मुंबई: मुख्यमंत्र्याशी झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. शहरांची नाकाबंदी करुन आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे आजपासून अनेक शहरांमध्ये दूध आणि भाजीपाल्याची टंचाई निर्माण झाली आहे.


तसंच महागाईचीही टांगती तलवार शहरवासियांच्या डोक्यावर आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत सात दिवस संप चालूच ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन आयोग लागू करावा, साताबारा कोरा करावा अशा शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

बळीराजाच्या संपाचा फटका बाजार समित्यांना
शेतकरी संपाचा फटका बाजार समित्यांना बसल्याची माहिती समोर येते आहे. नवी मुंबईतल्या वाशी एपीएमसीत आणि कल्याण एपीएमसीमध्ये फळं आणि भाजीपाला घेऊन येणाऱ्या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

नवी मुंबईत जिथे दररोज 500 गाड्यांची आवक होते, तिथे आज फक्त दीडशे गाड्यांची आवक झाली आहे. तर कल्याणमध्ये सकाळपासून भाजीचा एकही ट्रक आलेला नाही. त्यामुळे कल्याणमधील व्यापारी कालच्याच उरलेल्या भाज्या विकत आहेत.

याशिवाय, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ 10 टक्के आवक झाली आहे. बाजार समितीत फक्त 110 गाड्या आल्या आहे.

तर ठाणे, मनमाड, येवला, लासलगावमध्येही आज भाजीपाल्याची गाडी आली नाही

मुंबई-पुण्यात दुधाचा तुटवडा
पुणे शहरात तर गुरुवारपासूनच (1 जून) दुधाचा तुटवडा जाणवायला लागला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दुधाची आवकच झाली नाही. त्यामुळे दूधविक्रेत्यांनी या संधीचा फायदा घेत दर वाढवले आहेत. पुण्यात 56 रु. लीटर असलेलं म्हशीचं दूध 80 रु. प्रतिलीटरनं विकलं जातं आहे. तर गायीचं 40 रु. लीटरचं दूध 60 रुपये प्रतिलीटर दराने विकलं जातं आहे. दुधाचे दर जरी वाढले असले तरी दूध खरेदीसाठी पुणेकरांनी मात्र दुकानांबाहेर लांब रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळालं.

तर शेतकरी संपावर असल्याने मुंबईतील दूध संकलन कमी झालं आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरात उद्यापासून दुधाची टंचाई होऊ शकते. त्यासाठी गुजरातहून मोठ्या प्रमाणवर दुधाची आवक होणार आहे.

मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ
शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला. हा संप मागे घेण्यासाठी कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अहमदनगरमधील पुणतांबा गावात आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री भेटीचा प्रस्ताव दिला.

त्यानंतर मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आता 1 जूनपासून शेतकऱ्यांनी दूध आणि भाजीपाला विक्री न करण्याची भूमिका घेतली आहे.

संपकरी शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?

  • शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा



  • स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा



  • शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करावी



  • शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा



  • शेतीसाठी अखंडित वीजपुरवठा करावा


पहिली ठिणगी साताऱ्यात:
दरम्यान, शेतकरी संपाची पहिली ठिणगी सातारा जिल्ह्यात पडली. पुणे-बंगळुरु महामार्गावर शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. साताऱ्यात शेतकरी संघटनेने कोल्हापूरहून मुंबईला जाणारी दूध वाहतूक रोखून ट्रकची तोडफोड केली. वारणा दूध डेअरीचे हे दोन ट्रक होते. यावेळी कार्यकर्त्यांनी ट्रकचालकाला मारहाण केल्याचंही कळतं.

शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला आहे. पीक काढायचं नाही, दूध शहरापर्यंत पोहोचवायचं नाही आणि कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

संबंधित बातम्या:

शेतकरी संपावर जाणं म्हणजे आई संपावर जाण्यासारखंच : अर्थमंत्री

आज मी अस्वस्थ आहे : शरद पवार

शेतकरी संपावर : मुंबईसाठी गुजरातहून दूध मागवण्याची नामुष्की

येवल्यात आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, पोलिसांकडून हवेत गोळीबार, एक जखमी

शेतकरी संपाला पाठिंबा, शेतमालाची नासाडी करु नका : राजू शेट्टी

नाव स्वाभिमानी आणि धंदे बेईमानी, रघुनाथदादांचा राजू शेट्टींवर घणाघात

शेतकऱ्यांनो संप मागे घ्या, सरकार चर्चेसाठी तयार : खोत

शेतकरी संपाला हिंसक वळण, व्यापाऱ्यांची शेतकऱ्याला मारहाण

शेतकरी संपावर, दूध रस्त्यावर ओतलं, भाजीपाल्याच्या गाड्या रोखल्या

राज्यातील बळीराजा संपावर, विविध ठिकाणी आंदोलनं

शेतकरी संप : साताऱ्यात मुंबईला दूध घेऊन जाणारे दोन ट्रक फोडले