लोजर अहवाल दिली होती.
Maharashtra Rain : परतीच्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना चांगलेच झोडपून काढले आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार (IMD), 17 आणि 18 ऑक्टोबरला म्हणजे आज आणि उद्या मुंबई शहर, उपनगर आणि आजूबाजूच्या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (Maharashtra Rainfall) पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सोमवरी आणि मंगळवारी मुंबईला यलो अलर्ट (Mumbai Yellow Alert) दिला आहे. तसेच ठाणे (Thane), रायगड(Raigad) पालघरसह(Palghar) राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
Congress President Election: आज काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी (Voting Prepration) मतदान केले जाणार आहे. मतदानासाठी देशभरातील 40 केंद्रांवर 68 बूथ स्थापन करण्यात आले आहेत. जेथे आज सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडेल. राज्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडेल.
विविध 18 जिल्ह्यांमधील 1 हजार 79 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 74 टक्के मतदान झाले. यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले.
राज्य निवडणूक आयोगाने 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या; तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे आज प्रत्यक्षात 1 हजार 79 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत प्राथमिक माहितीनुसार सरासरी 64.83 टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा होत्या. नक्षलग्रस्तभागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी उद्या (ता. 17 ऑक्टोबर) मतमोजणी होईल.
मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 134, पालघर- 336, रायगड- 16, रत्नागिरी- 36, सिंधुदुर्ग- 4, नाशिक- 187, नंदुरबार- 200, पुणे- 1, सातारा- 4, कोल्हापूर- 3, अमरावती- 1, वाशीम- 1, नागपूर- 15, वर्धा- 9, चंद्रपूर- 92, भंडारा- 19, गोंदिया- 5 आणि गडचिरोली- 16. एकूण- 1079.
Sanjay Sawant on Gulabrao Patil : धमक्या देऊ नका... आमचा जन्म शिवसेनेत झाला आहे. धमक्या द्याल तर त्याच पद्धतीनं उत्तर देणार, असं शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत (Sanjay Sawant) यांनी नाव न घेता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना आक्रमक इशारा जळगावमधील (Jalgaon News) शिवसेना मेळाव्यावेळी दिला आहे.
शिंदे गटाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांना धमक्या दिल्या जात आहेत. तसेच नगराध्यक्षां विरोधात पोलिसांना हाताशी धरून गुन्हे दाखल केलं जात असल्याचा आरोप केला जात आहे, यावरून उद्धव ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख संजय सावंत यांनी शिंदे गटाला जशास तसे उत्तर देत आक्रमक शब्दांत इशारा दिला आहे.
पार्श्वभूमी
मुस्लिम समाजामध्ये सुधारणेचं वारं आणणाऱ्या सर सय्यद अहमद खान यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1817 रोजी झाला. तसेच भारतीय चित्रपट सृष्ठीवर आपली छाप उमटवणाऱ्या स्मिता पाटील हिचाही आजच्याच दिवशी जन्म झाला होता. जाणून घेऊया आजचा दिवस इतिहासात कोणत्या घटनांचा साक्षीदार आहे.
1605- मुगल सम्राट अकबरचं निधन
तिसरा मुगल सम्राट अकबर याचं 17 ऑक्टोबर 1605 रोजी निधन झालं. अकबर हा धर्मनिरपेक्ष मुगल सम्राट म्हणून प्रसिद्ध होता.
1817- सर सय्यद अहमद खान यांचा जन्मदिवस
अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद अहमद खान यांचा आजच्या दिवशी म्हणजे 17 ऑक्टोबर 1817 रोजी जन्म झाला. सर सय्यद अहमद खान हे मुस्लिम धर्मातील प्रमुख सुधारणावादी होते. त्यांनी मुस्लिम समाजातील पडदा पद्धतीला विरोध केला आणि मुस्लिम धर्मातील अनेक अनिष्ठ रुढीविरोधात आवाज उठवला. सर सय्यद अमहद खान यांनी अलिगढ या ठिकाणी अलिगढ मुस्लिम विद्यापीठाची स्थापना केली. मुस्लिम समाजामध्ये केलेल्या सुधारणांमुळे ब्रिटिशांनी त्यांना सर ही पदवी दिली आणि त्यांचा गौरव केला.
1874- कोलकाता- हावडा ब्रिज वाहतुकीसाठी खुला
कोलकाता ते हावडा या दरम्यान हुगळी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाला 17 ऑक्टोबर 1874 रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. नंतरच्या काळात याच ठिकाणी प्रसिद्ध हावडा पुलाची निर्मिती करण्यात आली.
1906- स्वामी रामानंद तिर्थ यांचा जन्म
हैदराबाद मुक्ती संग्रामात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या स्वामी रामानंद तिर्थ यांचा आज जन्मदिवस. स्वामी रामानंद तिर्थ यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1906 रोजी झाला. स्वामी रामानंद तिर्थ यांनी हैदराबाद मुक्तीसंग्राम म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
1920- भारतीय कम्युनिस्ट पक्षाची ताश्कंद येथे स्थापना
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. या पक्षाची स्थापना 25 डिसेंबर 1925 रोजी कानपूर या ठिकाणी झाली असल्याची माहिती आहे. पण काही जणांच्या मते, त्या आधीही म्हणजे 17 ऑक्टोबर 1920 रोजी म्हणजे कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या स्थापनेनंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाल्याचं सांगितलं जातंय. सुरुवातीला मानवेन्द्र नाथ राय, अबनी मुखर्जी, मोहम्मद अली आणि शफ़ीक सिद्दीकी हे कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते.
1955- स्मिता पाटील हिचा जन्मदिन
आपल्या अभिनयाने संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीवर छाप पाडलेल्या स्मिता पाटील हिचा आज जन्मदिन आहे. 17 ऑक्टोबर 1955 रोजी पुण्यात तिचा जन्म झाला. स्मिता पाटीलने अनेक समांतर चित्रपटात काम केलं असून त्या माध्यमातून तिने रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. मंथन, भूमिका, आक्रोश, चक्र, चिदंबरम, मिर्च मसाला, उंबरठा हे तिचे काही गाजलेले चित्रपट आहेत.
1970- अनिल कुंबळे याचा जन्मदिन
भारतीय स्पिनर अनिल कुंबळे याचा 17 ऑक्टोबर 1970 रोजी जन्म झाला. एकाच कसोटी डावात 10 बळी घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे.
1979- मदर टेरेसा यांना नोबेलच्या शांती पुरस्काराने सन्मानित
आजच्याच दिवशी 17 ऑक्टोबर 1979 रोजी मदर टेरेसा यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना नोबेलच्या शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. देशातील रंजल्या-गांजल्या लोकांची सेवा करण्यासाठी मदर टेरेसा (Mother Teresa) यांनी आपले जीवन समर्पित केलं. त्यांनी भारतात आपल्या कार्याची सुरुवात केली. मदर टेरेसा यांना 7 ऑक्टोबर 1950 रोजी मिशनरी ऑफ चॅरिटी या (Missionaries of Charity) संस्थेची स्थापना करण्यासाठी मान्यता देण्यात आली. मदर टेरेसा यांनी ही संस्था कोलकात्यात स्थापन केली आणि आपल्या समाजकार्याला सुरुवात केली. आज त्यांच्या या संस्थेच्या माध्यमातून देशभरात शेकडो अनाथालयं आणि रुग्णालयं कार्यरत आहेत. या माध्यमातून लाखो लोक त्यांच्याशी जोडले गेले आहेत. मदर टेरेसा यांच्या या कार्याची दखल घेऊन 1979 साली त्यांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. तर 1980 साली त्यांना भारतरत्न देण्यात आला.
1998- नायजेरियात स्फोट, हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू
नायजेरिया देशातील जेसी नावाच्या शहरात 17 ऑक्टोबर 1998 रोजी गॅस पाईप लाईनचा स्फोट झाला. त्यामध्ये 1,082 लोकांचा मृत्यू झाला.
2003- चीनने अंतराळात मानव पाठवला
17 ऑक्टोबर 2003 रोजी अंतराळात मानव पाठवण्यात चीनने यश प्राप्त केलं. अशी कामगिरी करणारा चीन हा आशियाती पहिला देश तर जगातील तिसरा देश ठरला.
2009- समुद्राखाली मालदीवची कॅबिनेट बैठक
जागतिक तापमानवाढीच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी 17 ऑक्टोबर 2009 रोजी मालदिवमध्ये समुद्राखाली मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली होती. जागतिक तापमानवाढीचा फटका समुद्रकिनारी असलेल्या लहान देशांना मोठ्या प्रमाणात बसत असून भविष्यात हे देश पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी मालदिवने ही बैठक समुद्राखाली आयोजित केलं आणि या समस्येकडे लक्ष वेधून घेतलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -