Government Job: राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी महत्वाची बातमी असून, पशुसंवर्धन विभागात विविध 446 पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागात सर्वात मोठी भरती जाहीर करण्यात आली असून, यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना याचा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे पशुसंवर्धन विभागाच्या कामाला आणखी गती मिळणार आहे.


गेल्या वर्षी राज्यात लम्पी संसर्गामुळे मोठ्याप्रमाणात जनावरे दगावले. विशेष म्हणजे यावेळी पशुसंवर्धन विभागावर मोठी जबाबदारी आली आणि ताण देखील पडला होती. त्यामुळे लम्पी संसर्गाच्या वेळी पशुसंवर्धन विभागात पदांची कमतरता लक्षात घेता, आवश्यक त्या पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची घोषणा पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. त्यानुसार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत निर्णय घेत ही पशुसंवर्धन विभागाची पदभरती जाहीर केली आहे. ज्यात पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून सरळसेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे. 


असे पद भरणार?


पशुधन पर्यवेक्षकची 376 पदे, वरिष्ठ लिपीकची 44 पदे, लघुलेखक (उच्च श्रेणी) ची 02 पदे, लघुलेखक (निम्नश्रेणी) ची 13 पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञची 04 पदे, तारतंत्रीची 03 पदे, यांत्रिकीची 02 पदे, बाष्पक परिचरची 02 पदे अशी एकूण 446 पदे भरली जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले आहे. 27 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे, तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची अंतिम तारीख 11 जून रोजी रात्री 11. 59 वाजेपर्यंत आहे. तसेच यांची परीक्षा येत्या जुलै महिन्यात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


तरुणांना संधी मिळणार! 


राज्य सध्या बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच शासकीय नोकऱ्यांसाठी लवकर जागा निघत नाही. त्यात निघालेल्या जागेसाठी येणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठी असते. त्यामुळे मोठ्याप्रमाणात शासकीय नोकरभरती काढण्याची मागणी सतत केली जाते. दरम्यान आता पशुसंवर्धन विभागात विविध 446 पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबवली जाणार असल्याने तरुणांनी संधी मिळणार आहे. ज्यात सर्वधिक वरिष्ठ लिपीकची 44 पदे भरले जाणार आहेत. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


केंद्र सरकारमध्ये नोकरी लावतो म्हणून तरुणांना लाखोंचा गंडा, तोतया अधिकाऱ्याला पोलिसांनी घातल्या बेड्या