सिंधुदुर्ग: जिल्ह्यात सोमवारी 11 दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन पार पडलं. या दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली असून कुडाळ शहरातील भंगसाळ नदी येथे गणेश विसर्जन करण्यासाठी पाण्यात गेलेल्या मुंबई प्रभादेवी येथील 65 वर्षीय दत्‍ताराम बाळू बेंद्रे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली.


कुडाळ शहरातील भैरववाडी मंदिर नजीक असलेल्या अभय गणपत राऊळ यांच्या निवास्थानी विराजमान झालेल्या गणेशाचे सोमवारी अकरा दिवसांनी विसर्जन होते. या विसर्जनासाठी त्यांचे मुंबई प्रभादेवी येथील मित्र दत्ताराम बेंद्रे हे आले होते. गणेशाचा महाप्रसाद करून गणेशाचे विसर्जन करण्यासाठी अभय राऊळ यांचे कुटुंबिय तसेच त्यांचे मुंबई येथील सर्व मित्र भंगसाळ नदीच्या ठिकाणी विसर्जनासाठी गेले. त्या ठिकाणी विसर्जनासाठी मदत करणारे शेलटे व अभय राऊळ यांचे मुंबईतील मित्र गणेशाची मूर्ती घेऊन पाण्यात उतरले, गणपतीचे विसर्जन झाले.


विसर्जन झाल्यावर दत्ताराम बेंद्रे हे पाण्यात पोहत असताना अचानक बुडायला लागले. तेवज शेलटे यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांना पाण्याबाहेर काढून कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले, मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.


अभय गणपत राऊळ हे मुंबई येथील आहेत. त्यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाच्या विसर्जनाला दरवर्षी त्यांचे मुंबई येथील मित्र येतात. दत्ताराम बेंद्रे हे सुद्धा गेले अनेक वर्ष विसर्जनासाठी येतात. मात्र यावर्षी त्यांच्यावर काळाने घाला घातला. विसर्जनासाठी गेले असताना पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. 


महत्वाच्या बातम्या :