Lata Mangeshkar Passes Away: भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकारकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय. तसेच राष्ट्रध्वज तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आलाय. लतादीदींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. लता दीदींच्या अंत्यदर्शनाकरता शिवाजी पार्कवर व्यवस्था करण्यात आलीय. पण राष्ट्रीय दुखवटा म्हणजे नेमकं काय? आणि कधी जाहीर केला जातो? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.


कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 29 दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयातील (Breach Candy Hospital)आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र, दुर्दैवाने आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रासह विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.


राष्ट्रीय दुखवटा म्हणजे काय?
भारतातील राष्ट्रीय दुखवटा हा संपूर्ण राष्ट्राचे दु:ख व्यक्त करण्याचा प्रतीकात्मक मार्ग आहे. तसेच निधन झालेल्या व्यक्तीवर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार केले जातात. या काळात कोणतेही औपचारिक आणि अधिकृत काम केले जात नाहीत. राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्यानंतर मेळावे आणि अधिकृत मनोरंजनावर देखील बंदी असते. यापूर्वी पंतप्रधान किंवा राष्ट्रपती पदावर असताना किंवा पूर्वी पंतप्रधान किंवा राष्ट्रपती राहिलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर देशात राष्ट्रीय दुखवटा घोषित केला जायचा. मात्र, कालांतरानं राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्याच्या नियमात बदल करण्यात आले. त्यानुसार, काही खास मान्यवरांच्या बाबतीतही केंद्राला विशेष सूचना जारी करून राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्याचा अधिकार देण्यात आलाय. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha