Maharashtra News Updates : आंदोलनकर्त्या MPSC विद्यार्थ्यांच्या भेटीला शरद पवार दाखल

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Feb 2023 11:24 PM
MPSC : आंदोलक विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईल, हा माझा शब्द; शरद पवार

MPSC : आंदोलक विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईल, हा माझा शब्द आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. 

MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असल्याचे तज्ज्ञांचे मत; शरद पवार यांचे प्रतिपादन

MPSC Student Protest : आंदोलनकर्त्या MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. शरद पवार यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली

मुंबईत शिंदे गटाची कार्याकरिणी बैठक सुरू, बैठकीत पाच ठराव मांडले जाणार

मुंबईत शिंदे गटाची कार्याकरिणी बैठक सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाची पहिली कार्यकारिणीची बैठक मुंबईतील ताज प्रेसिडेन्सी हॉटेलमध्ये होत आहे. या कार्यकारिणीत  पाच राजकीय ठराव मांडले जाणार आहेत. 


हे ठराव मांडरे जाणार
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांचा अभिनंदन ठराव मांडला जाणार आहे. 


बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रकारे पक्ष चालवला त्याचप्रमाणे आपल्याही पक्षाची वाटचाल सुरु ठेवण्याचा मुद्दा असणार


सहा महिन्यांतील पक्षाची कामगीरी यावर चर्चा होणार 

एकाच कुटुंबातील तीन महिलांची हत्या, सोलापुरातील मंगळवेढा येथील नंदेश्वरमधील घटना 

सोलापूर जिल्ह्यातील नंदेश्वर येथे एकाच कुटुंबातील तीन महिलांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आलीय. मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील माळी वस्ती येथे ही घटना घडली आहे. पोलिस अधीक्षक घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.  

जालन्यातील 12 वीच्या परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाकडून तपासणी, 16 कॉपी बहाद्दर पकडले

आज बारावी बोर्डाच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरला कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. जालना जिल्ह्यातील सेवली येथे दोन परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन 16 कॉपीबहादरांना रंगेहात पकडलं. सेवली येथील लोकमान्य टिळक महाविद्यालय आणि जिल्हा परिषद शाळेच्या परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी अचानक भेट दिली. यावेळी दोन वेगवेगळ्या केंद्रावर 16 विद्यार्थी कॉपी करताना पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना तपासणी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. 

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना दिलासा, तूर्तास आरोपपत्र दाखल न करण्याचे निर्देश

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिलाय. कथित एसआरए घोटाळा प्रकरणी तूर्तास आरोपपत्र दाखल न करण्याचे मुंबई पोलिसांना कोर्टाने निर्देश दिले आहेत. मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी किशोरी पेडणेकर यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 

भिवंडीतील शिवाजी चौकात कंटेनरच्या धडकेत युवती ठार

भिवंडी शहरातील अत्यंत वर्दळीच्या सदैव गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात दुपारी दोन वाजताच्या सुमारास एका कंटेनरच्या धडकेत एक 25 वर्षीय दिव्यांग युवती ठार झाल्याची घटना घडली आहे. हा कंटेनर खाडीपार येथून अंजुरफाटा या भागात जात असताना शिवाजी चौकात ही दुर्घटना घडली असून अपघातानंतर कंटेनर चालक पळाला होता. परंतु काही नागरिकांनी त्याला पकडून  पोलिसांच्या स्वाधीन केले. या दुर्घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे. स्थानिक निजामपुरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत गर्दी पांगवीत मृत युवतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान, ठार झालेल्या युवतीची ओळख अजून पटली नाही. 

Ratnagiri News Update : धक्कादायक! हातखंबा तारवेवाडीत लागलेल्या वणव्यात शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

Ratnagiri News Update :  रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा तारवे वाडी येथे काजू बागेत लागलेल्या वनव्यामध्ये आग विझवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. गोविंद विश्राम घवाळी ( वय , 65 ) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.  

Solapur News : सोलापुरात वावटळामुळे चार एकर क्षेत्रावरील द्राक्ष बाग जमीनदोस्त; शेतकऱ्याचं 60 ते 65 लाखांचं नुकसान

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील अनगरमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या वावटळामुळे चार एकर क्षेत्रावरील द्राक्ष बाग जमीनदोस्त झाली आहे. या वावटळीमुळे बाबासाहेब गुंड या शेतकऱ्याचा तोंडचा घास हिरावला गेला आहे. यामध्ये गुंड यांचे काढणीस आलेले जवळपास 40 लाखांची द्राक्षे आणि 20 ते 25 लाखांच्या द्राक्ष बागेचे फाऊंडेशन असे साधारणपणे 60 ते 65 लाखांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी पुरता उध्वस्त झाला आहे. या वावटळामुळे बेदाण्याचे शेड आणि पॉलिहाऊसचे याचे देखील मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे दिवसाची रात्र करून पिकवलेले हे द्राक्ष पीक एका क्षणात होत्याचे नव्हते झाले आहे. त्यामुळे आता सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पीडित शेतकऱ्याने केली आहे.


 

Hingoli News: हळद खरेदीला व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली, सात दिवसापासून मार्केटयार्ड बंद

Hingoli News: मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी मोठ्या प्रमाणात हळद विक्रीसाठी हिंगोलीच्या बाजारात हळद आणतात हिंगोलीच्या संत नामदेव  मार्केटयार्डमध्ये मोठ्या प्रमाणात हळद विक्री साठी दाखल होते. परंतु हळदीचे भाव घसरल्याने व्यापाऱ्यांनी हळद खरेदीकडे पाठ फिरवली आहे . भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी हळद घरीच ठेवली होती आता हीच हळद कुठे विकायची आसा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. आता हळदीचे भाव 5500   पर्यंत घसरले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी हळद खरेदी बंद केली आहे. दरम्यान आता घरातील हळद कुठे विकायची हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे 

राईस मिलमुळे होणाऱ्या प्रदूषणाविरोधात गोंदियात लहान मुलांसह महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

Gondia News : गोंदिया शहरातील पिंडकेपार या परिसरात राईस मिलमधून निघणाऱ्या प्रदूषणामुळे या परिसरात राहणाऱ्या 50 ते 60 कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा राईस मिल मालकाला तसेच प्रशासनाला तक्रार करुन सुद्धा कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे चक्क शाळकरी आणि कॉलेजचे विद्यार्थी, तसेच महिला मोठ्या संख्येने मोर्च्यात सहभागी होत शेकडो लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या समस्या सांगून निवेदन दिले. आमचे आणि आमच्या मुलांचे आरोग्य धोक्यात आले असून यावर उपायोजना करत तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी केली केली.

Gondia News : लहान मुलांसह महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा; राईस मिलमुळे होणाऱ्या प्रदूषण विरोधात काढला मोर्चा

Gondia News : गोंदिया शहरातील पिंडकेपार या परिसरात राईस मिलमधून निघणाऱ्या प्रदूषणामुळे या परिसरात राहणाऱ्या 50 ते 60 कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात आलं आहे. अनेकदा राईस मिल मालकाला तसेच प्रशासनाला तक्रार करूनसुद्धा कोणतीही उपाय योजना करण्यात आली नाही. त्यामुळे चक्क शाळकरी आणि कॉलेजचे विद्यार्थी, तसेच महिला मोठ्या संख्येने मोर्च्यात सहभागी झाले होते. शेकडो लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. आमचे आणि आमच्या मुलांचे आरोग्य धोक्यात आले असून यावर उपायोजना करत तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी महिलांनी केली आहे.


 

Hingoli News:  तोतया जिल्हाधिकाऱ्यांची लाल दिव्याची गाडी जप्त, अनेक युवकांची लाखो रुपयांची फसवणूक

Hingoli News:  हिंगोली जिल्ह्यात तोतया जिल्हाधिकरी अमोल पजईचा भांडा फोड केल्यानंतर या प्रकरणातील फसवणुकीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. तोतया जिल्हाधिकारी एका लाल दिव्याच्या गाडीत फिरून अनेकांची फसवणूक करत असे. या गाडीवर भारत सरकार नाव देखील या गाडीवर लिहलेले होते. तोतया जिल्हाधिकाऱ्यांचा भांडाफोड केल्यानंतर ही लाल दिव्याची गाडी अचानक गायब झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेने या गाडीचा शोध घेतला असून या गुन्ह्यात वापरलेली ही लाल दिव्याची इनोव्हा कार आता पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. हिंगोली पोलीस आता या प्रकरणात पुढील तपास करत आहेत

तोतया जिल्हाधिकाऱ्याची लाल दिव्याची गाडी जप्त, अनेक युवकांची लाखो रुपयांना फसवणूक, हिंगोलीतील स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात तोतया जिल्हाधिकरी अमोल पजईचा पर्दाफाश केल्यानंतर या प्रकरणातील फसवणुकीचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. तोतया जिल्हाधिकारी एका लाल दिव्याच्या गाडीत फिरुन अनेकांची फसवणूक करत असे. तसंच त्याच्या गाडीवर भारत सरकार असं देखील लिहिलेले होते. तोतया जिल्हाधिकाऱ्याचा पर्दाफाश केल्यानंतर ही लाल दिव्याची गाडी अचानक गायब झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेने या गाडीचा शोध घेतला. गुन्ह्यात वापरलेली ही लाल दिव्याची इन्होवा कार आता पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. हिंगोली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Maharashtra Political Crisis: संसदेतील शिवसेना गटाचे कार्यालय शिंदे गटाला

Maharashtra Political Crisis: विधानसभेपाठोपाठ संसदेतील शिवसेना गटाचे कार्यालय शिंदे गटाला देण्यात आलं आहे. 

महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, एकच दादा अजित दादा... राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाबाहेर होर्डिंग्ज

जयंत पाटील यांच्यानंतर आता अजित पवार यांचे देखील होर्डिंग्ज


महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, एकच दादा अजित दादा... अशा आशयाचे होर्डिंग्ज राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाबाहेर

मुंबई महापालिकेसाठी भाजपचा आता मुस्लीम मतांवर डोळा, अल्पसंख्याक विभागाची आज बैठक

Mumbai News : मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपने मिशन 150 चा नारा दिला असून, आता भाजप त्या दृष्टीने कामाला लागले आहे. मराठी, उत्तर भारतीय मतासोबत आता भाजपने मुस्लीम मताकडे देखील लक्ष केंद्रित केलं आहे. यासाठीच भाजप उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याकडे असणारी मुस्लीम मते खेचण्यासाठी रणनीती आखत आहे. आज भाजपने अल्पसंख्याक विभागाची महत्त्वाची बैठक बोलावली असून, यामध्ये विविध कार्यक्रम ठरवले जातील.

HSC Exam: सुप्रिया सुळे यांनी दिल्या बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा

फए राज्यभरात आज  बारावीची बोर्डाची परीक्षा सुरू झालीय. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार आणि राष्ट्रवादीच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे यांनी बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेछा दिल्यात. पुरंदर तालुक्यातील नीरा येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयातील परीक्षा केंद्रावर जाऊन  सुळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात. तर विद्यार्थ्यांना  कोणत्याही दबावाशिवाय  कॉफी न करता पेपर लिहिण्याचा सल्ला दिला.


 





एकीकडे बारावीची परीक्षा दुसरीकडे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप; फटका मात्र शिक्षकांना

Non Teaching Staff Protest : एकीकडे बारावी बोर्डाची परीक्षा सुरु होत आहे मात्र दुसरीकडे राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालय आणि पदवी महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कामे सुद्धा बोर्डाच्या परीक्षेदरम्यान शिक्षकांनाच करावी लागत आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे संपाचा मोठा फटका हा शिक्षकांना बसत असल्याचा समोर येत आहे. मात्र जोपर्यंत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या लेखी मान्य होत नाहीत किंवा या संदर्भात शासन निर्णय जाहीर होत नाही तोपर्यंत हा संप सुरु राहणार असल्याचं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी इशारा दिला आहे.

वर्ध्यामध्ये रात्रीत गाड्यांची तोडफोड; तब्बल पंधरा गाड्या फोडल्या

Wardha Crime : वर्ध्याच्या हिंद नगर परिसरात माथेफिरुंनी रात्री एक वाजताच्या सुमारास तब्बल पंधरा फोर व्हीलर गाड्यांची तोडफोड केली. गणेश मंदिर परिसरातील चौकात हा थरार तेथील राहिवाशांनी रात्रीत अनुभवला. हातात रॉड घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. तोडफोड करत दहशत पसरवणाऱ्यांमध्ये तिघांचा समावेश आहे. गणेश मंदिर परिसरात घराच्या समोर उभ्या ठेवलेल्या चारचाकी गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. जवळपास 15 गाड्यांची तोडफोड केल्याने गाडीमालकाचे नुकसान झाले आहे. रात्रीत परिसरातील नागरिकांनी राम नगर पोलीस स्टेशन इथे घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे.

Sangli News: शिराळा तालुक्यातील रिळे भागात पाच गव्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू

Sangli News: शिराळा तालुक्यातील रिळे भागात पाच गव्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झालाय. एकाच ठिकाणी पाच गव्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. उत्तरीय  तपासणी मध्ये विषबाधा झाल्याने या गव्यांचा मृत्यू झाल्याचा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा  प्राथमिक अंदाज  आहे. मृत गव्यांपैकी दोन गव्यांचे मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत आढळले, उत्तरीय तपासणीनंतर मृत जागीच दहन करण्यात आले.

Pune Water Shortage: पुण्यातील पेठा, मध्यवर्ती भागासह काही भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद

Pune Water Shortage: पुण्यातील पेठा, मध्यवर्ती भागासह काही भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद. शुक्रवारी सकाळी कमी दाबाने होणार पाणीपुरवठा. पाणीपुरवठा विभाग काही भागात ‘फ्लो मीटर’ बसविण्याचं काम करणार असल्यानं पाणीपुरवठा राहणार बंद.

Mumbai News: मुंबईतल्या शिवसेना शाखांसमोर पोलिसांचा बंदोबस्त, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पोलीस सतर्क

Mumbai News: केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतल्याने मुंबई पोलीस सतर्क झालेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांची शाखांमध्ये घुसखोरी झाल्याच्या घटना यापूर्वी निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या शाखा असलेल्या मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना दक्ष राहण्यास सांगण्यात आलय. जेणेकरून शाखांमध्ये कोणतीही भांडणे किंवा वाद होऊ नयेत.

ShivSena Crisis: निवडणूक आयोगाचा निर्णय धक्कादायक, सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर त्याचा परिणाम होऊ शकतो : अनिल देसाई

ShivSena Crisis: घटनात्मक पेचावर योग्य उत्तर द्यावं आणि कोर्टानं लोकशाही वाचवावी : अनिल देसाई

Ratnagiri News: रत्नागिरी जिल्ह्यातील अंगणवाडी सेवीका बेमुदत संपावर

Ratnagiri News: कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी सोमवार २० फेब्रुवारी पासून संप पुकारला आहे.या आंदोलनात रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे साडेपाच हजार अंगणवाडी सेविका देखील सहभागी झाल्या असल्याचे अंगणवाडी कर्मचारी सेवा संघटनेने माहिती दिलेली आहे.

भूकंपप्रवण क्षेत्रात रत्नागिरी जिल्हा 'झोन 3 आणि 4 मध्ये, सुरक्षिततेसाठी बांधकाम क्षेत्रात आरसीसी बांधकामांकडे वाढला कल
Ratnagiri News:  तुर्कीत झालेल्या भूकंपाने या शहराची अपरिमित हानी केली आहे.त्यामुळे भूकंपाची भीती पुन्हा निर्माण झाली आहे.भूकंप प्रवण क्षेत्रात रत्नागिरी जिल्हा 3 आणि 4 क्रमांकाच्या झोन मध्ये म्हणजेच मध्यम स्वरूपाच्या आपत्तीत मोडतो. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी,लांजा,राजापूर आणि संगमेश्वर तालुक्याचा काही भाग भूकंप प्रवण क्षेत्रात मोडतो.मात्र या क्षेत्रातील भूकंपाची तीव्रता माध्यम स्वरूपाची नोंदवली गेली आहे. 1967 साली झालेल्या भूकंपाची तीव्रता सर्वाधिक होती. मात्र त्यानंतर जिल्ह्यात आतापर्यंत मध्यम स्वरूपाचे भूकंप झाल्याची नोंद झाली आहे.. 
नंदुरबारमध्ये तापमानात वाढ, वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले, रुग्णालयात गर्दी

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून वातावरणात बदल झाला असून दिवसा तापमान 30 अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे तर रात्री वातावरणात गारवा राहत आहे. यामुळे सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांच्या रुग्णसंखेत मोठी वाढ झाली असून जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये सर्दी ताप खोकल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात पाहण्यास मिळत आहेत. वातावरण बदलाचा परिणाम मानवी जनजीवनावर होत असल्याचे दिसून येत आहे. येत्या काळात उष्णता अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. तसेच थंडी ताप असलेल्या रुग्णांमध्ये मलेरियाची लक्षण आढळून येत असल्याने रक्त तपासणी करुन घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

Ratnagiri News: रत्नागिरी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर

Ratnagiri News: कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी सोमवार 20 फेब्रुवारीपासून संप पुकारला आहे. या आंदोलनात रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे साडेपाच हजार अंगणवाडी सेविका देखील सहभागी झाल्या असल्याचे अंगणवाडी कर्मचारी सेवा संघटनेने माहिती दिलेली आहे.

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाबाबत आजपासून सलग 3 दिवस सुनावणी

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आजपासून तीन दिवस सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होणार आहे. सुप्रीम कोर्टात तूर्तास पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. यात नबाम रेबिया प्रकरणानुसार पुढील सुनावणी व्हावी का याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह बहाल केलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं काल सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीये.  या याचिकेवर  तातडीने सुनावणी व्हावी अशी मागणी ठाकरे गटाच्या वकिलांनी कोर्टासमोर केली. परंतु सरन्यायाधीशांनी याचिकेवर तात्काळ सुनावणीस नकार दिला आणि आज हे प्रकरण मेन्शन करण्यास सांगितलं होतं. त्यामुळे आज सत्तासंघर्षाची सुनावणी आधी होते की ठाकरेंच्या याचिकेवर कोर्ट आधी सुनावणी घेतं हे पाहावं लागणार आहे...  निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाकडून आव्हान दिलं जाण्याची शक्यता गृहित धरून शिंदे गटाने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलंय. आमचं म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय निर्णय देऊ नये अशी विनंती शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाला केलीये. 

Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यात तापमानात वाढ; वातावरण बदलांमुळे सर्दी खोकला तापाच्या रुग्णांत वाढ

Maharashtra Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून वातावरणात बदल झाला असून दिवसा तापमान 30°c पर्यंत जात आहे तर रात्री वातावरणात गारवा राहत आहे. यामुळे सर्दी खोकला ताप यासारख्या आजारांच्या रुग्णसंखेत मोठी वाढ झाली असून जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये सर्दी ताप खोकल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात पाहण्यास मिळत आहेत. वातावरण बदलाचा परिणाम मानवी जनजीवनावर होत असल्याचे दिसून येत आहे. येत्या काळात उष्णता अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. तसेच थंडी ताप असलेल्या रुग्णांमध्ये मलेरियाची लक्षणं आढळून येत असल्याने रक्त तपासणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. 

Ratnagiri News: रत्नागिरीत बारावी परीक्षेवर भरारी पथकांची करडी नजर

Ratnagiri News: बारावी परिक्षा आजपासून सुरु होणार आहे.रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातून एकूण 26 हजार 423 विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. कॉपीसारख्या प्रकारावर परिक्षा काळात नजर ठेवण्यासाठी 6 भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. 

Chiplun News: चिपळूणात 'नाम' ने गाळ उपसा थांबवला



Chiplun News: गत वर्षापासून पूर मुक्त चिपळूण शहरासाठी पुढाकार घेतलेल्या नाम फाउंडेशनने या वर्षी मुंबईतील बैठकीत वाशिष्टी नदीतील पहिल्या टप्प्यातील गाळ उपसाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली. त्यानुसार यंत्र सामग्री लावून चार ठिकाणी गाळ उपसाही सुरू केला. मात्र गेल्या काही दिवसांपासून सतत स्थानिकांचा विरोध होत असलेल्या उक्ताड बेटावरील गाळ उपसा नाम फाउंडेशनने थांबवला आहे. 



CM Eknath Shinde at Pune : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिवंगत लक्ष्मण जगताप कुटुंबियांची मध्यरात्री घेतली भेट

CM Eknath Shinde at Pune : पुणे दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिवंगत लक्ष्मण जगताप कुटुंबियांची मध्यरात्री भेट घेतली. या भेटीत लक्ष्मण जगतापांच्या आठवणींना उजाळा देतानाच अश्विनी जगतापांचा प्रचाराबाबत ही त्यांनी आढावा घेतला. बुधवारी मुख्यमंत्री स्वतः अश्विनी जगतापांच्या प्रचारासाठी एक जाहीर सभा ही घेणार आहेत. भेटीनंतर माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याबद्दल विचारलं असता ते बिचारे गेले आता हा विषय संपला. असं म्हणून निघून गेले.

Chiplun News: चिपळूणात 'नाम' ने गाळ उपसा थांबवला, उक्ताड बेटावर नागरिकांचा विरोध

Chiplun News:  पूरमुक्त चिपळूण शहरासाठी पुढाकार घेतलेल्या नाम फाउंडेशनने या वर्षी मुंबईतील बैठकीत वाशिष्टी नदीतील पहिल्या टप्प्यातील गाळ उपसा ची पूर्ण जबाबदारी स्वीकारली.त्यानुसार यंत्र सामग्री लावून चार ठिकाणी गाळ उपसा ही सुरू केला.मात्र गेल्या काही दिवसांपासून सतत स्थानिकांचा विरोध होत असलेल्या उक्ताड बेटावरील गाळ उपसा नाम फाउंडेशनने थांबवला आहे

Maharashtra Shiv Sena Political Crisis : 26 फेब्रुवारीला ठाकरे गटाकडून वरळी येथे शिवसैनिकांचा निर्धार मेळावा

Maharashtra Shiv Sena Political Crisis : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गट शिवसैनिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार 


 26 फेब्रुवारीला ठाकरे गटाकडून वरळी येथे शिवसैनिकांचा निर्धार मेळावा


जांभोरी मैदान येथे होणार भव्य मेळावा 


या सभेत आदित्य ठाकरे,अरविंद सावंत, भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे करणार उपस्थिताना  मार्गदर्शन

Thane Water Shortage: ठाण्यात चार ते पाच दिवस पाणी टंचाई

Thane Water Shortage: ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून पाणी पुरवठा करणाऱ्या एका मुख्य जलवाहिनीच्या गळतीची दुरुस्ती, तीन हात नाका येथे मुख्य जलवाहिनीची जोडणी करणे, दैनंदिन देखभाल दुरुस्ती अशी विविध कामे 21 ते 24 फेब्रुवारी या कालावधीत पाणी पुरवठा विभागाकडून केली जाणार आहेत. या कामांमुळे शहरात केवळ 50 टक्के पाणी पुरवठा केला जाणार असल्याने अनेक भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

Pune Bypoll Elections: चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाची नोटीस

Pune Bypoll Elections: चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार अश्विनी जगतापांना निवडणूक आयोगाने नोटीस धाडली आहे. पेड न्यूज प्रकरणांत ही नोटीस दिल्याचं निवडणूक विभागाकडून सांगण्यात आलंय. एका वेबसाईट आणि साप्ताहिकामध्ये एक बातमी आली आहे, त्यातील मजकूर हा पेड न्यूज सदृश्य असल्याचे निदर्शनास आलं आहे. यासाठी नेमण्यात आलेल्या माध्यम प्रमाणीकरण आणि सह नियंत्रण समिती अर्थात एमसीएमसीने याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठवले. त्यानुसार अश्विनी जगतापांना 16 फेब्रुवारीला नोटीस धाडण्यात आली असून 20 फेब्रुवारीला त्यांचा खुलासा आल्याचं ही बोललं जातंय. हा खुलासा आता एमसीएमसी समितीकडे पाठविण्यात आलेला आहे. आता ही समिती पडताळणी करून पुढील कारवाई निश्चित करणार आहे.

Shivsena:  निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गट शिवसैनिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न, 26 फेब्रुवारीला ठाकरे गटाकडून  वरळीत मेळावा

Shivsena:  निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गट शिवसैनिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 26 फेब्रुवारीला ठाकरे गटाकडून  वरळी येथे शिवसैनिकांचा निर्धार मेळावा आहे. जांभोरी मैदान येथे भव्य मेळावा  होणार आहे.  या सभेला आदित्य ठाकरे,अरविंद सावंत, भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे करणार उपस्थितांना  मार्गदर्शन करणार आहेत. 

HSC SSC Exam:  दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्राजवळ जमावबंदी आदेश, जिल्हाधिकाऱ्यांनी केले कलम 144 लागू.

HSC SSC Exam:  दहावी, बारावीच्या परीक्षा सुयोग्य वातावरणात पार पाडण्यासाठी विविध उपायोजना करण्यात येत आहे. परीक्षेतील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यासोबतच आता बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी परीक्षा केंद्राच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. यासाठी फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी जिल्ह्यातील परिक्षेदरम्यान होणारे गैरव्यवहार टाळण्यासाठी सर्व परीक्षा केंद्राच्या परिसरामध्ये परीक्षा कालावधीत परिक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात संगणक सेंटर, झेरॉक्स सेंटर, मोबाईल सेंटर परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास आधीपासून परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले आहे.

Sangli News: शिराळा तालुक्यातील रिळे भागात पाच गव्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू

Sangli News: शिराळा तालुक्यातील रिळे भागात पाच गव्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू



  • एकाच ठिकाणी पाच गव्यांचा मृतदेह  आढळून आल्याने खळबळ

  • उत्तरीय  तपासणी मध्ये विषबाधा झाल्याने या गव्यांचा मृत्यू झाल्याचा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा  प्राथमिक अंदाज 

  • मृत गव्यांपैकी दोन गव्यांचे मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत आढळले 

MPSC Protest: पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच

MPSC Protest:  पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे.. दरम्यान आंदोलनस्थळावरील स्ट्रीट लाईट काल बंद करण्यात आल्या होत्या. त्यावेळी आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलच्या टॉर्च लावत आंदोलन सुरूच ठेवल्याचं पाहायला मिळालं.  नवी परीक्षा पद्धती 2025 पासून लागू करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी एमपीएससीचे  विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत.  आज सकाळीही  पुण्यातल्या  झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात आंदोलन सुरुच आहे 

आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात, नंदुरबार जिल्ह्यात 27 केंद्रावरून 17000 विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

HSC Exam :   आजपासून बारावीचे परीक्षा सुरू होत असून, जिल्ह्यात कॉफी मुक्त परीक्षा व्हावी  यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील परीक्षा केंद्र आदिवासी दुर्गम भागात असल्याने दुर्गम भागातील केंद्रावर   कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, तर परीक्षा केंद्रांसाठी भरारी पथकाची नियुक्ती आलेली आहे. जिल्ह्यातील 27 केंद्रांवरून 16 हजार 748 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. जिल्ह्यात कॉफी मुक्त परीक्षा होण्यासाठी शाळा परिसरातील झेरॉक्सच्या दुकाना बंद ठेवण्याचे आदेश दुकानदारांना देण्यात आलेले आहे. त्यामुळे यंदाचे बारावीचे परीक्षा कॉफी मुक्त होण्यासाठी शिक्षण विभाग सर्वत्र प्रयत्न करत आहे. परीक्षा केंद्र परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून जिल्ह्यातील 27 परीक्षा केंद्र 300 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी दिली आहे

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


 आजपासून महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. तर, त्याच वेळी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने परीक्षा घेणे हे मोठे आव्हानात्मक काम असणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी अपेक्षित आहेत. आज सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू होणार आहे. तर, निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेची आज बैठक होणार आहे. 


आजपासून बारावीच्या बोर्ड परीक्षेला सुरुवात 


आजपासून राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यातून बारावीच्या परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले आहेत. संपूर्ण राज्यात 3195 केंद्रावर ही परीक्षा होत आहे. राज्यभरात संपूर्ण परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी 21,396 कर्मचारी कार्यरत असतील. 271 भरारी पथके संपूर्ण राज्यभरात परीक्षा दरम्यान काम करतील.  सकाळी सत्रातील परीक्षा अकरा वाजता सुरू होणार असून विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी म्हणजे साडेदहा वाजता हजर राहायचं आहे तर दुपारची सत्रातील परीक्षा तीन वाजता सुरू होणार असून विद्यार्थ्यांनी अडीच वाजता परीक्षा केंद्र उपस्थित राहणे अनिवार्य आहे. 


शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आंदोलन


राज्यातील महाविद्यालय आणि विद्यापीठातील शिक्षेकतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय आणि विद्यापीठातील शिक्षेकतर कर्मचारी धरणे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचा परिणाम बारावीच्या परीक्षेवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 


दिल्ली 
- महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत आजपासून तीन दिवस सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होणार आहे. सुप्रीम कोर्टात पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. 


निवडणूक आयोगाने शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह बहाल केलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल होणार आहे.


मुंबई 
- राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता मंत्रालयात होणार आहे. शिंदे गटाला शिवसेना नाव आणि चिन्हं मिळाल्यानंतर पहिली मंत्रीमंडळ बैठक आहे. 


- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. 


- आजपासून पहिली डबलडेकर इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस सीएसएमटी आणि एनसीपीएदरम्यान धावणार आहे. 


 पुणे 
- कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय काकडे यांची सभा होणार आहे. तर,  कॉंग्रेसचे कसब्याचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी सुषमा अंधारेंची सभा होणार आहे. 


- चिंचवड पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांचा रोड शो होणार आहे.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.