अकोला : विदर्भ आणि मराठवाड्यात पावसासह गारपिटीचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवला होता. यावेळी नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यात गारपीट (Hailstorm) होण्याची शक्यता वर्तवली होती. याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील काही भागातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार पावसाला सुरुवात झाली असून अकोला, अहमदनगर याठिकाणी तर गारपिटीसह वरुणराजाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने  नव्या वर्षात पुन्हा हुडहूडीची शक्यता वर्तवली असून विदर्भातील किमान तापमान 10 ते 15 अंशसेल्सिअस राहणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने (Weather Department) वर्तवला आहे.


अकोल्यात मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास गारपिटीसह जोरदार पाऊस झाला आहे. या पावसासोबतच ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी गारपिट देखील झाली आहे. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली असून रब्बीतील हरभरा, गहू आणि तूर पिकांचं नुकसान देखील झालं आहे.


अकोल्यासह अहमदनगर जिल्ह्यातही गारांचा पाऊस पडलेलं पाहायला मिळालं. यावेळी श्रीरामपूर, नेवासा तालुक्यात जोरदार गारपीट झाली. गोदावरी नदी काठच्या अनेक गावात जोरदार गारपीट झाल्यामुळे मोठ्या नुकसानाची शक्यता वर्तवली जात आहे. नगरमधील या पावासामुळे द्राक्ष, कांदा, गहू, हरभरा पिकांना धोका निर्माण झाला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. नगर अकोल्यानंतर भंडारा जिल्ह्यातही गारपिटीसह ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसानं दर्शन दिलं आहे. तसंच गोंदीया अमरावती याठिकाणीही गारपीटीसह पावसाने चांगलीच हजेरी लावली.  
महत्त्वाच्या इतर बातम्या : 



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live