मुंबई : 2022  या वर्षात  मुंबईसह राज्यातील इतर महत्त्वाच्या महापालिकांतील आगामी निवडणुकांच्या निमित्तानं राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेने देखील एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray)सरकारचं नेतृत्व करत आहेत पण सध्या उद्धव ठाकरेंची तब्येत आणि भविष्यात निवडणुका पाहता शिवसेनेत निवडणुकांची धुरा आदित्य ठाकरे  (Aaditya Thackeray)यांच्या खांद्यावर असणार आहे. तसेच आणखी काही  काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीबरोबरच राज्यात पुढील काळात शिवसेनेच नेतृत्व ठळकपणे आदित्य ठाकरे यांनाच पुढं आणण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.


मुख्यमंत्री पद आणि तब्येत यामुळे उद्धव तह


उद्धव ठाकरे यांच्याकडं मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी असल्यानं आणि तब्येत बरी नसल्याने साहजिकच निवडणुकीचं व्यवस्थापन, रणनीती, उमेदवार निवड व प्रचाराच्या बाबतीत त्यांच्यावर मर्यादा येणार आहेत. त्यामुळं या सर्व जबाबदाऱ्यांसाठी आदित्य ठाकरे यांचं नाव पुढं आले आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडं पर्यावरण व पर्यटन खातं असून ते मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी मुंबईतील अनेक विकासकामांमध्ये लक्ष घालणं सुरू केलं आहे. मिठी नदी प्रकल्प, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, मुंबई महापालिकेच्या शाळांचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न असो, आदित्य ठाकरे हे स्वत: ही कामे करून घेत आहेत. नगरसेवकांच्या कामाचा आढावा देखील ते घेत आहेत.त्याचप्रमाणे राज्यात ज्या ठिकाणी निवडणूका आहेत त्याठिकाणची ही ते तयारी करत आहेत. त्यामुळं आगामी काळात शिवसेनेची पुढील सूत्रे त्यांच्यात हाती असतील हे जवळपास स्पष्ट आहे.


उद्धव ठाकरेंनी केलं कौतुक 
नुकतंच उद्धव ठाकरे ॲानलाईन असताना आदित्य ठाकरेंचे कौतुक केलं होतं, मुख्यमंत्री पदावर असताना, हिताचे निर्णय घेत असताना कामात आदित्यची मदत होत असते असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं त्यामुळे उद्धव ठाकरेंची तब्येत जरी बरी नसली तर आदित्य ठाकरे एकाबाजुनं किल्ला लढवत आहे, वडिल, पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. 


नगरसेवक, विभागप्रमुख आणि आमदारांच्या बैठका 
आदित्य ठाकरेंनी गेल्या सहामहिन्यापासून मुंबईचे नगरसेवक, आमदार, विभागप्रमुख यांच्या सह्याद्री अतिथीगृहावर बैठका सुरु केल्या आहेत, विविध वॅार्डात काय हवंय, आमदारांच्या अडचणी, विभागप्रमुखांच्या संपर्कात राहून पक्षाची मोर्चेबांधणी सुरु ठेवली आहे. निवडणुका आल्या अनेक नेते नगरसेवक नाराज होतात पण त्यांची मोळ आधीपासूनच बांधलेली आहे त्यामुळे भविष्यात अडचणी निर्माण होऊ नये, याची खबरदारी आदित्य ठाकरेंनी आधीपासूनच घेतली आहे 
      
यापूर्वी अदित्य ठाकरे यांनी केलं होतं नेतृत्व


युवा सेनेचे प्रमुख म्हणून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं विद्यापीठ व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका लढल्या आहेत. त्यात अनेक ठिकाणी शिवसेनेनं चमकदार कामगिरी केली आहे. आदित्य ठाकरे यांच्यामुळं गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेत अनेक युवा चेहरे सक्रिय झालेले आहेत. महापालिका निवडणुकीत त्याचा फायदा पक्षाला होण्याची शक्यता आहे. त्यामुळंच आदित्य ठाकरे यांच्याकडं महापालिका निवडणुकीची धुरा आल्यास भाजपसारख्या बलाढ्य पक्षाला ते कशी टक्कर देतात व महापालिकेत शिवसेनेकडून किती नव्या चेहऱ्यांना संधी देतात, याबद्दल उत्सुकता आहे.


पुढे आव्हान असणार आहे , त्यामुळे शिवसेना प्रयत्नशील


भाजपशी असलेली युती तुटल्यानंतर आणि राज्यात शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादीची महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. राज्याच्या सत्तेतून बाहेर ढकलल्यामुळं भारतीय जनता पक्ष शिवसेनेवर कमालीचा नाराज आहे. मुंबईची सत्ता ताब्यात घेऊन शिवसेनेला उत्तर द्यायचं, अशी रणनीती भाजपनं आखली आहे. त्यासाठी पडद्यामागे सर्व प्रकारची मोर्चेबांधणी सुरू आहे. मनसेला सोबत घेण्याचाही भाजपचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीनंही वातावरण निर्मिती केली जात आहे. अशा परिस्थितीत मुंबईचा गड राखणं हे शिवसेनेपुढं आव्हान असणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील इतर ठिकाणी देखील ज्या ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे आणि उमेदवार निवडून येतात त्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा