CM Thackeray Kolhapur Visit : कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार, कोल्हापूर दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
CM Thackeray Kolhapur Visit : कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांनी एकत्र येऊन एकमताने ठराव मंजूर करावा, पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावू, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

कोल्हापूर : कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांनी एकत्र येऊन एकमताने ठराव मंजूर करावा, पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावू, पूरग्रस्त भागाची पाहणी करत असून याबाबत जिल्हास्तरावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सविस्तर चर्चा करुन योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला.
यावेळी त्यांच्या समवेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्यासह अन्य अधिकारी आणि नेतेमंडळी उपस्थित होते.
नृसिंहवाडी तीर्थक्षेत्र येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पूरपरिस्थितीची पाहणी करुन पूरग्रस्त स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला. तसेच पूरग्रस्तांसाठी निर्माण करण्यात आलेल्या पद्माराजे हायस्कूल शिरोळ येथील निवारा केंद्रास भेट देऊन संवाद साधला. नृसिंहवाडी येथे स्थानिकांनी 2019 चा पूर , सुरु असलेली कोरोनाची परिस्थिती व आता आलेला महापूर यामुळे येथील सर्वच जनजीवन विस्कळीत झाले असून याबाबत ठोस कार्यवाही व्हावी, अशी मागणी स्थानिक पूरग्रस्त नागरिक, व्यापारी, देवस्थानचे पदाधिकारी यांनी केली.
मुख्यमंत्री ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात एकाच ठिकाणी पाहणीला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर पूरपरिस्थितीचा पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. दोघांनीही कोल्हापुरातील विविध पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली. जिथं मुख्यमंत्री येणार आहेत तिथेच फडणवीस देखील पोहोचले. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते दोघेही एकाच ठिकाणी शाहुपुरीत भेटले. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस वेगवेगळ्या ठिकाणी होते. याची माहिती उद्धव ठाकरेंना मिळताच देवेंद्र फडणवीसांना तिकडेच थांबण्याचा निरोप पाठवला गेला. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंचा निरोप पाठवला. “वेगवेगळी पाहणी करण्यापेक्षा एकत्र पाहणी करूया” असा फोन उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांना गेला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांची विनंती मान्य करून शाहुपुरीतच थांबण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एकत्र पाहणी झाली.
Before You Go
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
महत्त्वाच्या बातम्या






















