वर्धा : बसमधील प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला अटक करण्यात वर्धा पोलिसांनी यश मिळालं आहे. हिंगणघाट येथे संशयावरुन 9 जणांना अटक करण्यात आली होती. तपासात उत्तर प्रदेशात गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 10 जणांना अटक केली आहे.


या टोळीकडून 380 ग्राम सोनं, मोबाईल फोन, रोख रक्कम असा 11 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये टोळीतील एकून 19 आरोपीना अटक करण्यात आली असून टोळीचा मोरक्या फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहे.

पोलिसांनी चोऱ्या उघडकीस आणत आरोपींकडून कबुलीही मिळवली आहेत. यात हिंगणघाट येथील 10 गुन्हे, देवळी येथील 1 गुन्हा, सेलू येथील 1 गुन्हा, वाशिम येथील एक गुन्हा असे 13 गुन्हे उघडकीस आले आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक निर्मला देवी एस यांनी दिली.



या टोळीतील चोरटे सुगंधी तेल विकणारे म्हणून राहत होते. त्यामुळे व्यापारी म्हणून सहज बसमध्ये प्रवास करत. बसमध्ये टोळक्याने चढून सावज शोधत असत. प्रवाशांचं लक्ष भटकवत हे हातसाफ करून निघून जात. बॅगमधील साहित्य चोरीला गेलं हे घरी पोहोचल्याशिवाय प्रवाशांना कळत नसल्यानं हे चोरटे हाती लागत नसत. अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. चिन्मय पंडित यांनी याबाबत माहिती दिली.

या टोळक्याचा म्होरक्या मनोज नथुलाल याचा शोध घेत आहे. इतर आरोपींना 4 जूनपर्यंत पोलिस कोठडी असल्यानं आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.