
CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार; कोणत्या घोषणा करणार?
आज दुपारी एक वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. कोरोना आणि नववर्षाचं स्वागत यासोबतच नाताळ यासंदर्भात मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी एक वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री जनतेला संबोधित करणार आहेत. कोरोना आणि नववर्षाचं स्वागत यासोबतच नाताळ यासंदर्भात मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर काही नवी नियमावली जाहीर होणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
मेट्रो कारशेडवरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपली
गेल्या काही दिवसांपासून मेट्रो कारशेड हस्तांतरणावरुन विरोधक ठाकरे सरकारला घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आजच्या संवादामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांना काय उत्तर देणार हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मेट्रो कारशेड कांजूर मार्ग इथे उभारण्यास न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पुढे न्यायालयातील सुनावणी दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून मेट्रो 3 चे कार शेड बांद्रा कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर उभारता येते का या पर्यायाची चाचपणी करण्यात येत आहे. राज्य सरकार याबाबत चाचपणी करत आहे. मेट्रो कार शेडबाबत कांजूर मार्ग येथील जागेच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
राज्यात शनिवारी 74 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 3 हजार 940 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 119 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नव्या करोना बाधित रुग्णांची संख्या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या तुलनेत अधिक असल्यानं ती काहीशी चिंतेची बाब बनली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पुन्हा काही गोष्टींवर निर्बंध घालणार का हेदेखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
