Afternoon Headlines : राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


राज्यातील हिंसाचारामागे उद्धव ठाकरेंचा हात आहे का?; शिरसाट यांच्याकडून चौकशीची मागणी


शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत 'एसआयटी'मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. 2004 साली मातोश्रीवर झालेल्या एका बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्यात हिंसाचार घडवण्याच्या सूचना दिल्या असल्याच्या नितेश राणे यांच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी शिरसाट यांनी केली आहे. तर यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या सर्व प्रकरणाची 'एसआयटी'मार्फत चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे शिरसाट म्हणाले आहेत. त्यामुळे यावरुन आता राजकीय वातावरण आणखीच पेटण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर


हिंदू महासंघाकडून प्रवेशद्वारावर शुद्धीकरण, त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदू महासंघ आक्रमक


त्र्यंबकेश्वर येथील घटना नंतर हिंदू महासंघ आक्रमक झाला असून आज सकाळी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर शुद्धीकरण करण्यात येऊन पूजन करण्यात आले. यावेळी हिंदू महासंघासह अनेक हिंदू संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे, नाशिक येथील हिंदू संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाचा सविस्तर


पांघरुणासाठी दिलेल्या चादरीने आरोपीने गळफास घेतला; विश्रामबाग पोलिसांच्या लॉकअपमध्येच आरोपीने संपवलं आयुष्य


पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. त्यात दहशत माजवणे, हत्या आणि चोरींच्या प्रकरणांमध्येही वाढ झाली आहे. त्यातच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पोलीस कोठडीत चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाजी उत्तम गरड असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना आज (17 मे) सकाळी 6 वाजता उघडकीस आली. वाचा सविस्तर


विखे ज्या पक्षात जातात त्याच पक्षाच्या विरोधात काम करतात : राम शिंदे


जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे शरद कार्ले यांची ईश्वर चिठ्ठीने निवड झाली. मात्र जरी भाजपच्या ताब्यात बाजार समितीच्या चाव्या आल्या असल्या तरी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील  खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. सुजय विखे पाटील यांचे पीए आणि कार्यकर्त्यांनी भाजप आमदार राम शिंदे यांच्या पॅनलच्या विरोधात उमेदवार उभे केल्याने राम शिंदे यांनी विखेंवर जोरदार टीका केली आणि याबाबत पक्षश्रेष्ठींना अहवाल सादर करणार असल्याचे शिंदे म्हणाले. सोबतच विखे ज्या पक्षात जातात त्याच पक्षाच्या विरोधात काम करतात हे ऐकलं होतं, आता त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला असंही राम शिंदे म्हणाले. वाचा सविस्तर


...तोपर्यंत छत्रपती संभाजीनगर नव्हे औरंगाबादच; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश


गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद नामांतराचा मुद्दा कायम चर्चेत आहे. दरम्यान अशातच आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी उच्च न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत महसूल व इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयाने 'औरंगाबाद' हेच नाव लिहावे, असे आदेश काढले आहेत. त्यामुळे नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वाचा सविस्तर