मुंबई :  निवडणुकांच्या तयारीला लागा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. सोमवारी  उशीरा रात्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेतील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत होऊ घातलेल्या निवडणुकांवर चर्चा झाल्याचं समजतंय. विरोधकांना योग्य वेळी उत्तर देईन, मात्र कार्यकर्त्यांनी शिवसेना घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असा संदेश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्याची माहिती समोर आली आहे. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री जरी असले तरी शिवसेनेसाठी मुंबई महानगरपालिका जीव की प्राण समजला जातो.  येत्या काही महिन्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेही आतापासूनच तयारीला लागले आहेत. काहीही करून पालिकेतली सत्ता आपल्याच ताब्यात ठेवण्याचा शिवसेनेचा मानस आहे.  


निवडणुकांसाठी तयार राहण्याचे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंचे आदेश 


2022 हे निवडणुकांचं वर्ष म्हणून पाहिलं जातं आणि म्हणून 
उद्धव ठाकरेंनी भगवा फडकवण्यासाठी आपल्या सेनेला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.  या आदेशामुळेच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक वेळेतच होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याच निवडणुकीच्या तयारीसाठी खास बैठक बोलण्यात आली होती आणि सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले. 


या बैठकीत शिवसेनेचे  मुंबईतले विभागप्रमुख, नगरसेवक, नेत्यांच्या उपस्थिती होती. उद्धव ठाकरे यांनी ॲानलाईन संवाद साधला यामध्ये "मी सध्या आजारी असल्यानं माझ्यावर टीका होत आहे. त्या टीकेला मी योग्य वेळी उत्तर देईन, तुम्ही पक्षबांधणीवर लक्ष द्या", असे म्हणले.  उद्धव ठाकरेंचे हे आदेश आगामी काळात लवकरच निवडणुका होणार असल्याचे संकेत आहेत, सध्या कोरोनाचं वाढतं प्रमाण, ओबीसी आरक्षणासारखे मुद्दे लक्षात घेता निवडणुका लांबणीवर जाणार असल्याची चर्चा सुरु होती पण आता ठाकरेच्या आदेशानं निवडणुका वेळेतच होतील अशी चर्चा सुरु झाली आहे 


राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे.  त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या आदेशानं विरोधी पक्ष भाजपसह मनसेही तयारीला लागणार यांत शंका नाही पण ठाकरेंच्या बैठकीनंतर आणि आदेशानतर दोन्ही विरोधी पक्षानं  उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. 


मुंबई पालिकेत कमळ फुलवण्याचं भाजपचं स्वप्न आहे मागे झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप आमनेसामने होते. त्यानंतर अपक्षांच्या साथीनं शिवसेनेनं महापालिकेवर भगवा झेंडा फडकवला.  यंदाच्या निवडणुकीत वार्ड रचनेसह वाढीव वॉर्ड असा वेगळाच आरखडा तयार करण्यात आला आहे.  मुंबईत ख-या अर्थानं लढाई होईल ती शिवसेना आणि भाजपमध्येच त्यामुळे ठाकरेंनी दिलेल्या आदेशानंतर इतर पक्ष आत काय रणनिती आखणार आणि शिवसेनेला सत्तेपासून रोखणार का हे आगामी निवडणुकांमध्ये समजेल. 



इतर महत्त्वाच्या बातम्या :


Aaditya Thackeray : नववर्षात आदित्यपर्व! आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचं धनुष्य आदित्य ठाकरेंच्या खांद्यावर


मुंबई पालिकेत 9 वॉर्ड नव्यानं समाविष्ट करणार, निर्णयाविरोधात भाजप नगरसेवकांची उच्च न्यायालयात याचिका


Raj Thackeray Nashik Daura : मनसेचा पुनरुज्जीवनाचा 'मेगा प्लॅन'; राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा, आज नाशिकमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद