मुंबई :  कोरोनाच्या तिसऱ्या वाटेचा सर्वाधिक फटका आपल्या लहानग्यांना होऊ शकतो असा अंदाज बांधला जात आहे. म्हणून ही बातमी ज्यांच्या घरात लहान मुल आहेत त्यांच्यासाठी महत्वाची आहे. पण कोरोनाच्या काळातील रुग्णांच्या उपचारात झालेली वाताहात पाहता कोरोनाच्या प्रादुर्भावात जर लहान मुलं सापडली तर आपण त्यांना उपचार देण्यासाठी सक्षम  आहोत का? असा सवाल उपस्थित होतोय. या विषयाचं महत्व जाणून घेत एबीपी माझानं तिसऱ्या लाटेपासून मुलांना कसं वाचवायचं? या विषयावर तज्ञांशी संवाद साधला. या संवादामध्ये बालमानसोपचार तज्ञ डॉ. समीर दलवाई, बालरोग तज्ञ डॉ लीना धांडे यांनी सहभाग घेतला. या दोघांनीही कोरोनाच्या काळात मुलांची कशी काळजी घ्यावी? या काळात मुलांचा आहार कसा असावा? या काळात मुलांचं मानसिक आरोग्य कसं जपावं? अशा विविध प्रश्नांची उत्तरं तज्ञांनी दिली.


लहान मुलांमध्ये लक्षणं नेमकी कशी? - डॉ लीना धांडे, बालरोग तज्ञ
बालरोग तज्ञ डॉ लीना धांडे यांनी सांगितलं की, पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अनेक बालरुग्ण सापडले. त्यांची लक्षणं ही पहिल्या पेक्षा दुसऱ्या लाटेत तीव्र होतं. तिसऱ्य़ा लाटेत बालरुग्णांचं प्रमाण गंभीर असू शकतं अशी शक्यता आहे. दुसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्या व्यक्तिप्रमाणेच लक्षणं दिसली. वास न येणे, ताप, ऑक्सिजन कमी होणे, लूज मोशन, सर्दी खोकला अशी लक्षणं दिसून आली. कमी प्रमाणात मात्र मल्टीसिस्टम सिंड्रोम काही ठिकाणी आढळला, त्याचा धोका जास्त आहे. लहान मुलांमध्ये जनरली कोरोनासाठी लस वगेरे नाही. यापैकी 6 ते 14 वयोगटातील मुलांना जास्त प्रमाणात धोका आहे. मात्र 6 वर्षांपेक्षा कमी वयाच्या बाळांनाही धोका हा आहेच. लसींची क्लिनिकल ट्रायल 18 वर्षांपेक्षा वरच्या वयाच्या लोकांच्याच झाल्या आहेत. 18 पेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी लसीच्या ट्रायल वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत. जोवर ट्रायलचे निकाल येत नाहीत तोवर लस, औषधं वापरणं धोक्याचं ठरतं. खूप धोका असेल तर मुलांवरही रेमडेसिवीर सारखी औषधं काही प्रमाणात वापरु शकतो. कोमॉर्बिडीटी आजार असलेल्या मुलांबाबत जास्त जागरुक राहावं. कारण अशा मुलांची तब्येत जास्त गंभीर होण्याची शक्यता असते. बाल रुग्णांसाठी अनेक औषधं आपण वापरु शकत नाही. दुसऱ्या लाटेत आपल्याकडे औषधं आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला त्यामुळं तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन याची तयारी करेल तर जास्त तुटवडा जाणार नाही, असं डॉ. धांडे यावेळी म्हणाल्या.


मुलांच्या भावना समजून घ्या- डॉ. समीर दलवाई, बालमानसोपचार तज्ञ
बालमानसोपचार तज्ञ डॉ. समीर दलवाई म्हणाले की, गेल्या एक वर्षापासून मुलं घरात आहेत. त्यांनी अशी परिस्थिती कधीच पाहिली नाहीत. घरात राहिल्यामुळं मुलं चिडचिड करत आहेत. ते आपल्या मित्रांना, शाळेला मिस करत आहेत. दोन तीन वर्षांची मुलं आईवडिलांच्या फार जवळ आली आहेत. यामुळं पालकांनी अधिक दक्ष होणं गरजेचं आहे. पालकांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. मुलांकडे लक्ष अधिक द्यायला हवं, मुलं काय म्हणताहेत याकडे लक्ष द्या, त्यांच्या भावना समजून घ्या. लहान बाळं काय म्हणताहेत हे कळत नसेल तर आपलं प्रेम दाखवत राहा. मुलांवर ओरडू नका आणि मुख्य म्हणजे अभ्यास ऐके अभ्यास असं करु नका. मुलांना सतत स्क्रिन देऊ नका. त्यामुळं मुलांना वेगळ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. मुलांना आपण ज्ञान देण्यापेक्षा ते काय म्हणतं आहेत त्याकडे लक्ष द्यायला हवं. मुलांकडे आपल्याला खूप कोमलतेने पाहावं लागेल, असं दलवाई म्हणाले. 


बालकांची काळजी कशी घ्यावी
गर्दीच्या ठिकाणी न जाणं,
मास्क, सॅनिटायझर, बाकी जे निर्देश आहेत ते पाळणं,
मुलांनाही त्यासाठी तयार करावं. 
त्यांना प्रतिबंधात्मक शिकावं
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी झोप पुरेशी
सकस आहात त्यांना द्यायला हवा
सकारात्मकता त्यांच्यात ठेवणं फार आवश्यक 
लक्षणं दिसताक्षणी डॉक्टरांशी संपर्क करावा आणि उपचार करावा 


मुलांच्या आहाराचं काय
मुलांचा आहार एरवीही महत्वाचा विषय असतो. कोरोनाच्या स्थितीत याचं महत्व अजून वाढतं. मुलांना सकस आहार द्यावा. रोगप्रतिकार शक्ति वाढवायची आहे. जेवणात बॅलन्स डाएट असावा. चौरस आहार त्यांना देणं गरजेचं आहे. सर्व भाज्या, फळं, धान्य, कडधान्य आणि जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी नॉनव्हेज असं आहारात द्यावं. 



Coronavirus Third Wave: कोरोनाच्या तिसऱ्या वाटेचा सर्वाधिक फटका चिमुरड्यांना? तज्ञांनी व्यक्त केली चिंता 


देशभरात सध्याच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही लहान मुलांमध्येही कोरोनाच्या प्रादुर्भावाचं प्रमाण पहायला मिळाला आहे. औरंगाबाद, पुणे, मुंबईत 1 महिन्याच्या बाळापासून ते 30 वर्षांच्या तरुणाचा कोरोनामुळे जीव गेलाय. त्यातच आता तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्याचं मुख्य कारण असणार आहे चिमुरड्यांचं न झालेलं लसीकरण. शिवाय रेमडेसिवीर आणि इतर औषधेही लहान मुलांना द्यावी की नाहीत याबाबत स्पष्टता नाही. 


'इंडियन अकॅडमी ऑफ पेडिऍट्रीक्स'नेही लहान मुलांमधील वाढत्या संसर्गाबाबत चिंता व्यक्त केली आहे.  देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट तीव्र झालेले असतानाच 10 वर्षांखालील लहान मुलांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. आधीच बेडस्, ऑक्सिजन, रेमडेसिवीरच्या तुटवड्यानं दुसऱ्या लाटेत तोंडचं पाणी पळालंय. आता तिसऱ्या लाटेत जर लहान मुलांमध्ये हा संसर्ग वेगानं पसरला तर आताच त्याची तयारी व्हायला हवी, असंही तज्ञांचं मत आहे. 


महाराष्ट्रात 1 मार्च ते 4 एप्रिल 2021 पर्यंत एकूण 60, 684 लहान मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली.यातील सुमारे 9,882 मुले 5 वर्षांखालील आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील एकूण कोरोना रुग्णसंख्येच्या 20 टक्के रुग्णसंख्या ही लहान मुलांची आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांना बेड मिळणं मुश्कील झालं होतं. ऑक्सिजन बेड व्हेंटिलेटरसाठी धावाधाव करावी लागत होती. जर चिमुरड्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर त्यांना लागणारे ऑक्सिजन बेड, लहान मुलांसाठी व्हेंटिलेटर बेड पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे काय़ तर याचे उत्तर सध्या तरी नाही असंच आहे.  


लहान मुलांसाठी योग्य ती औषधे, जम्बो कोविड सेंटर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मास्क यांची व्यवस्था करणेही गरजेचे आहे. तसेच लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लशींच्या निर्मितीसाठी देशभरात प्रयत्न करणाऱ्या कंपन्यांना सरकारने योग्य ते सहाय्य देणंही तितकंच आवश्यक आहे.  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही लहान मुलांच्या संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसते आहे.  'केंद्रीय आरोग्य खात्याकडून प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार देशभरातील 5 राज्यांमध्ये एकूण 79 हजार 688 मुले कोरोनाबाधित झाली आहेत.  छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्ली मध्ये कोरोनाबाधित लहान मुलांचा आकडा हा अनुक्रमे 5940, 7327, 3004 आणि 2733 इतका आहे.  हरियाणा सरकारच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, 11 मार्च ते 15 एप्रिल दरम्यान  11 हजार 344 कोरोनाबाधित लहान मुले आढळून आली आहेत.  कोरोनाचं संकट चिमुरड्यांपर्यंत पोहोचू द्यायचं नसेल तर आत्ताच कंबर कसणं गरजेचं आहे.