Karnataka Assembly Elections Results: सीमावासियांसोबतच अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या बेळगावातील प्रमुख मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा एकही उमेदवारी निवडून आला नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी बेळगावात प्रचार केल्याने त्याचा फटका एकीकरण समितीच्या (Maharashtra Ekikaran Samiti) उमेदवारांना बसला आणि त्यामुळे समितीच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला अशी प्रतिक्रिया एकीकरण समितीच्या रेणू किल्लेदार (Renu Killedar) यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. एकीकडे मराठी माणूस आपल्या स्वाभिमानासाठी गेल्या 66 वर्षांपासून लढा देतोय, दुसरीकडे महाराष्ट्रातील नेते बेळगावात येऊन समितीच्या उमेदवारांविरोधात प्रचार करतात हे दुर्दैवी असल्याचं रेणू किल्लेदार यांनी म्हटलंय. 


Renu Killedar On Devendra Fadanvis : सांगा, आम्ही अजून किती लढायचं?


रेणू किल्लेदार म्हणाल्या की, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी प्रयत्न वरिष्ठ पातळीवरुन प्रयत्न करण्यात आले. या आधी महाराष्ट्रातील नेते इतक्या मोठ्या संख्येने बेळगावात कधीही आले नव्हते, आता आले याची खंत आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांनी सीमावासियांच्या प्रचारासाठी यावं, त्यामुळे सीमावासियांच्या लढ्याला बळ मिळेल अशी कळकळीची विनंती त्यांच्याकडे करण्यात आली होती. पण यांनी सत्तेसाठी राजकारण केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेळगावात सभा घेतल्या. आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवले. पण त्यांनी बेळगावात येऊन मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं. आमचा लढा हा महाराष्ट्रात येण्यासाठी आहे. तुम्ही जर इथे येऊन आमच्या विरोधात प्रचार केला तर चुकीचा संदेश जाईल हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. फक्त पैशाचं राजकारण त्यांनी केलं, भरपूर पैसे वाटले. 


रेणू किल्लेदार पुढे म्हणाल्या की, "आम्ही राजकारण करत नाही, गेली 66 वर्षे आम्ही लढत आहोत. देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांनी सीमाभागात येऊन समितीच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार केला हे चुकीचं झालं. आमचा लढा हा सर्वसामान्य मराठी माणसाच्या पाठिंब्यावर आहे. मराठी माणसाचे प्रश्न समितीकडून सोडवले जातात. पण समितीच्या उमेदवारांना पाडण्यासाठी पैशाचा वापर करण्यात आला." 


राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाने साथ दिली


मए समितीच्या रेणू किल्लेदार म्हणाल्या की, "समितीच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार करू नये अशी विनंती आम्ही महाराष्ट्रातील सर्वच पक्षांना केली होती. त्यावेळी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने आम्हाला प्रतिसाद दिला. काँग्रेस आणि भाजपने कोणताही प्रतिसाद न देता आमच्या विरोधात प्रचार केला हे दुर्दैवी आहे."


गेल्या निवडणुकीला मतांची विभागणी झाल्यामुळे एकीकरण समितीला फटका बसला होता. ते लक्षात घेऊन यंदा प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार दिल्यानंतरही समितीच्या पदरी हे अपयश आलं. त्यामुळे समितीचे भवितव्य काय? सीमाप्रश्नावर त्याचा काय परिणाम होणार? असे प्रश्न विचारला जात आहे. 


निवडणूक सुरू झाल्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांची भेट घेऊन महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांनी  समितीच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचारासाठी येऊ नये अशी विनंती समितीच्या कार्यकर्त्यांनी केली होती. त्यावेळी समितीचे हे मत आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घालू असं आश्वासन चित्रा वाघ यांनी दिलं होतं. पण नंतर त्याच या भागात प्रचारासाठी आल्याचं दिसलं. 


Belgaum Election Results : पाच मतदारसंघात मोठी आशा होती


सीमाप्रश्न तेवत ठेवायचा असेल तर फक्त रस्त्यावरची लढाई लढून चालत नाही, त्यासाठी विधानसभेतही आवाज उठवला पाहिजे हे एकीकरण समितीला चांगलंच ठाऊक आहे. त्याचाच एक भाग म्हणून समितीकडून ठराविक मतदारसंघात उमेदवार उभे केले जातात. यावेळी बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर, बेळगाव ग्रामीण, यमकनमर्डी आणि खानापुरात एकच उमेदवार देण्यात आला होता. एकीकरण समितीचे हे सर्व उमेदवार निवडून येतील अशी त्यांना आशा होती. 


महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मुरलीधर पाटील (खानापूर), रमाकांत कोंडूसकर (बेळगाव दक्षिण), अमर येळ्ळूरकर (बेळगाव उत्तर) आणि आर. एम. चौगुले यांना बेळगाव ग्रामीणमधून पराभव स्वीकारावा लागला आहे. 


Devendra Fadanvis In Belgaum : देवेंद्र फडणवीस बेळगावात प्रचाराला


कर्नाटकात निवडणुकीचा प्रचार सुरू असताना महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी बेळगाव आणि आजूबाजूच्या मराठी पट्ट्यात प्रचार केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल कर्नाटकमध्ये प्रचार केला तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेळगावसह इतर भागात प्रचार केला. बेळगावात प्रचाराला आलेल्या देवेंद्र फडणवीसांना एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले, त्यांना मराठी उमेदवारांच्या विरोधात प्रचार करु नये अशी विनंती केली. 


देवेंद्र फडणवीसांनी एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या विरोधात भाजप उमेदवारांचा प्रचार केला. काँग्रेसचे नेतेही त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते. पण देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री असल्याने त्यांनीच सीमाभागात प्रचार करणे म्हणजे सीमाप्रश्नाच्या लढ्यावर नकारात्मक परिणाम होण्यासारखं आहे अशी भावना या भागातील मराठी लोकांची होती. 


या बातम्या वाचा: