मुंबई : राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ  लागली आहे. काही दिवसांपासून रोज 9 हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्ण वाढत आहेत. अशात आज 8, 418 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 10 हजार 548 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 58 लाख 72 हजार 268 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.06 टक्के आहे. 


राज्यात आज 171 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.02 टक्के झाला आहे. तब्बल 32 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 1 लाख 14 हजार 297 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यवतमाळ (50), हिंगोली (84), गोंदिया (89) या तीन जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 16,524 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 


भंडारा जिल्ह्यात रुग्णसंख्या शुन्यावर 


भंडारा जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर कोल्हापुरात सर्वाधिक 1328 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,29,08,288 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61,13, 335(14.25 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,38,832 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,487 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासात 453 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


 मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे.   मुंबईत गेल्या 24 तासात 453 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 482 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 6,99,823 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 7,908 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 822 दिवसांवर गेला आहे. 


पुण्यात 268 नव्या रुग्णांनी नोंद


पुणे महापालिका क्षेत्रात आज 268 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 226 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या 2716 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज पुण्यात 5 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे.