गडचिरोली : जिल्ह्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने भात रोवणीच्या कामांना वेग आला आहे. शनिवारी जिल्हाधिकारी दीपक सिंगला साखरा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. यावेळी त्यांनी चक्क चिखलात उतरून भात (धान) लागवड केली. श्री पद्धतीने भात लागवड केल्यास शेतकऱ्यांना अधिक नफा मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी श्री पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी केले.


जिल्हयाचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी साखरा गावातील शेतकऱ्याच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष भात रोवणी केली. जिल्ह्यातील दमदार पावसानंतर सर्वच शेतकऱ्यांनी भात रोवणीला जिल्ह्यात सुरुवात केली आहे. साखरा गावात कृषी विभागाने आयोजित केलेल्या रोवणी कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी शेतीमधील उत्पन्न वाढीसाठी आता यांत्रिकीकरण स्विकारले पाहिजे असे आवाहन शेतकऱ्यांना केले. परंपरागत शेतीमध्ये खूप मेहनत घ्यावी लागते, तसेच उत्पन्नही काही अंशी कमी राहते. यातून बाहेर पडून शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी जेणेकरून उत्पन्नही वाढेल आणि मेहनतही कमी करावी लागेल, असे ते यावेळी म्हणाले. साखरा येथे झालेल्या युवराज उंदीरवडे यांच्या शेतातील रोवणी कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, नाबार्ड जिल्हा प्रमुख राजेंद्र चौधरी, कृषी अधिकारी अरूण वसवाडे, बालाजी कदम, पी.पी.वाहने आणि स्थानिक शेतकरी उपस्थित होते.




जिल्ह्यात पावसामध्ये थोडासा खंड पडलेला होता. आता मागील दोन दिवसात चांगला पाऊस झाल्याने आता धान रोवणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. अशा वेळी जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना प्रोत्साहन दिले आणि शेतकरी यांनी यांत्रिकीकरण करून आधुनिक शेतीचा स्विकार करावा, असे आवाहनही केले. कृषी विभागाने नियोजन आणि मानव विकास योजनेतून ट्रॅक्टर वाटप, तसेच आवश्यक इतर सयंत्र वाटप योजना घेतली आहे. यातून शेतीमधील उत्पन्न वाढीबरोबरच त्यांचा शेतीमधील इतर ताणही कमी होणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. येत्या काळात जिल्ह्यातील रब्बी पिकांमधील पेरणी क्षेत्र वाढविण्यासाठीही उपाय योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यांत्रिकीकरण योजनेत जिल्ह्यात 40 मशीन घेण्यात येत आहेत. त्यातून किमान प्रती मशीन 100 एकर क्षेत्र पेरून यांत्रिकीकरणाला चालना दिली जाणार आहे.


एसआरआय' पद्धतीने भात लागवडीचे तंत्र


एसआरआय (सघन) लागवड पद्धतीमुळे भाताची रोपे बळकट होतात. रोपांची मुळे लांब असल्याने कमी पाण्यातही तग धरतात. बळकट मुळांमुळे मातीमधील सिलिकॉन अधिक प्रमाणात शोषून घेतले जाते. या पद्धतीने पारंपरिक, तसेच सुधारित, संकरित जातींची लागवड करता येते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :