मुंबई: राम मंदिराच्या निधीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना खंडणी वसूल करायची सवय आहे, त्यांना समर्पणाचं महत्व समजणार नाही अशी जहरी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विधानसभेत कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी राम मंदिराच्या निधी संकलनावर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलंय.


भगवान श्रीरामांच्या नावाने पैसे गोळा करायचे हक्क कोणत्या कायद्याने दिले आहेत असा सवाल कॉंग्रेस आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत विचारला होता. त्यावर उत्तर देताना पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राम मंदिरावर चर्चा सुरु आहे का असा सवाल केला. यांना खंडणी वसूली करायची सवय आहे, त्यांना समर्पण समजणार नाही असंही ते म्हणाले. राम मंदिरावर चर्चा सुरु आहे का असा सवाल करत फडणवीसांनी राज्य सरकारला राम मंदिरावर चर्चा करण्याचं आव्हान दिलं.


सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर प्रश्न विचारला असता त्याला उत्तर देताना आमदार नाना पटोले यांनी राम मंदिर संकलानाचा विषय उपस्थित केला. त्यावेळी विधानसभेमध्ये गोंधळ निर्माण झाला. भाजप सदस्यांनी जय श्री रामाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे या गोंधळात आणखीनच भर पडली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज दहा मिनिटासाठी स्थगित करण्यात आलं.

बाबरी पाडल्याचा अभिमान मुख्यमंत्र्यांना भोवणार? अबू आझमी आणि संजय निरुपम यांची नाराजी


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी बाबरी मशीदीच्या विषयावरुन बोलताना भाजपवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, "भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. बाबरी पडल्यानंतर सगळे पळून गेले होते पण बाळासाहेब एकटे ठामपणे उभे होते. बाबरी मशीद पाडणाऱ्या शिवसैनिकांचा मला अभिमान असल्याचं बाळासाहेबांनी सांगितलं होतं."


त्याला उत्तर देताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "बाबरीचा ढाचा पाडण्यासाठी हे कोणीच नव्हते, आम्ही होतो. जनता जर मंदिराच्या निर्माणाला पैसे देत असेल तर यांना वाईट का वाटतंय. यांना खंडणी वसूली करायची सवय आहे, यांना जनतेच्या समर्पणाचे महत्व समजणार नाही. त्यांना जनतेच्या समर्पणाची सुई टोचते."


जळगाव वसतीगृहात महिलांवर अत्याचाराची कोणतीही घटना घडली नाही, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती