एक्स्प्लोर
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ठाकरे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार; छगन भुजबळांची माहिती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन नऊ दिवस उलटले आहेत. अद्याप मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप झालेलं नाही. त्यामुळे राज्यातील लोकांना मंत्रीमंडळ विस्ताराची आणि खातेवाटपाची प्रतीक्षा आहे.

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन नऊ दिवस उलटले आहेत. अद्याप मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप झालेलं नाही. विरोधक मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्यासोबत शपथग्रहण केलेल्या मंत्र्यांना बिनखात्याचे मंत्री म्हणू लागले आहेत. त्यामुळे राज्यातील लोकांना मंत्रीमंडळ विस्ताराची आणि खातेवाटपाची प्रतीक्षा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीदेखील शपथग्रहण केली आहे. आज पुण्यात माध्यमांच्या प्रतिनिधींनी भुजबळ यांना मंत्रीमंडळ विस्ताराबाबत विचारले, यावर उत्तर देताना भुजबळ म्हणाले की, विधीमंडळाचं अधिवेशन सुरु झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. विधीमंडळाचं अधिवेश 16 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. 17 डिसेंबर किंवा त्यानंतरच ठाकरे सरकारचा विस्तार होईल, असे बोलले जाऊ लागले आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपासाठी सर्व महाविकास आघाडीच्या आमदारांना आणि राज्यातील जनतेला अजून 9 ते 10 दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं आहे. 28 नोव्हेंबर रोजी मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर इतर 6 नेत्यांनी (शिवसेना 2 + राष्ट्रवादी + काँग्रेस 2) मंत्रीपदांची शपथ घेतली. मात्र या मंत्र्यांना अद्याप खातेवाटप करण्यात आलेलं नाही. 30 नोव्हेंबर रोजी झालेल्या बहुमत चाचणीत महाविकास आघाडीने त्यांच्याकडील बहुमत सिद्ध केलं आहे. तिन्ही पक्षांचा कॉमन मिनिमम प्रोग्रामदेखील ठरला आहे. महाविकास आघाडी स्थापन होण्यापूर्वी तिन्ही पक्षांमधील प्रमुख नेत्यांमध्ये अनेक बैठका, चर्चा झाल्या आहेत. या बैठका अजूनही सुरुच आहेत. परंतु अद्याप खातेवाटप आणि मंत्रीमंडळ विस्ताराचं घोडं कुठे अडकलं आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात मंत्रीपदांबाबत रस्सीखेच सुरु असल्यामुळे खातेवाटपला मुहूर्त मिळत नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. यावर पुढील 7-8 दिवसात तोडगा निघाला नाही तर मंत्रीमंडळ विस्तार लांबेल.
आणखी वाचा























