मुंबई : दिल्लीतील आपच्या विजयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. स्वत:ला देशप्रेमी समजणाऱ्यांच्या मनातील भ्रमाचा भोपळा दिल्लीकरांनी फोडला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तसेच अरविंद केजरीवाल यांनी जन की बात देशाला दाखवून दिली असा टोलाही त्यांनी लगावला आहे.


दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात दिल्लीकरांनी आम आदमी पक्षाला कौल दिला. निकालात भाजप आणि आपमध्ये मुख्य लढत झाली. त्यात आम आदमी पक्षाने 60 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप आठ जागी आघाडीवर आहे. याशिवाय काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.

Delhi Elections Result 2020 | दिल्लीमध्ये सत्याच्या विजय झाला : रोहित पवार | ABP Majha



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे आणि दिल्लीतील जनतेचे मन:पूर्वक अभिनंदन केले. दिल्लीतील जनतेने 'मन की बात नव्हे तर जन की बात आता देशात चालणार' हे दाखवून दिले आहे. तथाकथीत राष्ट्रीय विचारांचे सरकार दिल्लीत असून आणि त्यानी सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा झाड़ू समोर टिकाव लागला नाही.बलाढ्य पक्षाने आपले रथी महारथी निवडणुकीत उतरवून, अरविंद केजरीवाल यांची थेट दहशदवाद्यांशी तुलना करुन, स्थानीक प्रश्नावरुन दुर्लक्ष करण्यासाठी विनाकारण आंतरराष्ट्रीय विषय आणून मतदारांचे मन विचलीत करण्याचा प्रयत्न करुन सुद्धा अरविंद केजरीवाल याना ते पराजीत करू शकले नाहीत.

दिल्लीतील जनता विकास करणाऱ्या प्रामाणिक माणसाच्या मागे ठामपणे ऊभी राहिली आणि जनतेने लोकशाही वरचा भरोसा कायम असल्याचे दाखवले. आपण तेवढेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे आणि इतर सर्व देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा ही दिल्लीकर मतदारांनी फोडला, दिल्लीकर जनतेचे आणि अरविंद केजरीवाल यांचे मी महाराष्ट्रातर्फे आणि शिवसेनेतर्फे मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी विकासमय वाटचालीस शुभेच्छा देतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या : 

Delhi Election Results | भाजपच्या पराभवाची मालिका थांबणार नाही : शरद पवार

Delhi Election Results | महाराष्ट्रातून नेत्यांची रसद पुरवूनही दिल्लीत भाजप अपयशी

Delhi Election Results | मनोज तिवारींच्या त्या ट्वीटवर ट्रोलधाड