Maharashtra Rain News : राज्याच्या विविध विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये (Farmers) आनंदाचे वातावरण आहे. कारण शेतकरी अनेक दिवसापासून पावसाची वाट पाहत होते. मात्र, काही ठिकाणी वादळी पाऊस झाल्यामुळं शेती पिकांना फटका बसला आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यात वादळी पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच या पावसामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे (Onion Farmers) मोठं नुकसान झालं आहे. कांदा व्यापाऱ्यांच्या शेडवरील पत्रे उडाले आहेत. त्यामुळं शेडमध्ये साठवून ठेवला कांदा भिजला आहे. 


नाशिक जिल्ह्यातील उमराणे परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस


नाशिक जिल्ह्यातील उमराणे परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यामुळं रस्त्यावरील अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. 
-तसेच शेतशिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाली आहे. कांदा व्यपाऱ्यांचे शेडचे पत्रे उडाले आहेत. या पावसामुळं शेडमध्ये साठवून ठेवलेला कांदा भिजला आहे. पहिल्याच जोरदार पावसामुळं बळीराजा सुखावला आहे. 


परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस 


परभणी जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सायंकाळच्या सुमारास परभणी पाथरी, मानवत, सोनपेठसह जिल्ह्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट अन जोरदार पाऊस बरसलाय. पाथरी तालुक्यातील पिंपळगाव शिवारात काही वृक्षही उन्मळुन पडले आहेत. एकूणच दिवसभर जाणवणाऱ्या उकाड्यापासून काहीसा दिलासा या पावसामुळे मिळाला आहे.


सोलापूर शहरात तुफान पावसाला सुरुवात


गेल्या तासाभरापासून सोलापूर शहरात तुफान पावसाला सुरुवात झाली आहे. शहरात अनेक रस्त्यांवर गुडघ्यापर्यंत पाणी साचलं आहे. सखल भागात पाणी साचल्याने शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. 


सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस


सांगली जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळं अग्रणी नदीला पूर आला आहे. अनेक ओढे, नाले तुडुंब भरुन वाहत आहेत