Irshalvadi Landslide : रायगडमधील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत होत्याचं नव्हतं झालं. अतिशय कठीण वाट पायाखाली तुडवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दरड दुर्घटनास्थळी जाण्याचा निर्णय घेतला. रायगडमधील चौक मानवली येथील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून 30 ते 40 घरं गाडली गेली. आतापर्यंत 80 जणांना बाहेर काढण्यात यश आलं असून 100 हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. रायगडमधील प्रसिद्ध ट्रेकर्स पॉईंट असलेल्या इर्शाळगडावर दरड कोसळून ही दुर्घटना घडली आहे. प्रसिद्ध कलावंतीण दुर्गच्या शेजारीच असलेल्या इर्शाळगडावर दरड कोसळली. येथे जाण्याची वाट अतिशय कठीण आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दुर्घटना स्थळी स्वत: पायी जाण्याचा निर्णय घेतला.


मुख्यमंत्री शिंदेंचा दुर्घटनास्थळी चालत जाण्याचा निर्णय


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ''रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मदतकार्याला वेग देण्यासाठी मी स्वतः घटनास्थळी चालत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी स्थानिक नागरिकांना   केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन एनडीआरएफ पथकाच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्याला वेग देण्यासाठी काही तरुण स्वतःहून पुढे आले आहेत. रायगड जिल्ह्यातील यशवंती हाइकर्स, निसर्ग ग्रुप पनवेल या स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक, मौजे चौक आणि मौजे वरोसे येथील ग्रामस्थ, विविध विभागाचे शासकीय कर्मचाऱ्यांसह एमआयडीसी मध्ये काम करणारे पाचशेहून अधिक मजूर या मदतकार्यात स्वतःहून सहभागी झाले आहेत. याशिवाय जखमींवर उपचार करण्यासाठी तसेच नागरिकांचे गडाच्या पायथ्याशी तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी रत्नागिरीहून 10 कंटेनर देखील मागवण्यात आले आहेत.''






इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू


इर्शाळवाडी या दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेथील परिस्थितीचा आणि सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला. या घटनेत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. काही ग्रामस्थ भातशेतीच्या कामासाठी इतरत्र गेले असून काही विद्यार्थी आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांचाही शोध घेतला जात आहे. या ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी पायथ्याशी 50 कंटेनरची व्यवस्था करण्यात येत असून या ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन देखील करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, स्थनिक आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते.






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Maharashtra Landslide : इर्शाळवाडीत दोन दिवसात 770 मिमी, तळीयेत 550 मिमी, दरड दुर्घटनांमध्ये पाऊस काळ बनला, किती मिमी बरसला?