Rajya Sabha Election Result 2022 : राज्यसभेच्या 6 जागांसाठी महाराष्ट्राच्या इतिहासातली सर्वात रंगतदार निवडणूक पार पडली. महाविकास आघाडीच्या 3 तर भाजपच्या 3 उमेदवारांचा विजय झाला. शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांचा दणदणीत विजय झाला. तर भाजपच्या अनिल बोंडे आणि पीयुष गोयल यांनीही विजयाचा गुलाल उधळला. महाराष्ट्रातील राज्यसभेची सहावी जागा चुरशीची होती. या जागेवर भाजपचे धनजंय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार उमेदवार होते. धनंजय महाडिकांनी हा विजय खेचून आणला. राज्यसभा निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांच्या पतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही राज्यसभा निकालावर परखड मत व्यक्त केले. संजय राऊत थोडक्यात वाचले नाहीतर उलटे झाले असते, संजय पवार निवडून आले असते आणि राऊत मागे राहिले असते, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलेय. 


संजय राऊत यांनी आता अपक्षांची नाव घेऊन त्यांना आणखी दुखवण्यापेक्षा लोकांना जवळ करा, असा सल्लाही छगन भुजबळ यांनी दिलाय.  प्रसारमाध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले की, महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून यावेत, यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. पण दुर्दैवाने चौथ्या उमेदवाराचा पराभव झाला. पण महाविकास आघाडीला हा मोठ्ठा धक्का आहे असे नाही, आमच्याकडे 166 पेक्षा जास्त आमदार होते. आम्ही नियोजनात चुकलो, अशी कबुली भुजबळ यांनी दिली.   


भाजपने दोन उमेदवारांना 48/ 48 मते दिली, पहिल्या फेरीनंतर ज्याला जास्त मतं आहेत, त्याची मत इतरांना ट्रासन्फर होतात. भाजपची मते ट्रान्स्फर झाली, आमची मते ट्रान्स्फर होण्याचा योगच आला नाही. संजय राऊत यांनाच अडचण निर्माण होते का?अशी परिस्थिती निर्माण झाली होती. महत्वाच्या नेत्यांना आधी सेफ करायला पाहिजे होते. आम्ही 170 पेक्षा 180 मंतांची व्यवस्था करायला पाहिजे होते, यात कमी पडलो, असे भुजबळ म्हणाले. 


पवार साहेबांचे मार्मिक स्टेटमेंट आले आहे, देवेंद्र फडणवीस अधिक लोकांना जवळ करण्यात यशस्वी ठरले. याचा दुसरा अर्थ आम्ही तिन्ही पक्षाच्या लोकांनी समजून घेतला पाहिजे. अधिक लोक जवळ केली पाहिजेत. तिन्ही पक्षाच्या आमदारांची नाराजी मोठ्या प्रमाणात उफाळून आली होती. नाराजी निर्माण होणार नाही, याची काळजी घय्याला पाहिजे. महाविकास आघाडीचा आमदार आपल्याच पक्षाचा असतो, असे समजून काम करायला पाहिजे. आमदार दुखावला जाणार नाही, त्यांच्या कामात अडथळा निर्माण होणार नाही, याची शिकवण आम्हला मिळाली आहे, अशी कबुलीही भुजबळ यांनी दिली.