Breaking News LIVE : पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणारा चहापानाचा कार्यक्रम रद्द

Breaking News LIVE Updates, 03 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Jul 2021 08:02 PM
बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील भारत केमिकल्स या कंपनीत स्फोट होऊन पाच कामगार जखमी

पालघर : बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील भारत केमिकल्स या कंपनीत स्फोट होऊन पाच कामगार जखमी,  अग्निशमन दलाच्या गाडीच्या मदतीनं आग आटोक्यात,  जखमींवर तुंगा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू, स्फोटाचे कारण अस्पष्ट

नाशिकच्या देवधर गल्लीतील वाडा कोसळला, वैश्य कुटुंबातील दोन महिला गंभीर जखमी

नाशिकच्या देवधर गल्लीतील वाडा कोसळला,  वैश्य कुटुंबातील दोन महिला गंभीर जखमी,  जोशी वाड्याचा नूतनीकरणाच्या कामासाठी खोदकाम सुरू असताना वैश्य वाडा कोसळला,  स्थानिकांच्या मदतीने महिलांना बाहेर काढले, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणारा चहापानाचा कार्यक्रम रद्द

Breaking News LIVE : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणारा चहापानाचा कार्यक्रम रद्द, उद्या सायंकाळी 5.30 वाजता सह्याद्रीवर होणार मंत्रिमंडळ बैठक  

नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील तहसील कार्यालयाच्या इमारतीवर शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या


नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील तहसील कार्यालयाच्या इमारतीवर शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या. मयत 43 वर्षीय भीमराव चंपती शिरसाट लोहा तालुक्यातील उमरा येथील रहिवासी. कर्जबाजारी पणामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती 

मुंबईनंतर नवी मुंबईत बोगस लसीकरण,  350 कामगारांचे बोगस लसीकरण करून लुटले 4 लाख 23 हजार रूपये 

मुंबईनंतर आता नवी मुंबईतही बोगस लसीकरण झाले असल्याची घटना समोर आली असून दोन्ही घटनेतील आरोपी एकच आहेत. तुर्भे एमआयडीसी मध्ये असलेल्या ॲटोंबर टेक्नॉलॉजी कंपनीत एप्रिल महिन्यात 352 कामगारांचे लसीकरण करण्यात आले होते. मुख्य आरोपी डॉ मनीष त्रिपाठी याने केसीईपी हेल्थ केअरच्या नावाने कॅम्प घेत कंपनीतील सर्व कामगारांचे लसीकरण केले होते. यासाठी त्यांनी कंपनीकडून ४ लाख २४ हजार रूपये बिल आकारले. लसीकरणानंतर आरोपीने अनेक दिवस सर्टीफिकेट न दिल्याने कंपनी व्यवस्थापणाने याबाबत तगादा लावला होता. अखेर दोन कामगारांचे सर्टीफिकेट देत त्यावर लिलावती हॉस्पीटलचा उल्लेख असल्याने ॲंटोबर टेक्नोलॉजी कंपनी व्यवस्थापनाला यात काळेबेरे असल्याचा संशय आला. यानंतर तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करून तपास केला असता कामगारांचे केलेले लसीकरण बोगस असल्याचे तपासात समोर आले. आरोपी डाॅ मनीष त्रिपाटी, करीम आणि  साथीदार या तिघांवर विविध कलमांव्दारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोन आरोपी मुंबई पोलीसांच्या कस्टडीमध्ये असून यातील तिसरा आरोपी अद्याप फरार आहे.

नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील तहसील कार्यालयाच्या इमारतीत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील तहसील कार्यालयाच्या इमारतीत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या. मयत 43 वर्षीय व्यक्ती लोहा तालुक्यातील उमरा येथील रहिवासी. लोहा तालुका दंडाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत आत्महत्या झाल्यामुळे परिसरात खळबळ.कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती.

नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे लसीचे दोन्ही डोस घेऊनही कोरोना पॉझिटिव्ह

नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे हे लसीचे दोन्ही डोस घेऊनही कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यांनी मे महिन्यात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला होता. शुक्रवारी ते मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह बैठकीत सहभागी झाले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह बैठकीतही ते सहभागी होते.

अमीर खान आणि किरण राव यांचा 15 वर्षाचं वैवाहिक संबंध संपवण्याचा निर्णय

अमीर खान आणि किरण राव यांनी  आपल्या 15 वर्षाचा संसार संपवण्याचा निर्णय घेतला असून ते आता घटस्फोट घेणार आहेत. या दोघांनीही तशा प्रकारचे संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं आहे. 

आर्णीजवळ एसटी बसची आयशरला समोरा-समोर धडक, तीन प्रवासी गंभीर जखमी

नागपुर-तुळजापुर राष्ट्रीय महामार्गावरील आर्णीजवळ एसटी बसने आयशरला समोरा समोर धडक दिल्याने हा अपघात झाला. जवळ्यावरुन आर्णीला ही बस विरुद्ध दिशेने येत होती आणि यातूनच हा अपघात झाला. बसमध्ये 21 प्रवासी प्रवास करीत होते. यात तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना आर्णी रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे

140 लसी अन् रांगेत 300 नागरिक... औंरगाबादमध्ये आजही लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी




औरंगाबादेत लसीकरण केंद्रावरील लाईन काही कमी होण्याचं नाव घेत नाही. आजही शहरातील एन 11 भागातील लसीकरण केंद्रावर लोकांनी लसीकरणासाठी मोठी लाईन आहे. लसी आहेत 140 आणि लाईनमध्ये लोक आहेत 300. त्यामुळे तासनतास लाईनमध्ये उभं राहून लस मिळेलच याची शाश्वती नाही. 

 

 



 


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीला आग, कोणालाही इजा नाही

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीला आग विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीला आग लागल्याची घटना घडली आहे. नागपूर येथून मूलकडे येत असताना काल सकाळी ही घटना घडल्याचं सांगण्यात येतंय. नागभीड तालुक्यातील मोहाडी येथे गाडीने अचानक पेट घेतला. बोनेट मधून धूर दिसताच गाडीतील सुरक्षा रक्षक खाली उतरले. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.

अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील भामोद येथे पत्नी, मुलीचा खून करुन कुटुंब प्रमुखाने केली आत्महत्या

अमरावती जिल्ह्यामध्ये कौंटुंबिक वादातून पित्याने मुलीची आणि त्याच्या पत्नीची हत्या करुन स्वत: आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. काल सायंकाळी ही घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी अनिल दिनकर देशमुख यांनी एक चिठ्ठी लिहिली आहे. त्या चिठ्ठीत त्यांनी लिहलं की, मी दारू पिऊन कुटुंबाला त्रास देत होतो आणि घरात कौटुंबिक वाद ही होता त्यामुळे मी यांना मारुन मी स्वतः आत्महत्या करत आहे.

अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील भामोद येथे पत्नी, मुलीचा खून करुन कुटुंब प्रमुखाने केली आत्महत्या

अमरावती जिल्ह्यामध्ये कौंटुंबिक वादातून पित्याने मुलीची आणि त्याच्या पत्नीची हत्या करुन स्वत: आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. काल सायंकाळी ही घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी अनिल दिनकर देशमुख यांनी एक चिठ्ठी लिहिली आहे. त्या चिठ्ठीत त्यांनी लिहलं की, मी दारू पिऊन कुटुंबाला त्रास देत होतो आणि घरात कौटुंबिक वाद ही होता त्यामुळे मी यांना मारुन मी स्वतः आत्महत्या करत आहे.

जेएनपीटी बंदरात 879 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

जेएनपीटी बंदरातून आयात करण्यात आलेले सुमारे 879 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. डीआरआयने केलेल्या या कारवाईत सुमारे 293 किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं असून ते अफगाणिस्तान येथून इराण मार्गे जेएनपीटी बंदरात आयात करण्यात आलं होतं. पंजाब येथील आयातदाराने मागविलेल्या तुरटी आणि पावडरच्या कंटेनरमधून ही हेरॉईनची तस्करी होत होती. या प्रकरणी आयातदार प्रभजोत सिंग याला अटक करण्यात आली आहे.

शिक्षकांप्रमाणेच महसूल विभागातून एकाला विधान परिषदेवर घ्या, राज्यपालांकडे मागणी 

राज्यातील शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी ज्या प्रमाणे शिक्षक आमदार आहे त्याच प्रमाणे राज्यातील महसूल अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी महसूल विभागातुन एकाला विधान परिषदेवर घेण्याची मागणी थेट राज्यपाल यांच्याकडे करण्यात आलीय. परभणी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांनी महसुलच्या शिष्टमंडळासह राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबीत मागण्या पूर्ण करण्याची मागणी करत महसूल विभागातून विधान परिषदेवर एक आमदार नियुक्त करण्याची मागणी केलीय.

ईडीच्या समन्सनंतर कायदेशील सल्ला घेण्यासाठी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीला रवाना

#ED नं समन्स बजावल्यानंतर कायदेशील सल्ला घेण्यासाठी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे आता माजी गृहमंत्री सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीला रवाना

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीला रवाना झाले आहेत. मुंबई आणि नागपुरातील घरांच्या झाडाझडतीनंतर ईडीने त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावला आहे. त्यानंतर या प्रकरणाबाबत कायदेविषयक सल्ला घेण्यासाठी देशमुख दिल्लीला रवाना झाल्याचं समजतं. त्यामुळे अनिल देशमुख आता सुप्रीम कोर्टात जाणार का याकडे लक्ष लागलं आहे.

कल्याणमधील कोळसेवाडीत दोन तरुण आणि एका तरुणीला जमावाकडून बेदम मारहाण

कल्याण कोळसेवाडी विभागात दोन तरुण आणि एक तरुणीला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना मध्यरात्री घडली आहे.राहुल गडेकर आणि बंटी प्रधान असे मारहाण झालेल्या तरुणाची नावे आहेत. ते उल्हासनगर विभागात राहतात. मध्यरात्री त्यांची एक मैत्रीण रिक्षाने प्रवास करत असताना चालक तिची छेडछाड करु लागला. तिने फोनवरुन याची माहिती तिच्या मित्रांना दिली. यानंतर हे दोघे मित्र त्या ठिकाणी पोहोचले. मात्र या ठिकाणी आल्यावर रिक्षाचालक आणि गावातील लोकांनी या तरुणांना जोरदार मारहाण केली. अगदी पट्ट्याने त्यांना मारहाण करण्यात आली. एवढेच काय तर या तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली. मात्र या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी अजूनही गुन्हा दाखल केला नाही.

जामीनावर सुटलेल्या मोक्काच्या आरोपीची मुंबईत जंगी मिरवणूक, कोविडविषयक नियम पायदळी

मोक्काचा आरोपी जामीनावर बाहेर आल्यानंतर नागरिकांनी त्याचं जोरदार स्वागत केलं. यावेळी कोरोनाविषयक नियम पायदळी तुडवण्यात आले. मुंबईतील गोवंडी परिसरात हा प्रकार घडला. शहाबुद्दीन बाबु चड्डी मुन्वरअली इद्रिसी असं आरोपीचं नाव आहे. 2017 पासून तो वॉण्टेड होता आणि मुंबईतील शिवाजीनगर पोलिसांनी त्याला मागील वर्षीच मोक्काअंतर्गत अटक केली होती. नुकताच त्याला जामीन मिळाला होता. आपल्या परिसरात पोहोचताच त्याच्या समर्थकांनी हारतुऱ्यांनी त्याचं स्वागत केलं आणि खांद्यावर उचलून ओपन जिपमध्ये बसवलं. मिरवणुकीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर देवनार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहाबुद्दीनवर सुमारे 25 गुन्हे दाखल आहे, यात हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि हाणामारी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. आता त्याला तडीपार करण्याची कारवाई करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

उधार घेऊन सरकार कर्मचाऱ्यांचे पगार करतंय : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

राज्य सरकारच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे, उधार घेऊन सरकार कर्मचाऱ्यांचे पगार देत आहे असे खुद्द राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सरकारच्या आर्थिक परिस्थितीबाबत स्पष्टता दिली आहे. उल्हासनगरमधील धोकादायक इमारतींच्या प्रश्नासंदर्भात  नागरिक आणि व्यापाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी ते आले होते. उल्हासनगरात मे महिन्यात 15 दिवसांच्या अंतरात दोन इमारतींचे स्लॅब कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पालिकेने अनेक इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिटचा नोटिसा पाठवल्या असून काही धोकादायक इमारती रिकाम्या करायला सुरुवात केली आहे. याच धोकादायक इमारतीच्या संदर्भात मार्ग काढण्यासाठी उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या माध्यमातून गृहमंत्री जितेंद्र आव्हाड राज्यसरकार यावर काय तोडगा काढणार या संबंधीचा मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. त्यावेळी इथल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनीच स्वतः इमारतींची पुनर्बांधनी करावी मात्र यासाठी सरकारकडे आर्थिक मदतीची अपेक्षा करत असाल तर सरकारच्या तिजोरीत खडखडाट असून स्वतः सरकार उधार घेऊन कर्मचाऱ्यांचे पगार करत आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Ashadhi wari 2021: पायी वारीचा आग्रह धणारे बंडातात्या कराडकर पोलिसांच्या ताब्यात

Ashadhi wari 2021: कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्राच्या तोंडावर येऊन ठेपली आहे. म्हणूनच यंदा ही राज्य सरकारने पायी वारीला परवानगी नाकारली. हा निर्णय मान्य नसलेल्या वारकरी संप्रदायाचे बंडा तात्या कराडकर यांना आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. समूहाने न जाता टप्याटप्याने वारकरी पंढरपूरकडे पायी जातील, असं कालच कराडकरांनी जाहीर केलं. त्यानुसार पहाटे पाचच्या सुमारास काही वारकऱ्यांनी पायी चालायला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवलं आणि या सर्वांना सोडविण्यासाठी कराडकर तिथं पोहचले. मग मात्र पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतलं.

पार्श्वभूमी

Maratha Reservation : ...तर मला मुख्यमंत्री करा : खासदार संभाजीराजे छत्रपती


जनसंवाद कार्यक्रमाअंतर्गत काल (शुक्रवारी) छत्रपती संभाजी राजे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी बीड शहरातील जनसंवाद कार्यक्रमाला संबोधन झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थितांना काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा असे सांगितले होते. त्यानंतर ओबीसी समाजातून आरक्षण का नको? असा प्रश्न एका तरूणाने विचारला. विशेष म्हणजे प्रश्न विचारणारा तरुण मोबाईलवर रेकॉर्डिंग करत होता, म्हणून  संभाजीराजे छत्रपती यांनी त्या तरुणाला हीच मागणी संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाची असल्याचं सांगितलं. या प्रश्नानंतर जनसंवाद कार्यक्रमात काही काळ थोडा तणाव तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मात्र प्रश्न विचारणाऱ्या तरूणाला छत्रपती संभाजीराजे यांनी व्यासपीठावर समोर उभं करून समजावून सांगितलं.


याच तरुणाच्या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना छत्रपती संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, "जो प्रश्न तुम्ही मला विचारताय, तोच प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारा. हा प्रश्न तुम्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांनासुद्धा विचारला पाहिजे. पण तुम्ही तिथे विचारत नाही. मला विचारायचा असेल तर मला मुख्यमंत्री करा." असे यावेळी छत्रपती संभाजीराजे म्हणाले. मात्र हे वाक्य संपत असतानाच मला मुख्यमंत्री व्हायचे नाही. मला बहुजन समाजाला न्याय द्यायचा आहे, अशी भूमिकासुद्धा यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी बोलून दाखवली. 


Maharashtra Corona Update: राज्यात शुक्रवारी 8,385 रुग्णांना डिस्चार्ज तर 8,753 नवीन रुग्ण, 'या' जिल्ह्यात एकही रुग्ण नाही


राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ  लागली आहे.  राज्यात काल (शुक्रवारी) 8,385 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला तर 8,753 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यातील अॅक्टिव्ह केसेस एक लाख 16 हजारांच्या जवळ आल्या आहेत. विशेष म्हणजे काल मालेगाव आणि नंदुरबारमध्ये एकही कोरोना रुग्णांची नोंद सरकारी आकडेवारीनुसार झालेली नाही. तर आज राज्यातील 34 शहरं आणि जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. 


राज्यात गुरुवारी 9, 195 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती तर 8,634 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आजपर्यंत 58,36,920 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 96.01 टक्क्यांवर गेला आहे.तर राज्यात आज 156 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2. 01 टक्के आहे. राज्यात सध्या 1,16,867 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.