Maharashtra Border Dispute: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची (karnataka CM Basavaraj Bommai) बोंबाबोंब सुरुच आहे. आधी म्हणाले, महाराष्ट्रातील जत तालुक्याला पाणी देऊ. नंतर म्हणाले, अक्कलकोट, पंढरपूरमधील गावांना कर्नाटकात यायचे आहे. आणि आता थेट मंत्र्यांनाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये असा इशाराच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना दिला आहे.  कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मंत्र्यांनाच इशारा दिल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. संजय राऊतांनी थेट शिंदेंचा आणि त्यांच्या आमदारांचा स्वाभिमान कुठे गेला? असा प्रश्न करत बेळगावात जाण्याचा इशारा दिला आहे. 


कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधलाय.  दुसरीकडे शिंदे गटानं मात्र एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनीच थेट इशारा दिल्यामुळे आम्ही महाराष्ट्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारलं असता त्यांनी यावर बोलणं टाळलं. आणि प्रसारमाध्यमांपासून निघून गेले. कर्नाटकनं गेल्या आठवड्याभरात तीनवेळा कुरघोडी केली. 


22 नोव्हेंबर
जत तालुक्यावर कर्नाटकचा दावा, 40 ग्रामपंचायतींचा ठरावावर विचार सुरु


23 नोव्हेंबर 
फडणवीसांच्या विधानावर टीका, फडणवीसांचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही


24 नोव्हेंबर
जत तालुक्यानंतर अक्कलकोट आणि सोलापूर शहरावर कर्नाटकचा दावा


1 डिसेंबर 
कर्नाटकातल्या तुबची बलेश्वर योजनेचं पाणी जत तालुक्यात सोडलं


2 डिसेंबर 
महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये, असा इशारा देण्यात आला. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची ही बोंबाबोंब कधी थांबणार आहे. आणि महाराष्ट्र सरकार याला कसं उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे.


पाणी संघर्ष कृती समितीचा अल्टिमेटम आज संपणार -
सांगली- कर्नाटकमध्ये जाण्याचा पाणी संघर्ष कृती समितीचा 8 दिवसांचा अल्टिमेटम आज संपणार आहे. रविवारी संध्याकाळी जतच्या उमदी या ठिकाणी पाणी संघर्ष कृती समितीची व्यापक बैठक होणार आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र सरकार काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेय. 


संजय राऊतांचा राज्य सरकारवर निशाणा?
कर्नाटकच्या सचिवांनी आपल्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेय. एका राज्यातील नेत्यांना दुसऱ्या राज्यातील नेते अडवतात, असं या देशात पहिल्यांदाच घडतेय. कर्नाटकशी आमचं घरगुती भांडण मुळीच नाही. महाराष्ट्रात येण्यासाठी अनेक लोक आंदोलन करत आहेत. बाळासाहेब ठाकरेंना याच कारणासाठी तुरुंगवास झाला. हे क्रांतिकारक सरकार आल्यापासून शेपूट घालण्याची क्रांती केली आहे. कर्नाटकने महाराष्ट्र सरकारला कानफटात मारली, सरकार षंढासारखं बघत बसलं आहे. महाराष्ट्र पाणी दाखवणारं राज्य होतं, आज मात्र ते आपल्याला पाणी दाखवत आहेत, असे संजय राऊत म्हणाले.  


ही बातमी वाचायला विसरु नका-


Maharashtra Border Dispute: महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा